Skip to main content

जानकी पुनःवनवास ५२

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ५२

भरताला निरोप मिळताच ,भरत लगोलग अतिथिगृहाकडे रवाना झाला . माता कौसल्या, माता सुमित्रेसह जानकी , उर्मिला , मांडवी  व श्रुतकिर्ती यांसह अन्तःपुराकडे जाण्यास निघाल्या . भरत महर्षि वसिष्ठांपुढे नम्रपणे उभा आहे . नुकतेच ध्यानातून बाहेर आलेल्या महर्षिना भरत सादर प्रणाम करतो.

" आयुष्यमान भव, विजयी भव. बोल वत्सा क़ाय समाचार आहे"

" आताच ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांचा संदेश आला आहे व आपणास अन्तःपुरातील खाजगी कक्षात येण्याची विनंती प्रभुनी केली आहे. त्यांच्यावतीने ती जबाबदारी मजवर सोपवण्यात आली आहे. तस्मात आपण येण्याची कृपा करून आम्हा रघुकुलवासियाना उपकृत करावे."

"ठीक मग,  वत्सा भरता त्वरित निघावयास हवे , कारण रामाने स्वये अन्तःपुराकडे प्रस्थान करून आम्हास संदेश धाडलाय, त्या अर्थी कार्यात  शीघ्र गति अपेक्षित आहे. आपण त्वरित निघूया. तू देखील त्याच तयारिने आला आहेस असेच दिसते."

अस म्हणून गुरुदेव वसिष्ठ उत्तिष्ठ होऊन प्रमुख शिष्याना लगोलग निघण्याची आज्ञा करते झाले . भरत या सर्वाना घेऊन रथापर्यंत आला आहे .  गुरुदेवना स्वतःबरोबर घेऊन बाकीच्या प्रमुख शिष्यगणाला सोबत आणलेल्या रथातून येण्याची विनंती भरत करतो. जरूर त्या सूचनां सारथ्याना देऊन आपण स्वतः गुरुदेवाना प्रथम रथात आरूढ़ होण्याची विनंती करतो. तदपश्चात स्वतः रथारूढ़ होऊन सारथ्याला रथ हाकण्यास सांगतो. सर्वजण राजप्रासादातील पश्चिम भागात येतात जिथून अन्तःपुरातील खाजगी कक्षाकडे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर व येथील सर्व मार्गीकांवर पूर्ण आणि चोख  सुरक्षा व्यवस्था आहे, जी देवेंद्राला सुद्धा अभेद्य आहे.  कारण अन्तःपुरातील या  खाजगी कक्षात विशिष्ट परिस्थितित आणि गोपनीय चर्चेसाठी आणि संरक्षण विषयक नियोजनासाठी जमण्याचा प्रघात आहे.

यथावकाश सर्व आमंत्रित व निमंत्रित सभेला आले. प्रभू स्वतः मुख्य द्वाराबाहेर कुलगुरूंच्या प्रतीक्षेत होते. कुलगुरू महर्षी वसिष्ठ यांचं आगमन झालं. प्रभुनी त्यांना चरणी शीश झुकवून आणि मस्तक चरणावर टेकवून प्रणिपात केला. महर्षी अत्यंत भरावलेले होते. प्रभुना स्वहस्ते उठवून महर्षी म्हणाले.

" आज पूर्ण चौदा वर्षांनंतर तुझे दर्शन होत आहे. "

" गुरुदेव आज मी आपल्या समक्ष एक शिष्य म्हणून आहे आणि भविष्यात देखील मी अन्य कोणत्याहि नात्याने आपल्या समक्ष कधीही उपस्थित राहू इच्छित नाही. आपण आसनस्थ व्हावे गुरुदेव. "

असं म्हणून स्वतः श्रीराम महर्षींना त्यांच्या स्थानापर्यंत घेऊन गेले. तत्पश्चात आपण इतर बंधूंसह विराजमान झाले . आता सर्वोच्च स्थानी फक्त प्रभूंच्या पादुका, ज्या चौदा वर्षांपूर्वी भारताने स्थापित केल्या होत्या, त्याच  आहेत. स्वतः भरत बोलण्यास प्रारंभ करतो.

" आजच्या या सभेचे प्रयोजन आणि आयोजन फक्त एकाच कारणासाठी आहे आणि ते म्हणजे या रघुकुलातील रिक्त सिंहासनावर सुयोग्य आणि आदर्श व्यक्तित्वाला विधिवत राज्याभिषेक करून त्या रिक्त सिंहासनाची शोभा व सन्मान उंचावणे. यास्तव मी राजा दशरथ यांचा व्दितीय पुत्र  कुलगुरू महर्षी वसिष्ठ , माता कौसल्या , माता कैकई , माता सुमित्रा, रघुकुलातील अन्य ज्येष्ठ आणि माझे दोन्ही बंधू भ्राता लक्ष्मण आणि भ्राता शत्रुघ्न यांच्या अनुमतीने  , रघुकुलातील राज्याचा वारस व हक्कदार म्हणून ज्येष्ठ भ्राता तसेच माझे आदर्श बंधू श्रीराम यांचे नाव औपचारिकरित्या सुचवत आहे. मी कुलगुरू महर्षी वसिष्ठ यांना विनंती करतो त्यांना याबाबत आमचं मार्गदर्शन करावं"

भरत  आपल्या आसनावरून उठून महर्षींच्या असणापर्यंत जाऊन त्यांना नमस्कार करून पुन्हा आपल्या आसनावर येऊन विराजमान झाला .  कुलगुरू महर्षी वसिष्ठ बोलण्यास प्रारंभ करतात.

