Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर १२

श्रीरुक्मिणी स्वयंवर १२ (प्रथम प्रसंग / अध्याय समाप्तीचा भाग असल्यामुळे थोडा मोठा आहे) 

llश्रीगणेशाय नमःll

  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
अहंभाव पूर्ण उगाळून आणि नन्तर तो टाकून  उरलेला सोहम भाव घेऊन त्याचं शुद्ध चंदन तयार करून त्या चंदनाचा मळवट श्रीकृष्णाच्या भाळी लावला आहे. त्यामुळे तिथे फक्त शुद्ध सात्विक समर्पण दृष्टीस पडते. बाकी सर्व मिथ्या भाव वर्ज्य झाले आहेत. नव्हे तर ते अस्तित्वातच नाहीत. अवकाशातील मेघांची बारीक बारीक  मुळं असलेले कुरळे कुरळे काळेभोर केश पवनामुळे हलताना  कृष्णमूख झाकण्यास्तव मुखाकडे झेपावत आहेत असच भासत होतं.  त्या झेपावणाऱ्या केसांना एकत्र बांधण्यास्तव सहजभावाचा मुकुट कृष्णमस्तकी विराजित आहे. त्यामुकुटामध्ये एक मयूरपुच्छ अर्थात मोरपीस खोवलेले दुरुनही शोभत आहे , साजिरे दिसत आहे. 

अश्या अनेकविध सद्गुणरुपी अलंकारांनी सुशोभित दिसणाऱ्या त्या कृष्णरूपाला पाहण्याची गोडी ही विशेष आहे. असे लावण्य त्या हरिरूपाचे की पाहणाऱ्याला पिसे यावे आणि पाहता पाहता त्या सदभक्ताचेच मोरपीस व्हावे. अशी अनंत मोरपीसरुपी भक्त आपल्या सर्वांगी बाळगणारा श्रीकृष्ण परमात्मा जगतपालक आहे. यांच्या सौन्दर्याची काय थोरवी वर्णू. आपल्या सुंदरतेचा रूपाचा अभिमान असलेला मदन. परंतु श्रीकृष्णाचं हे अद्भुत मनोहर रूप पाहून आपल्याच देहाचा त्याला वीट आला इतका तो मोहित झाला. सर्व जगतात मीच बरवी हा अभिमान देवी लक्ष्मीला देखील होता पण ज्या क्षणी कृष्णरुप देखती झाली तिला आपला कमीपणा जाणवला. 

कृष्णरुप पाहताच लक्ष्मी देखील या पायांची दासी होण्यास सिद्ध झाली. कृष्णाचं रूप पाहणारे अजून मंत्रमुग्ध होऊन त्या रुपाकडे आकृष्ट होऊन त्या पायांना मिठी घालून साद घालत की हे पाय आता कधीच सुटणे हाऊ नये. ब्रम्हवृंदाची तर हरीच्या हृदयात सदाचीच वस्ती असे.  कृष्णरूपाला पाहण्यास नेत्राना जिव्हा आणि जिव्हेला नेत्र प्राप्त झाले, श्रवण स्वतः कानात येऊन बसले. हरिकथा श्रवण हे अमृत प्राशनाहून श्रेष्ठ आहे. त्यामुळे हरिकथा श्रवण  करणारे अलौकिक पुण्याचे धनी होत आहेत. पण त्याच वेळी अमृत प्राशन करून अमर झालेले जीव या दर्शनास मुकले त्यामुळे काळाला सुद्धा त्यांची कीव करावीशी वाटली. 

वेद वाङ्मय इंद्राची स्तुती  गातात.परंतु हा श्रीकृष्ण इंद्राचाही इंद्र आहे. अगदी इंद्रपदसुद्धा क्षय पावणारं आहे.पण कृष्ण नरेंद्र पद हे अक्षय अविनाशी आहे.  असुरांना ज्याचा हेवा वाटतो आणि सूर स्वतः ज्याची भक्ती करतात, असा तो श्रीकृष्ण व त्याचे हरिपद हे  प्रत्यक्ष इंद्रादी देवांना सुद्धा अप्राप्य आहे. कंसाच्या वाढत्या अत्याचाराला त्याच्या जागी पोचवून धर्मस्थापन करण्यास्तव प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच कृष्णजन्म घेऊन धर्मकार्य केले. 

