Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर २७

श्रीरुक्मिणी स्वयंवर २७

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
हे जनार्दना ही पत्रिका वाचताच यातील माझ्या आर्जवा प्रमाणे तू त्वरित येणे करावेस, हा माझा जीवाचा कळवळा आहे, नव्हे अंतःकरणापासून घातलेली साद आहे. या माझ्या प्रार्थनेनुसार तू मला तारण्यास्तव येणार नसलास तर निदान मला मृत्यु देण्यास तरी यावेस. कारण तुझीच प्रतिमा मनात , तुझेच चिंतन हृदयात आणि तुझ्याच प्राप्तीची इच्छा आकांक्षा आत्म्यात असताना, मी तुझ्याव्यतिरिक्त दुसरे काहीही स्वीकारू शकत नाही. 

असे अर्थहीन जगणे आणि निर्जीव देह वृथा पृथ्वीवर जीवित ठेवून मी काय करू? , अजून भूभार वाढवू?, ते अशक्य आहे. अश्या या शुष्क जगण्याला काहीही अर्थ नाही. किंबहुना तुझ्याच हातून मृत्यू आल्यास निदान परलोक तरी सुखात जाईल. परंतु तुझ्याशिवायचे जगणे आता क्षणमात्रही नको आहे यादवराया. 

या पत्रिकेतील माझ्या आर्जवाचा विचार आहे, त्यानुसार न घडल्यास वा तू न घडवल्यास या देहाला अजून व्रतवैकल्ये , उपासतापास  या मार्गानी हळू हळू शुष्क करीन. जर इतर काही विपदा आलीच वा अन्य काही अघटित घडण्याची वेळ आलीच तर मात्र मी या देहाला संपवून आत्मरूपे तुझ्या चरणांवर येईन. परंतु आता हा देह व देहासहित आत्मा मात्र केवळ  तुलाच आपले मानतो आणि तुलाच मी तन मन व प्राण यांनी वरले आहे. 

                                 ब्राम्हण उवाच

इत्येते गुह्यसंदेशा यदुविरा मयाssहृता विमृश्य कर्तुं यच्चात्र क्रियतां तदनंतरम ll 

द्विजवर म्हणाला, हे यदुवीरा, आपल्यापर्यंत येण्याचे जे प्रयोजन देवी भीमकी यांनी योजिले होते, त्या सद्हेतुप्रित्यर्थ हा गुह्यसंदेश अर्थात देवींचा आर्जव आपणाप्रत पोहोचवण्याचे कर्तव्य मी केले. परंतु त्या नगरीचा रहिवासी या नात्याने माझे अजून एक उत्तरदायित्व आहे. ते ही तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे. आपणास हात जोडून इतकेच नम्र निवेदन आहे की , या आर्जवाचा सविवेक , सद्हेतु ध्यानी घेऊन, देवीच्या म्हणण्याचे मर्म जाणून, पुण्यपर परिणाम जाणून त्वरेने विचार व्हावा. इतके बोलून ब्राम्हणाने यदुवीरांचे चरण धरून त्यांवर अश्रूअभिषेक केला. 

यदुनाथाने दोन्ही करांनी द्विजास उचलून मौखिक आश्वस्त केले आणि निजावयास सांगितले. परंतु हे भीमकीचे भावकथन वाचून , भीमकीचे चरित्र व चित्र डोळ्यापुढे दिसावयास लागले. इतके भासानुभव श्रीकृष्णास होऊ लागले की, ते वेगे व आवेगे आलिंगन देण्यास धावू लागले. जीवाची सतचित ओळख पटण्यास निमित्त हवे होते तसेच घडले. ही चिठ्ठी वा पत्रिका हे एक निमित्तमात्र घडले. पण हरीने जे ओळखले त्याने , पंचमहाभूतरुप वैकुंठनाथ अविचल झाले. 

क्षणोक्षणी रुक्मिणीच्या लोचनातून ओघळणारे अश्रू दिसू लागले. हरी हरवून गेले. मन बोलू लागले,डोलू लागले

कैसी विपदा आणलीस काळा 
मज रुक्मिणीचा लागला लळा

कैसे कथीले तिने प्रितीने सारे
ते नयन प्रतीक्षेत, द्वारी पहारे

हे मोडून बंध देहाचे वाटे मज
जावे उडून विदर्भी त्वरे आज 

किती आर्जव हा लिहिला पत्री
मज ठाऊक हे रिपू बाजू सर्वत्रि

भय न बाळगताही कथीले सारे
द्विज उत्तम पाहून धाडीले वा रे

जाईन जाण तीज आणण्यास
त्वरे घेऊनी गुप्तमार्गे वरण्यास

काळा धाड तीज त्वरे हा संदेश 
वरण्यास तिला येत आहे द्वारकेश

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२६/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...