Skip to main content

भोग आणि ईश्वर ४३०

भोग आणि ईश्वर  ४३० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

काल आपण विचार या गोष्टीवर चिंतन सुरू केलं आणि एक अद्भुत वाटणारी, पण शास्त्रीय सत्य असलेल्या मुद्दयावर येऊन थांबलो. तो मुद्दा म्हणजे दोन विचार लहरी या इतर सर्व लहरीं प्रमाणेच एकमेकांच्या संपर्कात येऊन, त्या शास्त्रीय तत्वांनुसार, एकमेकांना छेद देतात किंवा एकमेकांत मिसळून, एकरूप होऊ शकतात. म्हणजे दोन व्यक्तींचं विचारचिंतन किंवा एकाच व्यक्तीचे एखाद्या विषया वरील दोन मतं वा दोन विचार एकमेकांना cross अर्थात छेद देतात किंवा देऊ शकतात. 

यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा, जो याला कारणीभूत होतो, तो म्हणजे, त्या दोन विचारांची तीव्रता, गती आणि त्यामागे मनाचं लागलेलं बल आणि मनाची स्थिती. म्हणजे जर दोन व्यक्ती एखाद्या मुद्द्यावर चर्चा करत असतील, तर त्यांच्यामध्ये, ज्या पद्धतीने चर्चा होत असेल, ते वातावरण, त्यांचा त्यांच्या विचार व मन, यावरील नियंत्रण, मनातील सकारात्मक वा नकारात्मक पातळी आणि एकाग्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम, त्यांच्या वाणीतून मांडल्या गेलेल्या मुद्द्यांच्या लहरींवर होतो. 

जर दोन्ही नकारात्मक असतील तर, विचारांचं छेदन इतकं तीव्र असेल की, दोघांचेही विचार एकमेकांच्या श्रावणात न येता, ते बाहेरच्या बाहेर नष्ट होतील. म्हणूनच आपण बरेचदा रागात असताना समोरच्या व्यक्तीचा मुद्दा आपल्या कानात, मेंदूत आणि मनात शिरत नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे रागामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक लहरीचं जाळं, ज्ञानेंद्रियाभोवती आच्छादन निर्माण करतात. 

त्यामुळे लहरी आत जाऊन, कर्णपटलावर आदळूनसुद्धा मेंदू पर्यंत आणि त्यामार्फत मनापर्यंत पोचत नाहीत व जाणिवेत जात नाहीत.  म्हणून राग शांत झाला की आपणच, भानावर येऊन, विचारतो की, काय म्हणालास कळलं नाही. किंवा समोरचा सुज्ञ असेल तर म्हणेल, तुझा राग शांत होऊ दे, मग मी बोलीन आणि त्यावेळी तुला माझा मुद्दा ऐकू येईल. हे जाणणं वा लक्षात येणं, म्हणजे समोरच्या लहरीचं कान मेंदू व मन यामध्ये  एकरूप होणं. म्हणूनच रागात संवाद होऊ शकत नाही. त्यामुळे एक रागात असताना, दुसऱ्याने शांत राहणं, गरजेचं असतं. 

यातून एक गोष्ट ध्यानात येईल की, नकारात्मकता संवादात विघ्न किंवा बाधा निर्माण करते. मग दोघेही नकारात्मक असुदेत किंवा दोघांपैकी एकजण असुदे. म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे विचारांची गती, तीव्रता, बल व प्रकार अर्थात भाव, यावर हे छेद देणं किंवा एकरूप होणं, अवलंबून असतं. म्हणूनच संवाद होण्या साठी दोघे सकारात्मक असणं गरजेचं आहे. अन्यथा रागात व नकारात्मक विचार असणारी एक व्यक्ती किंवा दोन्ही व्यक्ती आपले विचार मांडतील आणि निघून जातील. हा प्रकार पाहायचा असेल तर कोणत्याही न्यूज चॅनेलवर घडत असलेली चर्चा पहा. 

शांत डोक्याने पाहिलं तर लक्षात येईल, तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला,  फक्त आपला मुद्दा मांडण्यात रस असतो. त्यामुळे बहुतेकवेळा चर्चा न घडता, आपला मुद्दा ठासून, जोरदारपणे आकसाने, रागाने मांडून निघून जायचं, ही मानसिकता आता दृढ झालेली आढळते. त्यामुळे खूपवेळा अशी निरर्थक आणि निरुपयोगी चर्चा पाहून, आपला रक्तदाब वाढवून घेण्यात काही अर्थ नसतो आणि हाती काही लागत नाही. 

विचार या मुद्द्यावर अजूनही चिंतन आवश्यक आहे. त्यामुळे उद्या चिंतन पुढे सुरू ठेवू, पण नामाचं औषध नित्य घेत राहून. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, माझ्या कडून पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...