"माझा  सर्वोत्तम शिष्य , आदर्श पुत्र आता एका नवीन नात्याला जन्म देणार आहे, आदर्श राजा. आजच्या बैठकीचे जे प्रयोजन व आयोजन आहे आणि ज्यासाठी हि सर्व प्रतिष्ठित व्यक्तित्व उपस्थित आहेत, त्याची फक्त औपचारिक घोषणा व्हावयाची आहे. राजघराण्यातील सर्वांसोबत हजारो प्रजाजनांची चौदा वर्षांपूर्वीची मनीषा आज फलद्रुप होत आहे. ज्यासाठी अनेकांनी आपले प्राण डोळ्यात आणून फक्त याच घटिकेसाठी जीव जगता आणि जागता ठेवला , त्यात माझ्यासह तीनही माता (या शब्दाला महर्षी, श्रीराम व भरत यांजकडे, अनुक्रमे बघतात. दोघेही स्मितवदने होकारार्थी संमती दर्शवतात), कनिष्ठ तीनही बंधू, परिवारातील इतर मान्यवर आणि अयोध्येचे समस्त प्रजाजन यां सर्वांचा समावेश होतो. किंबहुना एका आदर्शा राजाच्या प्रतीक्षेत असलेले हे राजसिंहासन सुद्धा याच घटिकेसाठी गेली चौदा वर्षे रामाच्या पादुका शिरावर घेऊन शांत चित्ते स्थित आहे. या घटिकेला पोहोचण्यासाठी वरील सर्वांस अनंत यातना सहन कराव्या लागल्या.  परंतु त्या अंततः फलदायी होणार असल्यामुळे त्या सर्वांनी विसरून स्वच्छ मनाने या क्षणाच यथोचित स्वागत करण्याची तयारी प्रारंभ करावी अशी मी कुलगुरू म्हणून यानिमित्ताने औपचारिक घोषणा करून  अनुमती , देत आहे."

महर्षींच्या या औपचारिक घोषणेनंतर प्रभूनी स्वये उठून आपल्यासह देवी जानकीला आमंत्रित केले आणि दोघांनी मिळून अनुक्रमे कुलगुरू त्यांचे प्रमुख शिष्यगण यासह माता कौसल्या , माता सुमित्रा व इतर ज्येष्ठ सदस्यांच्या चरणी लीन होऊन शुभाशीर्वाद घेतले . समस्तानी त्यांना "विजयी हो " चिरायू हो" असा आशीर्वाद दिला. परंतु कुलगुरूंनी एकच अलौकिक आशिष दिला " रामराज्य प्रस्थापित होवो आणि त्याची कीर्ती युगानुयुगे कायम राहो " 

या घोषणेसह संपूर्ण गृह आणि समस्त अंतःपुर खालील घोषणांनी दुमदुमून गेले  स्वये प्रभुनाही आनंद लपविणे शक्य झाले नाही तिथे देवी जानकिसह चारही स्नूषा आणि प्रत्यक्ष दोन्ही माता सद्गतित झाल्या. आनंदाश्रुंचा जणू महापुर लोटला.

"प्रभुरामचंद्रांचा विजय असो "

"राजा रामचंद्रांचा विजय असो."

आणि भरताने केलेल्या उदघोषाने स्वये प्रभू आणि देवी जानकी आनंदाश्रू रोखू शकले नाहीत.

"राजाधिराज प्रभू रामचंद्र आणि महाराज्ञी देवी जानकी यांचा विजय असो. "

पहाता पहाता  हा समाचार राजप्रासादात तिथून संपूर्ण परिसरात आणि अयोध्येतून प्रत्यक्ष इंद्राच्या कानी पोचला. प्रभूंचा राज्याभिषेक होणार. आणि या उद्घोषातच सर्वांच लक्ष नक्षत्र गणित मांडण्यास बसलेल्या कुलगुरुंकडे गेल. कुलगुरूंनी सर्वांसमक्ष ग्रहांचे गणित मांडून मुहूर्त काढला

" चैत्र  शुद्ध प्रतिपदा " (या दिवसाबाबत मतभिन्नता आहे प्रतिपदा आणि नवमी दोन्ही उल्लेख आढळले, मी एक निवडलाय)

समस्त आसमंत , तारांगण, आणि ब्रम्हांड त्याच तीन शब्दानी दुमदुमुन गेल. दशोदिशाना देव, सुरवर गन्धर्व , यक्षब, किन्नर, यांसह सर्वाना एकच आस लागली त्या तीन शब्दान्ची

प्रभु रामचंद्रांचा राज्याभिषेक

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...