Skip to main content

भोग आणि ईश्वर ४३९

भोग आणि ईश्वर  ४३९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

संगती आणि विचार या, मनातील ऊर्जा व शक्ती यांच्या वर परिणाम करणाऱ्या दोन घटकांविषयी, आपण प्रदीर्घ चिंतन केल्यानंतर, हे नक्की जाणलं असेल की, उत्तम संगती जोपासली आणि चांगल्या विचारांची बीजं, आपण प्रयत्न पूर्वक रुजवली तर, आपण नक्कीच मनाच्या उभारीला सकारात्मकरित्या हातभार लावू शकतो किंवा हाताळू शकतो. 

आता याच साखळीतील तिसरा घटक, जो आपल्या मनातील ऊर्जा व शक्ती यांच्यावर योग्य वा अयोग्य परिणाम करतो आणि जो काहीप्रमाणात आपल्या नियंत्रणात आहे, तो म्हणजे कर्म. कर्म हे केलेलं वा न केलेलं दोन्ही प्रकारचं असतं. दोन्हींचे प्राप्त परिणाम फलस्वरूपात भोगावे लागतात. काही कर्माचे परिणाम लगेच किंवा काही ठराविक काळात समोर येतात. तर काहींचे परिणाम, त्या कर्माच्या परिपक्वतेनंतर समोर येतं. 

लगेच परिणाम देणारी कर्म म्हणजे एखाद्या चिडखोर वा पिसाळलेल्या जनावराला छेडलं तर,तो अंगावर लगेच येणार. किंवा शांत बसून टाळलेलं कर्म, हे अंती कर्मच आहे याचं उदाहरण म्हणजे एखादी भिंत वा वजनदार वस्तू पडत असताना, काहीच हालचाल न करता तिथेच थाबणं. यात कर्म न केल्याचं समाधान मिळाल्याचं लक्षात सुद्धा येणार नाही.कारण त्याआधीच कपाळमोक्ष झालेला असेल. म्हणजे लक्षात आलं असेल की, काहीच कर्म न करणं, हेसुद्धा एक कर्मच आहे. 

कालांतराने समोर येणाऱ्या परिणामांची संगती लावणं, हे कठीण काम आहे. तशी ती लावण्याच्या प्रयत्नात भ्रम सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. किंबहुना असा भ्रमच अनेकदा चुकीची मानसिकता घडवतो. भ्रम हा की, मला भोगावं लागणारं दुःख ताप वा भोगावे लागणारे भोग, हे मी न केलेल्या कर्माचे आहेत. म्हणजे यात दोन चुकीच्या गोष्टी घडतात.  

एक म्हणजे आपण आपलंच पूर्वकर्म नाकारतो आणि आपल्या अज्ञानाचं किंवा अहंचं दर्शन घडवतो. अज्ञान यासाठी की, विधात्याने नियमात बांधलेल्या कर्मव्यवस्थे वर आपण अविश्वास दाखवतो किंवा अहं म्हणजे आपला आपल्या कर्तृत्व, योग्यता, अचूकता यावर असलेला अतिविश्वास किंवा अंधविश्वास. हा अहं पुढील अनेक चुकांना आमंत्रण देतो. 

यात मनाची मूळ जडणघडण, वृत्ती, स्वभाव, लवचिकता या सर्वांवर आपली क्रिया आणि प्रतिक्रिया वा प्रतिसाद अवलंबून असतो.  म्हणजेच मनाची जी घडी वा अवस्था आपल्याला जन्मतः प्राप्त झालेली आहे आणि त्यात आपण, आयुष्यात आतापर्यंत किती भर घातली किंवा घट केली आहे, यावर, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, त्या त्या वेळचा, आपला स्वभाव ठरतो वा समोर येतो. 

कर्माचा हा लेखाजोखा आपण असाच उद्याच्या भागात बघूया. पण नामाची सुरू असलेली साधना अशीच सुरू ठेवून. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१२/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...