कृष्णाची उदारता काय वर्णावी. जे प्रत्यक्ष देवकी व वसुदेव यांनाही प्राप्त झालं नाही, ते मोक्षपद पुतनेला निव्वळ हरीकडून मृत्यू आल्यामुळे प्राप्त करून दिलं. अशी ही उदारता जी अरी आणि सखा असा भेद करत नाही. हीच उदारता शरणी व मरणी या दोहोनाही समानपणे मोक्षाप्रत स्वये घेऊन जाते.  त्याच उदारतेचा सारांशरूप आणि तोच हा वैकुंठाचा स्वामी, भक्त हृदयी विराजित व भक्त ज्याच्या हृदयात वास करत आहेत, असा हा त्रैलोकीचा नाथ म्हणजेच श्रीकृष्ण. जो प्रथमतः स्वरूपात व पूर्णरूपात अवनीवरती प्रकट झाला आहे. 

ज्याच्यासाठी भक्त साद म्हणजे भक्त आज्ञा आहे आणि त्यासाठी जो काहीही करू शकतो. प्रत्यक्ष स्तंभिसुद्धा प्रकटून भक्तरक्षण करू शकतो. असा हा जगतपालक कृपाळू यदुवीर म्हणून जन्म घेता झाला आहे. ज्याचं गुणवर्णन करणं हे खरतर शब्द भाव यांच्या पलीकडे आहे. अश्या या कृष्णचरणी माथा म्हणजे योगीयांचा योग, योगनिद्रेची प्राप्ती आणि समस्त जन्मातील पापापासून मुक्ती आहे. 

असे हे अलौकिक, अवीट, अद्वितीय, अवर्णनीय व  अद्भुत हरिगुण वर्णन कथन श्रवण ऐकताच भीमकीच्या मनात त्याचे शब्दचित्र निर्माण झाले. बाह्य जगताची आवड एकाएकी नाहीशी होऊन अंतर्मनात कृष्ण कृष्ण असा शब्द उमटू लागला. या अश्या अवस्थेत पोहोचलेल्या रुक्मिणीच्या अंगावर रोमांच उभे राहिले, कंठात बाष्प जमा होऊन घशास कोरड पडू लागली आणि अचानक शरीराला कंप सुटून रुक्मिणीचा स्वतःवरील ताबा गेला आणि ती मूर्च्छित होऊन  धरेवर अंग टाकती झाली. 

सेविकांनी धरून तिला आपले महाली नेली. राजा भीमकाला या गोष्टीची कल्पना आली की, रुक्मिणीला कृष्णबाधा झाली आणि या गुणवर्णनातीत असलेल्या श्रीकृष्ण अर्थात यदुवीर यांच्या प्रथम श्रवणी प्रेमात पडलेल्या आपल्या कन्येला श्रीकृष्णाला अर्पण करून तिचा मंगलमय विवाह श्रीपती अर्थात त्रिजगताचा पालक श्रीकृष्ण याला रुक्मिणी अर्पून तिच्या जन्माचे कल्याण करावे. आपला हा विचार राजानें राणी श्रद्धा हिला बोलून दाखवला. अर्थातच झाल्या प्रकाराने राणीला देखील हेच मनात आले होते. त्यामुळे तिनेही यास त्वरित दुजोरा दिला. 

परंतु रुक्मिणी बंधू रुक्मि हा स्वतः कृष्णाचा द्वेष करत असे. या गवळ्याच्या पोराला माझी सुस्वरूप भगिनी द्यावी हे त्यास रुचत नसे. तो सदैव कृष्णाची निंदा करत असे. परंतु वागेश्वरी स्वतः प्रभूंची निंदा ऐकून त्यानुसार अर्थोच्चार करण्यास धजावत नसे. म्हणूनच रुक्मिच्या निंदानालस्तीपर शब्दांना ती स्तुतीत परिवर्तित करत असे. कारण हरीनिंदेचे पाप घेण्यास ती धजावत नसे. 

अश्या प्रकारे निंदेचे परिवर्तन स्तुतीत होत असे. 

या ठिकाणी प्रथम प्रसंग समाप्त होत आहे. 

वाचकजन याच एकाग्रतेने पुढील कथाभागसार ग्रहण करावे ही नम्र विनंती. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

०८/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...