श्रीरुक्मिणी स्वयंवर १३
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
आतापर्यंत आपण श्रीकृष्णाची स्तुती वाचली, आता रुक्मिच्या विचारांची स्थिती पाहूया. पिताश्री भीमक यांच्या श्रीकृष्णाशी सोयरीक जोडण्याच्या विचारांवर घणाघात करत रुक्मि वदतो
श्रीकृष्णाशी शरीरसंबन्ध तोदेखील भगिनी रुक्मिणीचा. पिताश्री आपण या वयात काय चालवले आहे. म्हातारपणाचे छंद म्हणून सोडून देखील देता येत नाही. कारण रुक्मिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बर हा तुमचा श्रीकृष्ण तरी कोण आणि कसा? अहो ज्याने आपला सख्खा मामा मारला तो तुम्हा आम्हाला काय धड वागवणार. कोणी म्हणतात की हा नंदाचा तर कोणी म्हणतात की हा वसुदेवाचा पुत्र. म्हणजेच ज्याच्या पित्याचाही ठाव नाही अश्याशी सोयरीक हा विचारच अतर्क्य वाटतो मला.
पिताश्री याच्या कुळ गोत्र आणि जन्मपत्र यांचा देखील ठाव नाही, हा स्वतः स्वतंत्र कुठे आहे हा तर भक्तांवर अवलंबून म्हणजे परतंत्रच ना. बर ह्याचं कर्तृत्व तरी काय, सदोदित परद्वारी पडलेला, गोरसचोरी हेच याच कर्म , एक कार्य धड नाही सर्व धरसोड याचं , त्यात चित्ताची चोरी हे पण एक कार्य आहे याच्या नावावर. गायींपाठी धावता धावता पळण्याची कला जमली, ज्यामुळे कालयावनापुढे धावता धावता कर्मधर्म संयोगाने मुचकुंद ऋषींचे रक्षण करता झाला. इतकंच. अहो याला कसा वीर योद्धा म्हणायचं जरासंधाला भिऊन जो समुद्रतटी नवीन नगरी वसवून मथुरा गोकुळ हे आपलं जन्मस्थळ सोडून पळाला.
अहो केशिया मारला गेला आपल्या मरणाने, बैल मारला संकट ओढवून घेतलेलं म्हणून, यावरच वीर ठरवायचं का याला. वत्सासुर म्हणून वासरू मारलं, बकासुर म्हणून एक पाखरू मारलं आणि अघासुर म्हणून एक किरडू मारलं याने.
या कृष्णाने कधीही कोणती गोष्ट उघडपणे केली सांगा मला. हा लपण्यात चतुर आणि हुशार आहे. आता त्याची लपण्याची स्थानं तरी ऐका. वैकुंठाच्या पहाडावर बसायचं किंवा क्षीरसागरात बुडी मारून राहायचं किंवा निद्रेच्या मिषाने शेषाच्या फण्यावरती चढून बसायचं. अहो विघ्न पाहताच हा मत्स्य किंवा सुकर अर्थात वराह व्हायचा किंवा पाठ टणक करून कमठाचे अर्थात कासव रूप घ्यायचा.
हा भारीतला भारी दैत्य पाहून खांबात दडून बसला आणि गुर गुर करायला लागला. बळे बळे बाहेर काढला तर नरसिंह रूप घेतलं. अहो बलवान दैत्य पाहून हा भिकारी झाला पण त्याच बळीने याला बांधून आपलाच द्वारपाल केला. सर्व मायेचा खेळ आहे. ऋषींचे रूप धारण करून आपणच सर्व दैत्यांशी वैर धरलं, इंद्राच्या गाईचं रक्षण करण्याचं वचन दिलं. त्याच दैत्यांनी याची माय मारली मग लागला हा रडायला. त्यानंतर काय केलं ते ऐका. आपणच दुर्लक्ष करून पत्नी घालवली, नन्तर काही वानरे जमवून तिला मिळवली आणि वर श्रेय देखील आपणच घेतले. आता या जन्मांतच बघा. गवळ्यांपुढे नाचगाणं करणं हाच याचा छंद.
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll
०९/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment