भोग आणि ईश्वर ४४३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कालचाच विषय पुढे नेताना, आतापर्यंत हे लक्षात आलं असेल की, एखाद्या विषयाचं, एखाद्या गोष्टींचं ज्ञान असेल, तर आपण त्याबाबत निश्चिन्त असतोच, पण आपण दुसऱ्यांनासुद्धा सावध करू शकतो. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपण स्वतः त्याबाबत निश्चिन्त असतो. आपण कोणतीही घाई वा नसती उठाठेव करत नाही.
म्हणजेच मन शांत असतं आणि मनाला अविचल करणारे तरंग वा लहरी कार्यरत होऊ शकत नाहीत. याचाच अर्थ ज्ञान आपल्या मनाला निश्चिन्त करून, मनाच्या जल प्रवाहात उठू शकणारे वा उठणारे तरंग शांत करतं. तरीही काही गोष्टींचं ज्ञान मिळून वा त्यातील धोक्यांची जाणीव करून दिली तरीही, मनाचा ओढा त्या विषयांकडे जातोच. यालाच मनाचा नैसर्गिक ओढा म्हणता येईल. कितीही ज्ञानप्राप्ती झाली अथवा धोक्याचा अंदाज किंवा क्वचित प्रसंगी अनुभव आला तरीही, मन त्यापासून धळायला तयार होत नाही.
असा हा नैसर्गिक ओढा, सहसा विषयांचा किंवा अनिष्ट गोष्टींचा, विचारांचा असतो. याला कारण म्हणजे देहाची भूक प्रदीप्तीत करणाऱ्या गोष्टीकडे मन सहज आकर्षित होतं किंवा देहाची गरज, मनाला त्याकडे आकर्षित करते. यात मोठमोठे ज्ञानी सुद्धा अडकू शकतात. शरीराची श्वास, अन्न व पाणी या अगदी नैसर्गिक गरजा आहेत. ज्या भागणं क्रमप्राप्त आहे किंवा सर्वात प्राथमिक गरज आहे. त्यांच्यावर देहाचं अस्तित्व किंवा जगणं अवलंबून आहे.
देहाच्या या अत्यंत गरजेच्या भुकांप्रमाणेच काम ही तितकीच महत्वाची, मात्र विधात्याने प्रजोत्पादन हे उद्देश ठेवून, निर्माण केलेली, पण मानवाला प्राणीमात्राच्या रांगेत नेऊन बसवणारी अशी ही भूक आहे. मूलतः नैसर्गिकरित्या माणसाचं प्रजोत्पादन होऊन, इतर प्राण्यां प्रमाणे मानव वंश आपोआप पुढे पुढे जात राहावा, असा यामागचा अंतिम उद्देश. प्रत्येक प्राण्याला निसर्गाने या भुकेचा ठराविक काळ वा वेळ ठरवून दिली. त्या प्राण्यां मध्ये याबाबत उत्तेजना, मात्र त्या काळात वा वेळातच होते.
पण मानव हा एकमात्र प्राणी असा आहे की, ज्याला मन नावाचं इंद्रिय देऊन, विधात्याने, सर्वच प्रश्न जटिल केले आहेत. म्हणजे निशिदीन किंवा हरपल परीक्षा निर्माण करून ठेवली आहे. देहाची, बुद्धीची आणि मनाची भूक असा त्रिकोण निर्माण करून, त्यातून बाहेर पडण्याची परीक्षा निर्माण करून ठेवली आहे. माणसाचं बहुतांश आयुष्य किंवा त्यातील बहुतांश काळ अर्थात क्षणनक्षण या तीन गोष्टींच्या भुकांची चिंता वाहून,त्यासाठी जगण्यात आयुष्य घालवावं यात, सर्वसामान्य मानवी जीवन गुंतून पडतं.
आता यातून बाहेर येण्यासाठी आणि या तिन्ही गरजांच्या वर मनाला नेऊन, जन्माचं हित साधण्यासाठी काय करावं आणि प्राधान्यक्रम कसा ठरवावा, यावर आपण उद्यापासून चिंतन करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment