Skip to main content

ज्ञानेश्वरी भावार्थ ६

ज्ञानेश्वरी भावार्थ ६ 

पैं व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रितु होइजे ।
ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥६-६८॥ 

ज्ञानेश्वरीतील सहाव्या, आत्मसंयमयोग या अध्यायातील, हा अडूसष्टावा श्लोक.या एका श्लोकात माऊलींनी खूप मोठं तत्वज्ञान, सार आणि दिशादर्शक विचार मांडला आहे. मला वाटतं, या एका श्लोकातून जन्ममरण कारण आणि उपाय सांगून, माऊलींनी, अनंत गोष्टी फक्त साडे तीन ओळींच्या श्लोकात सांगितल्या आहेत. ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थदीपिका, ही श्रीमद्भग्यवद्गीतेवरील सर्वश्रेष्ठ टीका लिहिताना,गीतेतील एकेका श्लोकाचा अर्थ, भावार्थ व गुह्यअर्थ सांगताना, अनेक दाखले, दृष्टांत आणि अनेक ओव्या मांडल्यात. 

त्यांचा अर्थ लावण्यासाठी अनेकांनी ज्ञानेश्वरीचं पुन्हा विस्तृत विश्लेषण आपापल्या परीने केलं आहेच. पण मला या श्लोकातून जो अर्थ समजला, तो मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न. इथे आलेला पहिला शब्द आहे व्यामोह. व्यामोह या शब्दाचा अर्थ अतार्किक भयाने ग्रस्त असल्या मुळे, असलेली मानसिकता. व्यामोह म्हणजे काल्पनिक भीतीने एखाद्याला ग्रासल्यानंतर, त्याला सतत, सर्वकाळ तशाच प्रकारची स्थिती वा दृश्यता भासते. 

शेजे म्हणजे अर्थातच शेजेवर. शेज म्हणजे त्यावेळी सर्वत्र असलेली एकच स्थिती किंवा बिछाना, ज्याबाहेरील विश्व, त्या क्षणी, त्या बिछान्यावर पहुडलेल्या जीवाला, ज्ञात नसतं, किंवा त्या स्थितीचा मोह अनावर झाल्यामुळे, जीव त्या बिछान्यातून बाहेर येऊ इच्छित नाही.म्हणजे पहिल्या ओळीचा, माऊलींना अभिप्रेत असलेला भावार्थ, असा करता येईल की,चुकीच्या कल्पनेत असलेला जीव, अश्या चुकीच्या संकल्पनेच्या शेजेवर अर्थात बिछान्यावर किंवा तशीच संकल्पना,  सर्वत्र आहे, हे मान्य करून, त्या काल्पनिक जगाला आपलं विश्व मानतो. 

बर या चुकीच्या संकल्पनेला जबाबदार असलेली गोष्ट म्हणजे अविद्या अर्थात अज्ञानरुप अंधःकार. कारण विद्या म्हणजे ज्ञान आणि अविद्या म्हणजे त्या ज्ञानाचा अभाव. पण इथे माऊलींना अभिप्रेत ज्ञान वा अज्ञान अर्थातच,या जीवाला,या जगताच्या पार नेणारं ज्ञान. जे आत्मतेज जागवतं आणि जीवाला सत्य व मिथ्या यातील फरक दाखवून, जगताच्या पार जाण्याची प्रेरणा देऊन मार्ग सांगतं, ते ज्ञान. असं ज्ञान नुसताच मार्ग सांगत नाही तर, त्या मार्गावर पुढे नेऊन, जीवाला,त्या मार्गातील अडी अडचणी, खाचाखोचा यांबद्दल उत्तम दिशादर्शन करणारं, पथदीप होतं. 

या मार्गाकडे नेणारं ज्ञान हे , परिपूर्ण असतं, ज्यामुळे एकदा या, भवसागर तारून नेणाऱ्या आत्मज्ञानाचा प्रकाश पडला की, जीवाला काही पाहायचं किंवा मिळवायचं उरत नाही. अश्या आत्मतेजाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या अभावामुळे, जीव चुकीच्या संकल्पनेवर आधारित, अंधःकारामय जीवन जगतो. 

अश्या अविद्येत लुप्त जीवाला, ही अविद्या, जीवाच्या बुद्धीवर, मनावर व आत्मतेजावर,  जबरदस्तीने, बळ जबरीने, भ्रमाचं, अज्ञानाचं पांघरूण घालून, व्यमोहाच्या शेजेवर अर्थात चुकीच्या संकल्पनांचा खेळ मांडून, जीवाला वेगवेगळ्या मोह, माया, भय, लोभ, वासना यांसह अनेक चुकीच्या शेजेवर अर्थात बिछान्यावर निद्रिस्त करून ठेवते. म्हणजेच त्या चुकीच्या संकल्पनेतून तयार झालेल्या विश्वातून, जीव बाहेर पडू नये, यासाठी अनेक मित्र वा शत्रू, वेगवेगळ्या रुपात व स्वरूपात आणून, कधी मोह लोभ, कधी भय, कधी आश्चर्यकारक काल्पनिक आल्हादता निर्माण करते. 

आता या भ्रमित विश्वात जीव आपल्याच कर्मजाळ्यात, इतका गुरफटून व गुंतून जातो की, त्याला जे दिसतंय, जे जगतोय, जे समोर येतंय, तेच सत्य वाटायला लागतं. अशी ही मायारुप वातावरण निर्मिती, हे अविद्यारुप असुरांचं अस्तित्व, जिवा भोवती, निर्माण करून, जीवा साठी हे कर्मफल विश्व, हेच व इतकंच विश्व आहे, अशी बुद्धीची व मनाची समजूत करून देते व त्या जीवाला त्यातून बाहेर पडू न देता, त्यातच गुंतवून ठेवते. 

म्हणजेच ही अविद्येची अज्ञानाची निद्रा म्हणजे बुद्धीवर मायेचा पडदा वा पाश असून, त्यातून निर्माण झालेल्या चुकीच्या संकल्पना हेच सत्य मानणारा जीव,  व्यामोह ग्रस्त होतो. त्यामुळे, त्यानंतर तो जीव कर्मबंधनातील फलरूप पाशात अडकून, जन्ममरणरूप चक्रात गुंतला जातो, बद्ध होतो. अर्थातच अज्ञान ग्रस्त होऊन,व्यामोहात अर्थात बुद्धिभ्रष्ट स्थितीत कर्मफली गुंतून जन्ममृत्युरूप दुःस्वप्ने भोगतो. अर्थात जन्ममृत्यू ही या बुद्धिभ्रष्ट जीवाला पडलेली स्वप्ने आहेत आणि ती बद्धता निर्माण करणारी स्वप्नं असल्यामुळे ती दुः अर्थात अंती दुःख कारकच आहेत, असंच याद्वारे माऊलींना अभिप्रेत आहे. 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०२/२०२२

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...