भोग आणि ईश्वर ४२९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनातील ऊर्जा व शक्ती यांच्यावर परिणाम करणाऱ्या घटकातील संगतीचा दीर्घ चिंतनातून विचार केल्यानंतर, या श्रेणीतील आणि स्वनियंत्रणात शक्य असलेला दुसरा मुद्दा म्हणजे आपले विचार. म्हणजे आता मी जे मांडतोय ते किंवा आपल्या मनात प्रत्येक क्षण येतात ते अथवा सतत आपणच आपल्याशी, चिंतनाच्या माध्यमातून बोलतो ते विचार.
इथे एक उदाहरण देता येईल, म्हणजे हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल व यावर योग्य चिंतन करता येईल. आता दूरचित्र वाणीवर आपण ज्या मालिका बघतो, त्या मालिकांमध्ये, अनेकदा, त्या मालिकेतील पात्रं, आपल्याच मनाशी, करत असलेला संवाद आपल्याला कळावा यासाठी, आवाजाच्या माध्यमातून दृष्य स्वरूपात दाखवला जातो. याचं महत्वाचं कारण म्हणजे, असा संवाद प्रत्येक जण आपल्या मनाशी कळत वा नकळत करत असतोच.
डोक्यामध्ये अनेकदा, पुढच्या योजनांचे, कल्पनांचे, स्वप्नरंजनाचे मागे घडलेल्या कटुगोड आठवणींचे विचार सतत येतच असतात. आपल्या संपर्कात आलेल्या, येऊन गेलेल्या,काही सुखद तर काही दुःखद आठवणी ठेवलेल्या किंवा काहीच नसेल तरीही विचारांच्या तंद्रीत वा प्रवाहामध्ये, येऊन जाणारे विचार असतातच. कधी एखादी गोष्ट वा घटना का घडली किंवा संवाद अथवा वाद का घडला याचाही मागाहून पुनर्विचार, या माध्यमा तून आपण विचार करतो.
यातील काही विचार वा कल्पना किंवा स्वप्नरंजन मनाला सुख, आनंद, सकारात्मकता देऊन मनाला उत्साह, उल्हास व रंजकता देतात. तर काही विचार मनातील घालमेल, गोंधळ, त्रास वाढवून मनाला दुःख, कारुण्य, निरुत्साह आणि नकारात्मकता देऊन, मनाची ऊर्जा व शक्ती क्षीण करतात. अश्या प्रकारच्या अनेका नेक विचारांच्या व त्यातून मन बुद्धी आणि देह यांवर परिणाम करणाऱ्या, विचारांच्या लहरींच्या सान्निध्यात, आपण आयुष्य जगतो.
म्हणजे विचार हे घडवणं वा बिघडवणं अशी दोन्ही कामं करतात असं एकूण अनुमान निघतं. पण ते तितकंसं सत्य आहे असं म्हणता येणार नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे विचारांचा प्रभाव व त्याचा दृश्य स्वरूपातील कर्मावर झालेला परिणाम हा व्यक्तीच्या स्वभावगुण वा स्वभावदोष, मनाचा कणखरपणा वा कमजोरी अश्या अनेक घटकांवर अवलंबून आहे आणि असतो. म्हणूनच आपण मनाला साद प्रतिसाद देणाऱ्या व त्याद्वारे मनाची बैठक घडवणाऱ्या किंवा बिघडवणाऱ्या सर्वच विचारांचा विचार करणार आहोत.
मुळात आलेला प्रत्येक विचार आपली गती, शक्ती व ऊर्जा घेऊन येतो, हे सर्वात प्रथम लक्षात ठेवा. विचार एखाद्या घटनेवरून किंवा दृश्यावरून किंवा ऐकलेल्या समजलेल्या अश्या अनेक प्रकारच्या गोष्टींना प्रतिसाद यास्वरूपात असतो. आलेला विचार जर कल्पना असेल वा स्वप्नरंजन असेल तरीही त्याचा संबंध कुठेतरी आपल्या या किंवा गतजन्मातील आयुष्याशी असतो.
अतिरंजित कल्पना ते एखाद्या घटनेला प्रतिसाद म्हणून आलेला विचार, असे दोन टोकाचे विचार, हे आपल्याच आयुष्याशी निगडित असतात. म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवाने वा कल्पनेने आपल्या मनात विचार येत नाहीत, जोपर्यंत आपण ते त्याच्या कडून किंवा इतर कोणाकडून ऐकलं, पाहिलं वा वाचलं नसेल. यामध्ये एक कमालीची, काहीशी चमत्कारिक वाटणारी गोष्ट म्हणजे, विचार हे लहरी स्वरूपात असल्यामुळे दोन लहरी एकमेकांना छेद देऊ शकतात किंवा एक होऊ शकतात.
या शेवटच्या संदर्भावर उद्या विचार करूया, तोपर्यंत नामचिंतन करत रहा.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment