Skip to main content

जानकी पुनःवनवास ५५

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ५५ रामराज्याभिषेक सोहळा

अवघ्या ब्रम्हांडाला ज्या घटनेचे, ज्या महासोहळयाचे  ज्या महापर्वणीचे वेध लागले होते, ती घटिका प्रत्यक्ष समोर हात जोडून  उभी आहे. ब्रम्हवृंदासह महर्षि वशिष्ठ नियोजित स्थळी आगमन करते  झाले. सभागृहात प्रचंड जनसमुदाय महर्षिनच्याही आधी येऊन स्थानापन्न  झाला आहे. महर्षिनी आधीच पुढे धाडलेल्या शिष्यागणाने होम हवन, यज्ञयाग इत्यादीची पूर्ण तयारी केली. यथास्थित पुजेस्तव फुले, पत्री, चांदीची पळी पंचपात्रे , ताम्हणं, यज्ञाला लागणारा  सर्व शिधा व सामग्री त्या त्या क्रमांकानुसार मांडून तयार आहे. चांदीच्या पात्रामध्ये ताज गोमूत्र, सप्तसिंधू व साप्तनद्यांच जल अनेक घागरी भरून तयार आहे. ते थोड्याच अवधीत उपस्थित करण्याचं कार्य अर्थात हनुमंत आणि अंगद आदी वानरगणांनी मोठ्या हर्षाने पार पाडले. कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही याची यजमान म्हणून भ्राता भरताने स्वतः जातीने पाहणी केली. याव्यतिरिक्त आलेल्या , येणाऱ्या सर्व अतिथींची विशेष व्यवस्था, व संरक्षण, ते देखील रघुकुल परंपरे अनुसार , आहे पाहण्याची जबाबदारी लक्ष्मण व  शत्रुघ्न यांजवर सोपवण्यात आली आहे.

आणि ज्या क्षणाची प्रतीक्षा समस्तास होती ती घटीका आली आणि  प्रत्यक्ष प्रभू श्रीराम , रमेसह (जानकी) रेशमी वस्त्र, अलंकार,  यांसह राजमहालातून सभास्थानी प्रवेश करते झाले. हे पाहिले आणि जनसमुदाय प्रभू रामचंद्र आणि देवी जानकी यांचा विजय असो या गजरात हर्षाधीश झाला. त्यासमवेत तीनही माता , तीनही स्नुषा व परिवारातील इतर सन्मान्य सदस्य प्रवेश करते झाले आणि मुख्य विधींना महर्षींनी सुरवात केली. प्रभू श्रीराम व देवी जानकी यांना पूजास्थानी आसनस्थ होण्यास सांगून महर्षी वसिष्ठांनी सर्व मान्यवर सदस्य व मातांना स्थान ग्रहणाची विनंती केली. सर्व सोपस्कार  विधिवत स्थानापन्न झाल्यावर, यथासांग पूजेस प्रारंभ झाला.

प्रथम गणेश पूजन , कलश पूजन नारायण आणि लक्ष्मी पूजन ,प्रत्यक्ष त्यांच्याच हस्ते अवतार रूपात होत होते हा विलक्षण क्षण होता. त्यानन्तर मंत्रघोषात व उच्चारवात ग्रहशांति यज्ञ उदकशान्ति यज्ञ यथासांग पार पडले. तदनंतर सप्तसिंधूच्या व तत्पश्चात सप्तनद्यांच्या जलाने प्रभू श्रीराम यांना अभिषेक करण्यात आला. महर्षी वसिष्ठ स्वतः वेदातील ऋचा व सूक्त यांचे पठण करून मंत्रोच्चारासह प्रभुना अभिषेक करत होते. प्रत्येक जलपात्र उचलल्यानंतर त्या त्या सिंधूचा व त्या त्या सरितेचा नामोल्लेख करून विधिवत अभिषेक संपन्न झाला. प्रभुना आणि देवी जानकीना महर्षींनी राज्याभिषेकासाठीचे वस्त्र व अलंकार परिधान करून पुनः येण्यास सांगितले. त्यानुसार प्रभू आणि देवी जाण्यास निघाले आणि पुन्हा उपस्थित जनसमुदायाने जयघोष सुरु केला.

नियोजित वेळी पुनश्च प्रभूश्री राम  पितांबर , जाम्भळ्या रंगाचं रेशमी उपवस्त्र परिधान करून गळ्यात मोत्याच्या  आणि सोन्याच्या  अनेक माळा इतर अनेक अलंकार,  हाती धनुष्य आणि पाठीला बाणाचा भाता , कमरेच्या सुवर्ण पट्ट्याला शृंगारीत म्यानात सज्ज खडग आणि पायात गुलाबी रंगाच्या मोजड्या अश्या राजस वेशात तर देवी जानकी गर्भरेशमी वस्त्रासह आणि नखशिखांत अलंकृत जणू प्रत्यक्ष देवी लक्ष्मी भूलोकी अवतरून यावी अश्या तेजस्वी रूपात उपस्थित झाले, आणि  जनसमुदायाचा आनंद अत्युच्च पातळीला पोहोचला. पुन्हा जय जयकाराच्या ललकार्या झाल्या.

स्वतः महर्षी वसिष्ठ यांनी प्रभूंचा हात हाती धरून , खास तयार करून घेतलेल्या सवर्णरत्न जडित सिंहासनापर्यंत नेलं. तिथे पोहोचल्यानंतर पुन्हा मंत्रोच्चारांचा विधी आणि सिंहासन पूजन  करण्यात आल. ज्या क्षणाची समस्त ब्रह्मांड आतुरतेने प्रतीक्षा करत होत आणि ज्या क्षणासाठी रामावतार कार्याचा प्रारंभ महाविष्णुंनी केला होता तो अलौकिक क्षण आला. महिर्षीनी मंत्रोच्चार संपवून प्रभूंचा हात पुन्हा हाती घेतला आणि त्यांना स्वहस्ते रघुकुलाच्या पवित्र आणि मंगल सिंहासनावर विराजमान केलं. आणि सर्व बाजूनी जयघोष झाला. वाद्ये, तुताऱ्या, नगारे, दुमदुमू लागले. हर्षोल्हासाच पर्व सुरु झालं.

राजाधिराज अयोध्यापती महाराज श्री रामचंद्र यांचा विजय असो

महाराज्ञी देवी जानकी यांचा विजय असो.

स्वर्गातून, ब्रह्मलोकातून, विष्णुलोकातून , कैलासातून आणि समस्त ब्रह्मांडातून पुष्पवृष्टी सुरु झाली. गंधर्वांनी अलौकिक स्वरात मंत्रमुग्ध करणार गायन सुरु केल, अप्सरांनी स्वर्गीय नृत्यविश्वकार प्रारंभ केला. अयोध्येत अवर्णनीय आतषबाजीला प्रारंभ झाला,  असा कि पुढे तो अनेक वर्ष चालेल. सर्वत्र जल्लोष सुरु जाहला. राजा दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री राम आज अयोध्यापती आणि राजा जनकाची ज्येष्ठ कन्या देवी जानकी राज्ञी झाली. त्रेतायुगात हि एक अलौकिक घटना आणि तिचे साक्षीदार अनंत वर्ष व युगापर्यंत या घटनेला सदैव आठवत राहतील, असा हृद्य सोहळा आता संपन्न झाला होता. पण त्याच बरोबर सुरु झाला  या अलौकिक पर्वणीचा आनंदसोहळा जो आता राजगृहातून , सभागृहातून अयोध्येत पोहोचला आहे.

श्रीराम राजे झाले, श्रीराम अयोध्यानरेश झाले.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
१८/०३/२०१८
जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...