भोग आणि ईश्वर ४२७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
संगतीबाबत बोलतानाच एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे संगतीच्या गुणाने आत्मा सुखावतो आणि दोषाने आत्मा मलिन होतो. कारण संगतीच्या गुणदोषांचा सरळसरळ परिणाम मनावर व बुद्धीवर होतो. कारण या दोन्हींमुळे विचार व विचारांची दिशा, आकार आणि त्यावर आधारित उच्चार व आचार ठरतात. दुसरं म्हणजे संगतीचा गुण हा मनाची जडणघडण ठरवतो. जसं वाईट संगतीतून, शब्द उच्चार भाषा आणि सरतेशेवटी कर्म यांवर सकारात्मक वा नकारात्मक परिणाम होतो.
ज्याला बुद्धिभ्रम म्हणतात, म्हणजेच ब्रेनवॉश तो होण्याला, अनेकवेळा संगती कारणीभूत असते. चांगल्या विचार, आचार व उच्चारांची संगती मनाला, तसं वळण लावण्यास कारणीभूत ठरते. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की, जर आपल्याला जडलेली संगती ही चांगली व सकारात्मक नसून,ताप,पाप वा वैचारिक भ्रष्टता वाढवणारी आहे किंवा त्यावर परिणाम करणारी आहे असं जाणवलं किंवा लक्षात आलं तर काय.
याबाबत मी माझं स्वतःचं उदाहरण देईन. ज्यावेळी माझ्या लक्षात येतं किंवा जेंव्हा जेंव्हा अश्या संगतीचा अनुभव आला, त्या त्या वेळी, सदर व्यक्तीला आपल्या संपर्क व्यवस्थेपासून, ठरवून व मोजूनमापून, दूर ठेवण्यात मी यशस्वी झालोय. त्याचा सकारात्मक परिणामसुद्धा मला जाणवलं. हे करण्यात मनाचा निग्रह, कठोरता आणि तत्वशीलता अंगिकारण्यात कोणतीही लाज वा तमा बाळगण्याचं कारण नाही.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, संगती संग दोष: म्हणजे वाईट, नकारात्मक, तत्वहीन, निस्तेज, निरर्थक संगत आपल्याला देह मन, बुद्धी आणि आत्मनाशाकडे नेते. अगदी अश्या संगतीत असण्यानेसुद्धा आपल्याबद्दलचं इतरांचं मत दूषित होऊ शकतं. जन्माने प्राप्त संगती आपल्या हातात नाही, पण कर्माने प्राप्त संगती, ही नक्कीच आपल्या स्वतःच्या निर्णयावर, मनाच्या निश्चया वर आणि आपल्या उद्देशांवर अवलंबून आहे.
याचीच दुसरी बाजू अशी की, जर आपल्याला एखाद्याच्या आचार व विचार यांमुळे, सकारात्मकता, मानसिक आधार व उन्नती जाणवत असेल आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा व शक्ती निर्माण होत असेल तर, अश्या संगतीचा जरूर विचार करावा. एकूणच संगतीच्या बाबत माझ्या अनुभवाने सांगतो की, काही हितसंबंधी जे असं भासवतात की, त्यांना तुमची वा तुमच्या हिताची खूप चिंता आहे, पण प्रत्यक्षात त्यांची कृती याविरुद्ध असते, त्यांना चार हात लांब ठेवण्यात काहीही हरकत नाही.
कदाचित सुरवातीला आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो, पण दूरगामी परिणामांचा विचार केला तर, अश्या निर्णयाने, प्रत्यक्षात आपली प्रगतीच झाल्याचे, नंतर लक्षात येईल. मराठीत एक म्हण आहे, असंगाशी संग म्हणजे प्रणाशी गाठ. त्याचप्रमाणे हेसुद्धा ध्यानात घ्या की, उत्तम संगती आपल्या आत्मिक उन्नतीसाठी गरजेची असते. म्हणूनच अनेक संत महंत यांनी उत्तम संगतीचा आग्रह, कायम धरला आहे.
चांगली संगत चांगल्या विचारांना व चांगले विचार, हे चांगल्या आचारांना जन्म देतात. इतकी संगतीची महती थोर आहे. म्हणून माझ्या मनाला सकारात्मक ऊर्जा व शक्ती देणारी संगती, मला लाभो आणि लाभलेली शेवट पर्यंत राहो व त्या संगतीने माझा आत्मोद्धार साधला जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment