Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर १७

श्रीरुक्मिणी स्वयंवर १७

llश्रीगणेशाय नमःll

  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
 वर्षाऋतु नसतानाही आणि वसंतऋतु वर्षभर असताना मयुराचे मनोवेधक नृत्य द्वारकेत होते आहे. जे पाहून प्रत्यक्ष स्वर्गीच्या अप्सरा अचंबित होत आहेत. या हरीच्या अद्भुत लीला पाहून प्रत्यक्ष उमाकांत तांडव देखील विसरून स्तब्धतेने ते अलौकिक मयुरनृत्य पाहण्यात मग्न आहेत. अतिशुद्ध जातीचे हंस द्वारकेतील अतिरमणीय आणि मानसरोवरावरील जलाने युक्त अश्या अनेकानेक तलावांमध्ये  मुक्त विहार करताना जनसामान्यांनी उधळलेले अति मौल्यवान मोत्याचा चारा टिपताना दिसत आहेत. 

द्वारकेतील शुक आणि पिंगळे वेदार्थ, धर्मवाद, तत्वज्ञान इत्यादी मधील अतिगृह्य अश्या गोष्टींचा मतितार्थ व गुह्यार्थ तितक्याच सोप्या भाषेत सांगताना पाहून वेदांतही काहीसा भयभीत होऊन पहात आहे. स्वर्गीचे वैभव व शोभा पाहिलेले नारद देखील या महनीय नगरीची शोभा पाहून आश्चर्यचकित होतात, तिथे सामान्य यात्रेकरूंचे काय सांगावे. 

द्वारकेतील घरे तीन खणांवर पाच खण अशी उंचीवर बांधलेली आहेत. सर्व घरांची रचना चौसोपी आहे. परंतु इतर नगरांमध्ये उंच घरं असल्यामुळे व इतर अनेक कारणांनी उद्भवणारी दुखणी , आजार ह्याचा लवलेशही द्वारकेत नाही.  द्वारकेतील सर्व घरं ही वाड्यानी बनलेली आहेत. प्रत्येक वाडा प्रशस्त आणि भरपूर अंगण व मोकळी जागा असलेला आहे. त्यापुढील अंगणात वीज पिळून त्याचे सडे घातले आहेत असा अलौकिक प्रकाश आहे. ही गृहरचना इंद्रनगरी वा सत्यलोकातील नगरांहून अति सुंदर व श्रेष्ठ दर्जाची आहे हे जाणवत होते. 

या द्वारकेची नवलता काय वर्णावी जिथे प्रत्यक्ष चिंतामणी रत्नाची चिंता मिटते , नव्हे त्यास येथूनच शक्ती प्राप्त होते. कल्पवृक्षांची जिथे रांग आहे आणि ती पाहताना स्वर्गीच्या कल्पवृक्षाला बळ येथेच प्राप्त होते. या द्वारकेतील सोन्याचा मुक्त वापर पाहून प्रत्यक्ष परिसाला आपली सिद्धी जडत्वासम भासते आहे. जणू तो आपली सिद्धी हरवून बसला आहे असेच वाटते आहे.  

द्वारकेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही प्रकारची दशा अस्तित्वातच नाही , अर्थात नकारात्मक बाबींना येथे थाराच नाही. दुःख दैन्य यांचा मागमूसही संपूर्ण द्वारकेत कोठेही पहावयास मिळणार नाही. येथे अमृताचे पाटच्या पाट वाहात आहेत , ज्यायोगे येथे काळालाही थारा दिसत नाही अशीच स्थिती आहे. 

अर्थात हे सत्यदेखील आहे. कारण जिथे प्रत्यक्ष श्रीकृष्ण पूर्णावतार रूपाने सिद्ध आहेत ते क्षेत्र , ती नगरी वैकुंठच आहे आणि जिथे वैकुंठ तिथे मृत्य येत नाही. कारण मृत्यूचा वास फक्त मर्त्यलोकीच. येथे प्रत्यक्ष आनंद स्वरूपात वास करत आहे. जो अष्टदिशेला वाऱ्या प्रमाणे रमलेला दिसत आहे. अशी ही उन्मुक्त नगरी द्वारका जणू भूलोकीचा स्वर्गच भासत होता. द्वारकाधीशाने प्रत्यक्ष वैकुंठ भूलोकी उतरवला आहे यात कोणतीही शंका द्विजवराला वाटत नव्हती. 

अश्या या विस्मयकारक , अद्भुत, रम्य , स्वर्गीय द्वारका नगरीची शोभा पाहून अचंबित झालेला तो द्विजवर मनात विचार करता झाला. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

१४/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...