Skip to main content

भोग आणि ईश्वर ४४०

भोग आणि ईश्वर  ४४०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

कर्माच्या संदर्भात पुढे चिंतन करताना लक्षात येईल की, प्रत्येक कर्माचा मनावर परिणाम होतोच. कारण शेवटी प्रत्येक कर्म, आपलं अस्तित्व, लहरी स्वरूपात मांडून, त्याची नोंद सुप्त वा जागृत नोंदवून जातं. त्याला फल स्वरूप प्राप्त झाल्यानन्तर किंवा होण्याआधी, त्याचे तरंग मनात उमटवत, आपल्याला प्रतिसादाला किंवा प्रतिक्रियेला प्रवृत्त करतं. 

त्यामुळे प्रत्येक कर्म आपलं अस्तित्व नोंदवून फलाच्या प्रतीक्षेत तटस्थ आणि शांत बसतं. आता ते कर्म शांत आणि तटस्थ बसलं तरीही, त्याचे तरंग मनाला आकर्षित वा प्रतिकर्षित करत असतातच. म्हणजे एखादी घटना, चांगली -वाईट, आनंदाची-दुःखाची, रागाची-लोभाची घडली की, मन त्यातून बाहेर यायला खूप वेळ लागतो. विशेषतः ती घटना वा गोष्ट मनात किती खोलवर तरंग उठवून गेली आहे, त्यानुसार, हे ठरतं. 

म्हणजे जितका काळ त्याचे विचार मनात फिरत राहतात, तितका काळ, त्याचे तरंग मनातील शक्ती व ऊर्जा यांना कार्याला लावून, त्यांत क्षय वा वृद्धी करतात. आता एखादी घटना असेल तर ती आपल्याच एखाद्या कर्माचं फल असणार, हे नक्की. म्हणजे हे कर्माचं फलितस्वरूप असतं की,एखाद्या घटनेचे,प्रसंगाचे तरंग मनात उमटतात. पण ते तरंग तसेच कितीकाळ फिरत राहून, मनाची ऊर्जा व शक्ती यांचा वापर करून घेते, हे मनाच्या सबलतेवर वा दुर्बलतेवर अवलंबून आहे. 

याचं उदाहरण आपण पाहूया म्हणजे मुद्द्याचा अर्थ लक्षात येईल. एखाद्याने रागाच्या भरात आपल्याला काही लागेल असं किंवा अपशब्द बोलणं, हे पूर्वकर्माचं परिणाम स्वरूप आहे वा असतं, हे नक्कीच. पण त्याचा विचार कितीकाळ मनात घोळत राहून, आपल्याला त्रास देईल, हे आपल्या मनाच्या बळावर असलंबून आहे. म्हणजे जर कणखर मन असेल आणि आपण चुकलो असू, ज्यामुळे सदर व्यक्तीने बोल लावले, तर आपण मनात वा प्रत्यक्ष त्या व्यक्तीजवळ चूक कबूल करून, आपलं मन शांत करू. 

पण जर अहं बलशाली असेल, तर मात्र, आपण चुकीचं वागलं नसल्याचं, स्वतःच्या मनाला, समजावत राहू. ज्यामुळे ते तरंग आपल्या मनाला त्रास देत राहतील. आता हे आपलं कर्म नसताना जर फलस्वरूपात घडलेलं असेल, असा आपला समज असेल किंवा अज्ञान असेल,  तरीही आपण आपल्या मनाच्या बलानुसार, त्यावर प्रतिक्रिया देऊ वा नोंदवू. 

म्हणजे जर मन कणखर असेल आणि आपण आधी केलेल्या कर्माचं फल असेल हे जाणून त्याप्रमाणे किंवा तशी संगती लावता आली नाही तरीही, बलशाली मनाची व्यक्ती, अश्या घटनेची आपल्याच अज्ञात पूर्वकर्माशी संगती कल्पनेत जोडून, आपल्या मनातील तरंगांना शांत करेल. पण याविरुद्ध दुर्बल मनाची व्यक्ती, त्यावर अन्य कारणं शोधून, त्या फलस्वरूपातील घटनेच्या तरंगांना आपल्या मनात खोलवर फिरत ठेवण्याची चूक करेल. 

एक लक्षात ठेवा, अहं असलेली व्यक्ती ही सशक्त भासत असली तरी, ती खऱ्या अर्थाने कमजोर वा बलहीन मनाची व्यक्ती असते. याऊलट अहं नसलेली व्यक्ती ही मनाने सर्वात बलशाली व्यक्ती असते. त्यामुळे कर्माचे व कर्मफलाचे मनात उमटलेले व फिरत असलेले तरंग हे मनाच्या दुर्बलतेवर वा सबलतेवर अवलंबून असतं.  

आता ही सबलता वा दुर्बलता काय व कशी प्राप्त करायची वा वाढवायची, यावर उद्या चिंतन करूया  पण नामस्मरणा साठी उभा जन्म कार्य केलेले, माझे सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना, त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त वंदन करून. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१३/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...