Skip to main content

जानकी पुनःवनवास ५६

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ५६

या अलौकिक पर्वणीचा आनंदसोहळा जो आता राजगृहातून , सभागृहातून अयोध्येत पोहोचला आहे.

श्रीराम राजे झाले, श्रीराम अयोध्यानरेश झाले.

बघता बघता वाऱ्यासारखी बातमी संपूर्ण अयोध्येत आणि पूर्ण त्रिखंडात पसरली. स्वर्गस्थ देव, देवाधिदेव महादेव , विष्णुलोक, ब्रम्हलोक, कैलास समस्त आनंदात गीत गाऊ लागले. त्रिलोकात प्रभूंचा जयजयकार सुरु झाला. चारी दिशाना एक वेगळाच गंध पसरला , वाऱ्यालाही त्याचा मद जाणवला , अयोध्येत तर हर्षोल्हास , जोश यांचाच वारा वाहू लागला. जिथे बघावं तिथे प्रजाजन श्रीराम राज्य रोहणाचंच गीत गाऊ लागेल होते.

मद , दर्प तो दशाननाचा मोडुनिया साधले 
विष्णूकृपेने अवनीवरती  रामराज्य आले
अवनीवरती रामराज्य ......

वनवासाची भोगून शिक्षा
राखलीच श्रीरामाने दीक्षा
अग्निदिव्य देऊन परीक्षा 
सीतापती श्रीराम अयोध्यानरेश हे झाले
अवनीवरती रामराज्य .......

गुरुजनांचा ठेवून आदर
स्वप्नीही ना करुनि अनादर
स्वये पूजिला तो गंगाधर
रावण वधूनि विभीषणा लन्कापती केले
अवनीवरती रामराज्य .........

पृथ्वीवरती भार जाहले
अहीमही खरं दूषण गेले
मारीच त्राटीक स्वये मारले
वाली वधूनि सुग्रीव अंगद सखे जमविले
अवनीवरती रामराज्य ........

पितृवचनीचे  भोग भोगले
अयोध्यापुरी त्यजूनि सोसले
विवेक ठेवून कर्मे रचिले
सेवाधर्मी, कर्माथी हे राज्य पुन्हा मिळविले
अवनीवरती रामराज्य .......

या अश्या भारलेल्या वातावरणात सभागृहात जयजयकार , ललकाऱ्या  दुमदुमू लागल्या. सुवर्ण जाडीत सिंहासनावर प्रत्यक्ष प्रभुराम , देवी जानकी, दक्षिणहस्तें लक्ष्मण , वामी देवी जानकी शेजारी भ्राता भरत, आणि शत्रुघ्न उभे राहिलेत छत्र चामर घेऊन, आणि इतक्यात चरणांपाशी रामभक्त हनुमन्त जो इतके प्रहर , दिग्मूढ होऊन सर्व समारंभ पाहात होता, तो येऊन बसला. आणि समस्त जनसमुदायास एक अलौकिक दृश्य न भूतो न भविष्यती बघावयास मिळाले.

महर्षी वसिष्ठ यांनी  प्रभुना उत्तम राजा म्हणून सिद्ध होण्याकरता उपयुक्त आणि अनंत काळापर्यंत कीर्ती राहील अश्या धर्म , कर्म आणि नीतिन्याय या मार्गावर चालताना राजा म्हणून करावयाच्या कर्तव्याच्या व नियमनाच्या अनेक गोष्टींची माहिती  दिली आणि या मार्गावर चालत असताना घ्यावयाची काळजी, तसेच राजाची कर्तव्ये व नाती आणि नीती यांचे पालन करत असताना दिसणारी व न दिसणारी अनेक आव्हाने  यांच्याबद्दल सविस्तर जाणीव करून दिली. स्वतः प्रभूश्रीराम मर्यादा पुरुषोत्तम,पण लीन व शिष्योत्तम भावाने महर्षींचे सर्व कथन शांत चित्ते ऐकत होते. योग्य त्या ठिकाणी व गरज भासले तिथे प्रश्न विचारून आपले समाधान करून घेत होते.

हा सोहळा यथास्थित पार पडल्यानंतर महर्षींनी उभयतांस एक महत्वाचे वचन सांगिंतले की

"हे  राजन आता हे शीश फक्त वरिष्ठ, ज्ञानी आणि गुरुजनांसमोर नतमस्तक झाले पाहिजे. नव्हे राजाचे ते प्रथम कर्तव्य आहे. तसेच या गोष्टीचे भान एक राजा म्हणून तुला सतत ठेवायचे आहे. आणि महाराज्ञी जानकी तुही आता एक राज्ञी आहेस याचे सतत भान असावे. कर्तव्याचे पालन करताना देखील एक मर्यादा पाळणे क्रमप्राप्त आहे.  राम व जानकी तुम्ही उभयता आता एक ईश्वरी अंश आहात. कारण धर्मशास्त्रानुसार राजा हा ईश्वरी अंश असतो. त्यामुळे याचे भान राखावे हे उत्तम. बाकी तुम्ही उभयता ज्ञानी व अनुभवी आहात, तसेच रघुकुलातील उच्च आदर्शांचे  तुम्हास पूर्ण ज्ञान आहे. तरीही रघुकुलाचा कुलगुरू म्हणून मी आपणास केंव्हाही उपलब्ध असेंन. माझ्या आश्रमाची कवाडे आपल्यास कधीही बंद नसतील असे वचन मी आपणास देतो. "

यावर प्रभू नम्रपणे म्हणाले.

"गुरुदेव आपल्याच पावलांवर पाऊल टाकून आणि आपण सांगितलेल्या हितोपयोगी गोष्टी व नियम पूर्ण ध्यानात ठेवूनच हा राम अयोध्येचे काम हाती घेत आहे. तसेच, आपणास विनंती आहे कि, कधीही माझ्या निर्णयात काही चूक आढळल्यास आपण मला तसे केंव्हाही सूचित व ध्वनित करावे हा अधिकार रघुकुलाचे कुलगुरू म्हणून आपणास आहेच, मी फक्त त्याचे स्मरण माझ्या मनास करून देत आहे. जेणेकरून काया, वाचा  वा मनाने सुद्धा चुकीचा निर्णय, एक राजा म्हणून, माझ्या हातून होता कामा नये. "

" रामा तू स्वतः एक उत्तम आदर्श पुरुष आहेस, उत्तम पुत्र, उत्तम शिष्य, उत्तम भ्राता यांचेबरोबर, आता तुला एक उत्तम राजा व उत्तम पती या दोन्ही टोकाच्या भूमिकेतून जावयाचे आहे. याचे तुला गुरु म्हणून व हितचिंतक म्हणून मी स्मरण करून देत आहे. देव करो अशी वेळ तुझ्यावर न येवो पण एक राजा व एक पती, पुत्र, भ्राता या भूमिकांमध्ये संघर्ष आल्यास तुला योग्य निर्णयाचे भान सतत राहो, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीन.  आता तुला मातांसह परिवारातील सर्व वरिष्ठ मंडळींना प्रणिपात करून ,त्यांचे आशीर्वाद घ्यावयाचे आहेत , हे ध्यानात ठेव." 

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...