भोग आणि ईश्वर ४४७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
उपवास म्हणजे मनाला, आसक्तीपासून, दूर करून, त्या मनाला, एका वेगळ्या पातळीवर नेऊन, ज्या उद्देशासाठी ईश्वराने या आत्म्याला या पंचमहाभूतरूप देहात धाडलं आहे, तो उद्देश साध्य करण्यासाठी पाऊल टाकलं जाईल. कारण वासनेसह माया, मोह, लोभ यांना जिंकूनच आपण आत्मशुद्धी साधून आत्मशोध घेऊ शकतो.
कारण ज्यावेळी मनात उठणारे तरंग, लहरी व कंपनं ही नियंत्रित होऊन, मन एका विशिष्ट पातळीवर स्थिर होईल, तिथेच, आपण या जगतातून पार जाण्याच्या मार्गाकडे जाऊ शकतो. याच मनाला देहाच्या व आत्म्याच्या अनेक शत्रूंना नियंत्रित करण्या साठी, आपण उपवासाचा आधार घेऊन या मनाला भरकटण्या पासून थांबवू शकतो.
या देहाच्या आत दडलेल्या मनाला, प्रारब्ध, दुःख, दैन्य, भोग याबरोबर,सुख,शांती,समाधान,उपभोग अश्या अनेक स्थित्यंतरा तून जावं लागत असताना, या मनाचा तोल सांभाळणं, हे अत्यंत कठीण काम आहे. म्हणूनच हे मन, लोभ मोह यांनी मोहित होतं, काम क्रोध यांनी उत्तेजित होतं, दुःखं, भोग यांनी कष्टी व निराश होतं, तर आनंद, उपभोग यांनी सुखावून जातं.
पण या सर्व भावभावनांच्या डोलऱ्यात, मन आपलं स्वत्व हरवून बसतं. कारण त्याला या सर्व भावनांना उत्तेजित, उद्दीपित वा दाबून टाकणाऱ्या टोकाच्या अनुभवांनी, नकारात्मकता येते. अनुभवाची शिदोरी इतकी परिणाम कारक असते की, वेळ आल्यावर,आधीच्या अनुभवांमुळे माणूस, प्रसंगी, ताकसुद्धा फुंकून पितो. कारण आयुष्यात आलेले कटू अनुभव व वाईट घटना, बरेचवेळा, जगण्याचा मार्ग, दिशा व निर्णय ठरवतात.
यामध्ये बरेचदा आपण, निर्णय घेताना अगदी उलट निर्णय सुद्धा घेऊ शकतो. यामध्ये प्रारब्धाचा भाग आहेच. कारण पूर्वायुष्यात आणि पूर्वजन्मातील बऱ्यावाईट घटना, अर्थात आपलीच कर्म, आपल्यासमोर, अगदी चुकीच्या वेळी व चुकीच्या काळात समोर येतात. मनाचा डोलारा अश्या वेळी, पुन्हा एकदा अस्थिर होऊन, आपण चुकीच्या निर्णयाकडे, आपोआप ओढले जातो.म्हणूनच या मनाला अश्याच वेळी किंवा काळात स्थिर राखण्या साठी, आवश्यक साधना म्हणजे, मनाचा उपवास.
म्हणजे एखाद्या दुःखद प्रसंगात वा भोगांच्या काळात, मनाला स्थिर राखण्यासाठी, आधीपासूनच किंवा नेहमी, ठराविक दिवशी, ठराविक वेळी, ठराविक काळ, मनात उसळणाऱ्या विविध भाव भावनांचा डोलारा, स्थिर राखण्याची सवय वा प्रयास करण्याची गरज आहे आणि जशी देहाचा उपवास करून, देहशुद्धी साधता येते किंवा तो त्यावर उत्तम उपाय आहे, त्याचप्रमाणे मनाचा उपवास करून, मनाची नष्ट झालेली वा लुप्त झालेली किंवा वापरली गेलेली, शक्ती, ऊर्जा व बल परत मिळवता येतं.
यात काही पयोग जाणूनबुजून करावे लागतात. जसे योगामध्ये काही ठराविक गोष्टी नित्य नियमित अभ्यास म्हणून, करणं क्रमप्राप्त आहे, त्याचप्रमाणे इथेसुद्धा, काही कर्म करणं वा नियमित करणं अपेक्षित आहे. त्यांच्यावर उद्या चिंतन करूया. पण नामाच्या माध्यमातून, मनाला स्थिरतेकडे नेण्याचं कार्य, नेटाने करत राहूनच.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment