श्रीरुक्मिणी स्वयंवर २७
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
हे जनार्दना ही पत्रिका वाचताच यातील माझ्या आर्जवा प्रमाणे तू त्वरित येणे करावेस, हा माझा जीवाचा कळवळा आहे, नव्हे अंतःकरणापासून घातलेली साद आहे. या माझ्या प्रार्थनेनुसार तू मला तारण्यास्तव येणार नसलास तर निदान मला मृत्यु देण्यास तरी यावेस. कारण तुझीच प्रतिमा मनात , तुझेच चिंतन हृदयात आणि तुझ्याच प्राप्तीची इच्छा आकांक्षा आत्म्यात असताना, मी तुझ्याव्यतिरिक्त दुसरे काहीही स्वीकारू शकत नाही.
असे अर्थहीन जगणे आणि निर्जीव देह वृथा पृथ्वीवर जीवित ठेवून मी काय करू? , अजून भूभार वाढवू?, ते अशक्य आहे. अश्या या शुष्क जगण्याला काहीही अर्थ नाही. किंबहुना तुझ्याच हातून मृत्यू आल्यास निदान परलोक तरी सुखात जाईल. परंतु तुझ्याशिवायचे जगणे आता क्षणमात्रही नको आहे यादवराया.
या पत्रिकेतील माझ्या आर्जवाचा विचार आहे, त्यानुसार न घडल्यास वा तू न घडवल्यास या देहाला अजून व्रतवैकल्ये , उपासतापास या मार्गानी हळू हळू शुष्क करीन. जर इतर काही विपदा आलीच वा अन्य काही अघटित घडण्याची वेळ आलीच तर मात्र मी या देहाला संपवून आत्मरूपे तुझ्या चरणांवर येईन. परंतु आता हा देह व देहासहित आत्मा मात्र केवळ तुलाच आपले मानतो आणि तुलाच मी तन मन व प्राण यांनी वरले आहे.
ब्राम्हण उवाच
इत्येते गुह्यसंदेशा यदुविरा मयाssहृता विमृश्य कर्तुं यच्चात्र क्रियतां तदनंतरम ll
द्विजवर म्हणाला, हे यदुवीरा, आपल्यापर्यंत येण्याचे जे प्रयोजन देवी भीमकी यांनी योजिले होते, त्या सद्हेतुप्रित्यर्थ हा गुह्यसंदेश अर्थात देवींचा आर्जव आपणाप्रत पोहोचवण्याचे कर्तव्य मी केले. परंतु त्या नगरीचा रहिवासी या नात्याने माझे अजून एक उत्तरदायित्व आहे. ते ही तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे. आपणास हात जोडून इतकेच नम्र निवेदन आहे की , या आर्जवाचा सविवेक , सद्हेतु ध्यानी घेऊन, देवीच्या म्हणण्याचे मर्म जाणून, पुण्यपर परिणाम जाणून त्वरेने विचार व्हावा. इतके बोलून ब्राम्हणाने यदुवीरांचे चरण धरून त्यांवर अश्रूअभिषेक केला.
यदुनाथाने दोन्ही करांनी द्विजास उचलून मौखिक आश्वस्त केले आणि निजावयास सांगितले. परंतु हे भीमकीचे भावकथन वाचून , भीमकीचे चरित्र व चित्र डोळ्यापुढे दिसावयास लागले. इतके भासानुभव श्रीकृष्णास होऊ लागले की, ते वेगे व आवेगे आलिंगन देण्यास धावू लागले. जीवाची सतचित ओळख पटण्यास निमित्त हवे होते तसेच घडले. ही चिठ्ठी वा पत्रिका हे एक निमित्तमात्र घडले. पण हरीने जे ओळखले त्याने , पंचमहाभूतरुप वैकुंठनाथ अविचल झाले.
क्षणोक्षणी रुक्मिणीच्या लोचनातून ओघळणारे अश्रू दिसू लागले. हरी हरवून गेले. मन बोलू लागले,डोलू लागले
कैसी विपदा आणलीस काळा
मज रुक्मिणीचा लागला लळा
कैसे कथीले तिने प्रितीने सारे
ते नयन प्रतीक्षेत, द्वारी पहारे
हे मोडून बंध देहाचे वाटे मज
जावे उडून विदर्भी त्वरे आज
किती आर्जव हा लिहिला पत्री
मज ठाऊक हे रिपू बाजू सर्वत्रि
भय न बाळगताही कथीले सारे
द्विज उत्तम पाहून धाडीले वा रे
जाईन जाण तीज आणण्यास
त्वरे घेऊनी गुप्तमार्गे वरण्यास
काळा धाड तीज त्वरे हा संदेश
वरण्यास तिला येत आहे द्वारकेश
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२६/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment