भोग आणि ईश्वर ४५१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
विनम्रता किंवा लीनता अर्थातच इंग्रजीत ज्याला low profile राहणं म्हणतात, त्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे तुमच्या मनाचा वारू, अकारण वा सकारण उधळत नाही आणि दोन त्यामुळे मनात ऋणभारित आयर्न निर्माण न होता धनभारीत आयर्न तयार होतात. ज्यामुळे मनातील मूळ स्वभावाच्या अवगुणांना, फार डोकं वर काढायची संधी मिळत नाही.
म्हणजेच जर स्वभावात अहंचा प्रादुर्भाव असेल, तर त्या अहंला वेळीच नियंत्रणात ठेवण्याचं महत्वाचं कार्य, ही विनम्रता करते. त्यामुळे त्याचा अंगीकार केल्याने, मन सुध्दा शांत आणि शीतलतेचा अनुभव करतं. मनाला प्रसन्नता आणि आल्हादता यांच्या अनुभूतीची सवय लावून घेतली तर, मन त्या वातावरणात कायम राहण्याचा प्रयत्न करते. शिवाय आपल्याकडे परंपरेने म्हटलच आहे की, विद्या विनयेन शोभते.अर्थात ज्ञान आणि त्या ज्ञानाची उपाधी विनयशील व निरूपाधिक असणाऱ्यांना शोभते.
अहं प्रमाणेच स्वभावातील दुसरा अवगुण जो, अनेक मार्गांनी घातक ठरतो आणि मनातील ऋणभार क्षणात प्रचंड प्रमाणात आणि अनियंत्रितपणे वाढवतो, तो म्हणजे क्रोध वा अतिराग. मुळात क्रोध वा राग क्षणोक्षणी येऊन, तो नित्य स्वभावाचा भाग असेल तर, अशी व्यक्ती नेहमी अमर्यादित नकारात्मकतेच्या व ऋणभाराच्या अधिपत्या खाली वावरते. ज्यामुळे, त्याच्याकडे, नेहमी तसेच भार आकर्षिले जातात व धनभारीत क्षण व कण, हे या व्यक्ती पासून नेहमी दूर जातात किंवा आले तरी विरून, यांचं परिवर्तन ऋण भारात होतं.
कारण गणितीय नियमाने आणि मानसशास्त्रानुसार दोन संख्यांच्या बेरजेत वा वजाबाकीत, दोघांमधील मोठ्या आकड्याचं चिन्ह उत्तराला दिलं जातं. उदाहरणार्थ, +25 व -5 यांची बेरीज धनभारीत अर्थात +20 येईल. पण -25 आणि +5 यांची बेरीज -20 येते. अर्थातच, ज्याचं बल जास्त, तोच येणाऱ्या उत्तराचं बल ठरवतो. म्हणजेच ऋणभारित आणि धनभारीत आयर्न एकत्र आले की, जे जास्त प्रभावशाली वा बलशाली असेल, तेच संघर्षानंतर येणाऱ्या मनःस्थितीचा भार ठरवेल.
म्हणूनच क्रोधीत व्यक्ती ही एखाद्या गरम पाण्यासारखी असते. त्यामध्ये घातलेलं थंड पाणीसुद्धा लगेच गरम होतं, जोपर्यंत पाण्याचा भार ऋण अर्थात तापमान उष्ण आहे. आता यावरून क्रोधाच्या काळात मनाची अवस्था व तापमान काय असेल, याची कल्पना केलेली बरी. आता यावर उपाय काय, असा एक प्रश्न निर्माण होईल. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. मुळात उष्ण पाण्याला थंड करण्यासाठी आपल्याला त्या पाण्यात, त्या पाण्यापेक्षा जास्त, थंड किंवा साधं पाणी घालणं, गरजेचं आहे. तरच ते उष्ण पाणी सामान्य तापमानाला येऊ शकेल.
पण पाणी आणि मन यातील साम्य व फरक, यावर उपाय अवलंबून आहे. त्यावर उद्या चर्चा करूया. पण तोपर्यंत नाम नित्य वाचे वदावे, मनातून ते नाम साठवावे, हे करतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment