Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर २५

श्रीरुक्मिणी स्वयंवर २५

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
 तू हासुद्धा विचार करशील की, हे कसले लग्न यात विधी नाही, मानपान नाही, अंतरपाट नाही, मंगलाष्टके नाहीत, सप्तपदी नाही. ज्यात काहीही धार्मिक सोहळा नाही , सरळ मुलगी उचलून घेऊन यायचे, हा कसला लग्नसोहळा हे कसलं कार्य, ही कसली रीत. बरं एवढं सगळं करून सुद्धा जनात काय सन्मान राहील अर्थात हे लौकिकास साजेसे नाही. 

ह्या सर्वात मानपान तर नाहीतच उलट युद्ध प्रसंग ओढवून घेऊन आहेर म्हणून दोन्हीकडून एकमेकांना बाणाची भेट चढवतील, बाणांचेच हार घालतील आणि बाणांचाच मानपान करतील. काय अर्थ या सर्वाला आणि काय मिळणार इतकं सर्व करून. असाही विचार तुझ्या मनाला शिवू शकेल. तर त्याविषयीचे विधिविधान, जनरीती व पद्धती काय हे ही मी जाणून आहे.

तुझा विचार असेल की असे विधींशिवाय झालेले विनाविधी लग्न काय संमत असेल का. तर ऐक. शास्त्र व जनरीतीनुसार पिशाच्च , गांधर्व ,  असुरी हे काही विवाहप्रकार प्रचलित आहेतच. राजे महाराजे हे स्वयंवर पद्धतीने विवाह करतात. ब्राम्हण हे पाणिंग्रहण अर्थात विधीयुक्त पद्धतीने विवाह करतात. पण तुझ्यासारखे शूरवीर रणात जिंकून राक्षस पद्धतीनेच विवाह करतात. नव्हे तर त्यांना तसाच विवाह शोभायमान आहे. तुदेखील त्याच पद्धतीने मला वरावेस.

हे सार्थनायका, तुला मी जागृती , स्वप्नी आणि सुषुप्ती या सर्वच अवस्थेत पुजले आहे , आपला मानलं आहे. नित्य तुझीच आराधना मी केली आहे, ज्या वेळेपासून तुझ्या स्वरूपाविषयी मी सत्य जाणले आहे. मी निमिशमात्र देखील तुला विसरू शकत आणि इच्छित नाही, इतकी मी तुझ्या ओढीने ओढले गेले आहे. हे विरा , मी तुझ्याविषयी जाणून इतकी आकंठ बुडाले आहे, तुझे मर्म जाणून, की आता मी स्वतःला यत्किंचितही थांबवू शकत नाही. 

हे लिहीत असतानासुद्धा मला आत्यंतिक मानसिक थकव्यामुळे ग्लानी येत आहे आणि त्याच अवस्थेत मी हे लिहीत आहे , डोळ्यात व हातात प्राण आणून.त्यामुळे तू हे अव्हेरू नयेस हाच आर्जव तुझ्या चरणी आहे. आता पुढे काय सांगते ते कंटाळा येऊ न देता तू ऐक.  हे पुरुषोत्तमा, तुझ्या पुरुषार्थाच्या ओजाचा अंश अर्थात तुझ्या वीर्याचा अंश मात्र, मला दे आणि त्यासाठी मला तुझ्या पायाची दासी जरी केलेस तरीही मी जन्म धन्य झाला असेच मानेन. यासाठी कोणताही त्याग करायची माझी तयारी आहे. 

अंतःपुरांतरचरितमनिहत्य बंधुंस्त्वामुद्वहे 
कथमिती प्रवदाम्युपायम ll 

पूर्वेद्युरस्ती महती कुलदेवीयात्रां यस्यां बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात ll ६ ll

तू हा देखील विचार करशील की, ही नववधू जी कोणालाही दिसू शकत नाही, ती महालातील अंतःपुरात असेल आणि प्रथा परंपरा यांप्रमाणे ते सत्यही आहे. पण तरीही, अश्या स्थितीतदेखील, तू मला न्यावयास अंतःपुरापर्यंत धावून येशीलही, कारण तू सर्वशक्तिमान व युक्तिमान आहेस. पण तू मनात हादेखील विचार करू शकतोस वा करशील की या प्रयत्नात माझे बंधू जे यामध्ये आडवे येतील त्यांना तुला माझ्याकरिता विनाकारण वधावे लागेल. का हा रोष पत्करावा. का या पापाचे धनी व्हावे हहे देखील तुझ्या मनाला शिवू शकेल. 

परंतु याचाही उपाय मी योजलाय तो तू ध्यानपूर्वक ऐक. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२४/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...