श्रीरुक्मिणी स्वयंवर १५ (द्वितीय प्रसंग समाप्ती)
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
याच मनस्थितीत रुक्मिणी विचार करते आहे की, आता कोणत्या इष्टदेवतेची पूजा अर्चना करू , कोणत्या देवालयाला जाऊन येऊ, कोणत्या देवतेला नवस करू, कोणते व्रत वैकल्य करू, जेणेकरून श्रीकृष्ण हे नाथ म्हणून मला प्राप्त होतील. ही काय माझ्या दैवाची गती आहे, हा काय दुर्दैवाचा फेरा आला आहे, हे काय पाप तापाचरण फला आले आहेत की, ज्यायोगे रुक्मिला ,माझ्या बंधुला, ही दुर्बुद्धी सुचली आहे. त्याच्या विवेकाला हे काय ग्रासले आहे, ज्याकारणे तो असा भ्रष्ट होऊन बोलत आहे.
एखाद्या विवेकी वैराग्याप्रमाणे मी आत्मतेज जागृत करून सर्व अडीअडचणी यांना झेलून कृष्णप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. एकदा कृष्ण प्राप्ती हेच ध्येय निश्चित केल्यानंतर, सर्व वृत्ती तदाकार करून, स्वकीय व परकीय अश्या कोणत्याही व्यक्तीच्या विरोधाचा विचारही न करता, कार्य करेन आणि ध्येय प्राप्तीसाठी सिद्ध होईन. पण हा माझा निश्चयाचा विचार आणि याबद्दलचे माझे मन व त्याची गत ही कोणाजवळ मी बोलून दाखवू. ही सल मी कोणाला सांगू. कदाचित मातेला ? पण नकोच कारण माता हे सर्व जाणून अजूनच दुःखी व कष्टी होईल , तिला या सर्वांचा विचार करून रडू येईल आणि कदाचित तिच्या मोहात माझे ध्येय मी हरवून बसेन. हे नकोच करावयास.
या विचाराने ग्रासलेली रुक्मिणी आपल्या कुलदेवतेचा धावा करते आहे, सतत विचार करते आहे, आपल्या दैवगतीला कोसते आहे. आपल्याच ध्येयासाठी काय मार्ग सुचेल त्याचाच विचार करते आहे. ज्याला आपण म्हणू शकतो की एकाच गोष्टीचा ध्यास घेणे , या स्थितीप्रत पोचली आहे. याच अवस्थेत ती कोण काय करू शकेल याचा विचार करते आहे. प्रत्येक विचारानंतर डोळ्यासमोर बंधू रुक्मिचा राग येतो आहे. कारण प्रत्येक विचारा वा उपायाबरोबर तो अयशस्वी होण्याचा वा करण्याचा रुक्मिचा प्रतिडाव काय असू शकेल याचाही विचार येतो आहे.
म्हणजेच असा काय उपाय योजावा जेणेकरून मार्ग निघेल आणि रुक्मिला कळणार नाही, तरीही आपली स्थिती कृष्णाप्रत पोचेल. याच विचारात असताना तिला आपल्याच दोन ब्राम्हण सखींची आठवण येते. त्या दोघीनाही बोलावून ती आपल्या मनातील गोष्ट व त्यावर उपाय, यावर विचार करते. त्यांना सांगून त्यांच्यातीलच एक आप्त असलेला ब्राम्हण जो सुजाण आहे, जो कोणत्याही स्थितीला धैर्यपूर्वक तोंड देऊन, आपला संदेश श्रीकृष्णांना पोहोचता करेल, अश्याच एकाला पाचारण करते. त्याहाती आपल्या मनः स्थितीची आर्तता, सात श्लोकांमध्ये व्यक्त करणारा एक पत्रिकारूप संदेशपत्र, त्या सुज्ञ ब्राम्हणाहाती श्रीकृष्णाला देण्यास्तव सुपूर्त करते. ज्यामध्ये तिने श्रीकृष्णाला विनंती केली आहे की त्याने आपल्या प्रेमाचा स्वीकार करून स्वये येऊन, आपली सुटका करावी.
या ठिकाणी द्वितीय प्रसंग समाप्त होत आहे.
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll
१२/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment