Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३०

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३०

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
श्रीकृष्णाने कौंडिण्यपूरनगरात प्रवेश केला. द्वारकेचा राणा, ज्याने अद्वितीय द्वारका वसवली , तोदेखील अचंबित झाला , या नगरीचं वैभव , सुबत्ता , संपन्नता आणि थाट पाहून. या राज्याचा राजा भीमक हा स्वतः श्रीकृष्णाला कन्या देण्याच्या मताचा होता, तरीही रुक्मि या आपल्या पुत्राच्या भिन्न पण अतिरेकी मत आणि दुराग्रह यापुढे असा हतबल होता जसा , मोहापुढे विवेक हतबल होतो  अथवा मायेपुढे धैर्य. 

भीमकाने , मनात असूनही , पुत्राच्या दुराग्रहापुढे आपला निर्णय बदलून कन्या शिशुपालाला देण्याची संमती दिली. रायाने मनात विचार केला की जर भीमकीच्या भाग्यात योग असेल तर श्रीरंग स्वये येऊन तिला वरून घेऊन जाईल. अन्यथा जे होईल ते तिच्या भाग्याने. यापेक्षा अन्य काहीही , एक सार्वभौम राजा असूनही , भीमक करू शकत नव्हता. 

श्रीकृष्ण नगरीची शोभा बघण्यात दंग होते. नगरात प्रत्येक घरात तोरणं , पताका लावून , रंगरंगोटी करून, प्रत्येक घर व नगर शृंगारण्यात मग्न होते. प्रत्येक घरापुढे कुंकुमाचे सडे , त्यावर नक्षीदार रांगोळ्यांची आरास , गंध अक्षता यांची सजावट,   असा सर्व महोत्सव असल्या सारखा   थाट पाहून श्रीहरी विस्मित झाले होते.  नगरातील नर नारी नवनवीन वस्त्र अलंकार आभूषणे यांनी सजली होती,जणू काही प्रत्येक घरी कार्य आहे.  सर्वांची साजशृंगाराची लगबग बघण्यायोग्य होती. 

इकडे महालातसुद्धा जय्यत तयारी सुरू होती. प्रत्यक्ष रुक्मिणीच्या महालात, तिला विवाहासाठी सजवून तयार करण्यासाठी तिच्या सख्यांमध्ये चढाओढ लागली होती.
राजवाड्यातील मुख्य मंडपात चालू झालेला वेदघोष व मंत्रोच्चाराने समस्त राजप्रासाद व सभोवतालचा परिसर त्या नादाने भरला गेला होता. राजप्रसादाच्या मुख्य प्रवेशद्वारा पासूनच सनई चौघडा आदी मंगलवाद्ये , येणाऱ्या विविध राजेरजवाडे यांच्या स्वागतार्ह तुताऱ्या व ललकाऱ्या, त्यांचे आगतस्वागत याची लगबग अशी चहलपहल चालू होती.

या सर्वात , रुक्मिणीला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होता. हळद लावून झाल्यावर तिला मंगलस्नान घालण्यात आलं. पितांबरी रंगाची उंची पैठणी त्यावर नानाविध वस्त्र उंची आभूषणे  यांनी मूळ देखणी आणि लक्ष्मीस्वरूप असलेल्या रुक्मिणीला त्रिखंडातील सौन्दर्य प्राप्त झाले होते. 

परंतु त्या वस्त्र अलंकार यांनी सजलेल्या रुक्मिणीच्या चर्येवर चिंतेचेच भाव होते. याच विवंचनेत ती होती की , श्रीकृष्णाला पत्रिका मिळाली असेल का , ती पत्रिका श्रीकृष्णाने वाचली असेल ना , काय मत झालं असेल त्याचं , तो येणार आहे का.  एक ना अनेक कित्येक प्रश्न तिला या क्षणी पडले होते. 

इकडे मुख्य लग्नमंडपात नांदीश्राद्ध , देवकविधान , ब्राम्हणपूजन , स्वस्तिवाचन आदी विधींनी विवाह समारंभाला सुरुवात झाली.  चारही वेदांतील पारंगत ब्राम्हण येऊन त्यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पुरोहित मंडळी होमहवन इत्यादी विधींमध्ये मग्न आहेत. ग्रह शांतीचे विधी यथोचित पार पडत आहेत. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२९/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...