Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर २९

श्रीरुक्मिणी स्वयंवर २९

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
विश्वपालकाने निश्चय केला, रुक्मिणीला वरून घेऊन येण्याचा. मी स्वतः रणात उतरलो आणि शक्ती पणास लावली तर समस्त जगतास अविजेय आहे. त्यामुळे मी स्वतः एकटा जाऊन रुक्मिणीस , तिचा बंधू रुक्मि , चैद्यराज शिशुपाल आणि मगध नरेश जरासंध यांना परास्त करून आणि येणाऱ्या सर्व अडचणींना उलथवून रुक्मिणीस एका हाती घेऊन ये येण्यास समर्थ आहे. 

रुक्मिणीच्या मनाविरुद्ध रुक्मिने आरंभलेल्या या विवाहात हस्तक्षेप करीन. माझा कोप झाल्यास मी श्रीपती हे नाव सार्थ करतो हे त्रिभुवन जाणते. जसे दोन काष्ठ घर्षण करून अग्नी प्रकट करता येतो, तसा मी रणी अग्निसम तळपुन शिशुपालादिक सर्वांचा निःपात करीन आणि पवित्र रुक्मिणीस , त्या अपवित्र हातात पडण्यापासून वाचवीन. तस्मात त्वरेने निघावे , हेच उत्तम.

द्विजाला सिद्ध होण्यास सांगून आपण शयनगृहा बाहेर पडून सिद्ध होण्यास पातला. स्वतः महालाबाहेर जाऊन दारूक नावाच्या आपल्या विश्वासू सारथ्याला त्वरित तयार होऊन रथ जोडून राजप्रसादाबाहेर उभे राहण्यास सांगितलं, आपल्याला लगोलग कौंडिण्यपुरला प्रस्थान करायचे आहे.  दारुकाला स्पष्ट सूचना दिली की कोणालाही कळू देऊ नकोस की आपण निघालोय का आणि कुठे. 

दारुकाने चार पुरुषार्थाचे प्रतीक चार अश्व शैब्य , सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प यांना जोडून रथ तयार केला. या सर्वोत्तम अश्वांची ख्याती मनोवेगे दौडण्याची होती.  रत्नजडित सुवर्णरथाला गरुडाचा ध्वज आणि अग्निसम तळपणाऱ्या भगव्या रंगांच्या पताका लावलेल्या होत्या. दारुकाने संपूर्ण रथ अस्त्र शस्त्र यांनी भरून तयार ठेवला.  सर्व प्रकारची दिव्य अस्त्र असलेले शर व चाप, त्रैलोक्य विजयी गदा, अनेक खड्ग आणि इतरही अस्त्र आणि शस्त्र युक्त रथ तयार झाल्यावर दारूक हात जोडून श्रीकृष्णाच्या येण्याची वाट पाहू लागला.
 
मयूरपृच्छ मुकुटधारी  भाळी त्रिपुटीगंध , पितांबर नसलेला, मेघवर्णी , आकाशी रंगाचे उपरणे अंगी भरजरी वस्त्र , उपरण्याचा एक पदर आपल्या मनगटावर उतरलेला त्रिजगताधिपती द्वारकाधीश श्रीकृष्ण लगबगीने येऊन रथावर बसला. आपल्या शेजारी द्विजवराला बसवून दारुकाला रथ हाकण्याची आज्ञा देता झाला. 

विश्वातील सर्वोत्तम अश्व आणि सारथी विलक्षण वेगात निघालेले. आपल्या धन्याची मनःस्थिती माहीत असलेले अश्व आणि सारथी काहीही सूचना न करता वायूवेगे चालले आहेत. वाटेतील पर्वत , नद्या, दऱ्याखोरी हे जणू दिसता दिसता गायब व्हावे इतक्या विलक्षण वेगातील ते अश्व जोडलेला रथ कौंडिण्यपूर नगरात दाखल झाला. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२८/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...