भोग आणि ईश्वर ४३३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
स्वतःच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना बांध घालण्यासाठी व त्यापासून आपल्या मनातील विचारांना, ती नकारात्मकता ग्रासण्यापासून, सावध करण्याविषयी काल आपण चिंतन केलं. पण अशी नकारात्मक स्थिती किंवा परिस्थिती येणारच नाही, हे तोपर्यंत खात्रीपूर्वक सांगता येणार नाही, जोपर्यंत आपला आत्मविश्वास आपल्याला तसं सांगत नाही. हा आत्मविश्वास आपल्या मनात शंभर टक्के असेल तर, तो आपल्याला अश्या परिस्थितीत नुसतं सावधच करत नाही, तर त्यावर मात करून, या लढाईत सकारात्मकतेला वादातीत जिंकून देईल.
पण त्यासाठी आपलं, आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर पूर्ण नियंत्रण हवं. असं नियंत्रण, मनात येणाऱ्या विचारांकडे त्रयस्थ पणे बघण्याची सवय लागली किंवा लावून घेतली की, जमू शकेल. त्रयस्थपणे बघण्यासाठी आपल्याला मनात येणारा प्रत्येक भाव पारखता येणं महत्वाचं आहे. त्यासाठीची जाण येणं किंवा साधनेनं तशी जाण जागृत करणं गरजेचं आहे.
ते साध्य झाल्यावर आपोआप, चुकीच्या विचारांना येत असताना बाजूला सारता येतं आणि मनाची स्थिती पूर्ववत करता येते. काही जणांना हा आत्मविश्वास, हा त्रयस्थपणा मनातील विचारांची पारख आणि हे नियंत्रण व नियोजन जन्मतः स्वभाव वा गुणवैशिष्ट्य म्हणून प्राप्त झालेलं असतं. पण काही जणांना ते प्रयासाने प्राप्त करावं लागतं. जसं शरीरातील प्रतिकारशक्ती किंवा जीवनसत्वांची कमतरता मुळातच असेल किंवा नन्तर निर्माण झाली असेल तर, ती नैसर्गिकरित्या अन्नातून वा बाह्य औषधातून प्राप्त करता येते आणि करावी लागते.
त्याचप्रमाणे मनाचा आत्मविश्वास हा उपजत नसेल तर, तो मनाला चांगल्या विचारांची, उच्चारांची व आचारांची सवय लावून प्राप्त करता येतो. ही आचार विचार उच्चार यांची सवय उत्तम वाचन, उत्तम श्रवण व उत्तम कथन करून, लावून घेता येते किंवा घेतली पाहिजे. यात एक नियम लक्षात ठेवावा, ज्याप्रमाणे ठराविक वेळी ठराविक वाईट गोष्टी करत गेल्यास, लवकरच त्याचं व्यसन लागतं किंवा लावून घेता येतं. त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी ऐकण्यात, वाचनात नित्य येत गेल्यास किंवा आणत गेल्यास, त्यायोगे उत्तम विचारांचं चिंतन, मन करायला लागतं.
अशी उत्तम विचार करण्याची सवय लावून घेल्यास, सकारात्मक विचार व कर्म यासाठी लागणारा आत्मविश्वास, आपण प्राप्त करू शकतो. आता यातीलच पुढील पायरी म्हणजे, वाईट, कु विचार दुसऱ्याकडूनसुद्धा ऐकण्यात आणू नये. खरंतर आणू नयेत, हे थोडं वेगळं वाक्य वाटलं असेल. पण जर पहिल्या पायरीला उत्तमरीत्या आत्मसात करून, त्यायोगे आत्मविश्वास प्राप्त करण्यात यश आलं असेल तर, हे दुसरं जमेल यात शंका नाही.
मुळात स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत होऊन, तो पूर्णपणे विकसित झाल्यानंतर, हे सहज जमायला लागेल की, कोणते विचार मनात येऊ द्यावेत आणि कोणते येऊ देऊ नयेत. याचीच पुढची पायरी किंवा extended स्वरूप म्हणजे आजूबाजूच्या म्हणजेच आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या कोणत्या बोलांना विचारांना, आपण स्वीकारायचं आणि कोणत्या त्याज्य विचारांचा त्याग करायचा. त्याग या शब्दामध्ये तप वा साधना या शब्दांचा साहजिक अंतर्भाव होतो. म्हणजेच काही साधन प्रयास व प्रयत्न अपेक्षित आहेत हे नक्की.
त्याचंच चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नामाचं आयुर्वेदिक औषध सूक्ष्म प्रमाणात नित्य घेत रहा.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment