भोग आणि ईश्वर ४३१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कालच्या विषयातील मुद्दा आज पुढे नेऊया. काल पाहिलं की, जेंव्हा दोन व्यक्तींपैकी एकजरी, नकारात्मक असेल तर संवाद न होता, तुटतो किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, विसंवाद होतो.कसा ते पाहू.नकारात्मक शब्द, विचार वा चिंतन किंवा आचार यातून उत्पन्न होणाऱ्या लहरी,या तिखटाप्रमाणे अतितीव्र असतात. म्हणूनच थोडसं, अगदी कणभर तिखटसुद्धा एखाद्या गोड पदार्थाला तिखटपणा आणायला पुरेसं असतं.
त्याचप्रमाणे, एखादं तुटक, तीव्र किंवा तिखट बोलणं, एखाद्या चांगल्या वृत्तीच्या व स्वभावाच्या माणसाच्या मनात घात करायला पुरेसं, असतं. यात त्या व्यक्तीने सोडून दिलं तर, हा त्या व्यक्तीचा स्वभावगुण झाला. पण त्या कर्माचा, विपरीत परिणाम आपल्या कर्मफलावर होतो. म्हणूनच संवादात विसंवाद होणार नाही याची काळजी आपल्याकडून आपण, घेतली पाहिजे.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, त्याच्या नकारात्मक लहरींचा परिणाम आपल्या मनातील ऊर्जा व शक्ती यावर होऊ शकतो. म्हणूनच ज्यावेळी नकारात्मक व्यक्तींशी किंवा नकारात्मक लहरींशी संबंध वा संपर्क येतो, तेंव्हा आपल्याला जाणीव होईल, त्यावेळी आपण अश्या लहरी संपर्कापासून दूर राहावं. कारण अश्या लहरी, या गोड दुधात पडलेल्या तिखटाच्या कणाप्रमाणे असतात.
यात वैज्ञानिक भाग असा की, दोन व्यक्तींकडून आलेल्या, विचार आचार आणि उच्चार यांच्या लहरी एकमेकांशी स्पर्धा करून, एकमेकांना छेद देण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच शास्त्रीय, वैज्ञानिक आणि निसर्ग नियमानुसार, जो बलिष्ठ तो श्रेष्ठ. म्हणजेच ज्या लहरी जास्त ऊर्जा व बल निर्माण करणाऱ्या असतात, त्या शेवटी कमी ऊर्जा व बल असणाऱ्या क्षीण लहरींना नष्ट करतात. परिणाम आपल्या मनातील ऊर्जा व शक्ती यावर होतो.
हे झालं नकारात्मक आणि सकारात्मक लहरींच्या बाबतीतील मानसिक व वैज्ञानिक सत्य. याचाच दुसरा भाग किंवा दुसरी बाजू म्हणजे ज्यावेळी दोन किंवा अधिक सकारात्मक ऊर्जा व बल असणारी माणसं संवाद साधतात, त्यावेळी दोघांच्या सकारात्मक सात्विक व शुद्ध लहरींचा परिणाम दोघांच्या मनावर सकारात्मकरित्या होऊन, दोघांनाही मानसिक व आत्मिक आनंद मिळण्यात होतो.
अजून खोलात जाऊन याच मुद्द्यावर चिंतन केल्यास, लक्षात येईल की, आपल्याच मनात वा आपल्याकडून, ज्यावेळी नकारात्मक विचार उच्चार वा आचार होतो, त्यावेळी त्या तीव्र व तिखट लहरी, आपल्याच मनातील सकारात्मक लहरींना संपवून, इतर नकारात्मक लहरींना बल देतात. परिणामी मनात नकारात्मकता अतिप्रमाणात प्रसारित वा विस्तारित होते. म्हणून आपल्या वा आपण संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या, नकारात्मक लहरींबाबत खूप सावध राहिलं पाहिजे.
यावर अजूनही चिंतन करूया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत नामस्मरणातून सकारात्मक ऊर्जा व बल प्राप्ती व वृद्धी करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment