ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ५०
" मला सतत तुझी बालरूप मूर्तीच डोळ्यापुढे येते आणि तू करत असलेल्या अनेक लीलामध्ये मन हरवून जात . त्यानंतर राग येण्याचा प्रश्नच कुठे उरतो. मनात रागाचा लवलेश तिळमात्रसुद्धा राहात नाही. "
यावर मंद स्मित करत आणि निश्चल भावाने प्रभू म्हणाले.
"माते तुझ्या या प्रेमळ भावाने मला तू बद्ध केलयस कायमच. म्हणूनच तू माझ्या हॄदयात कायम विराजमान असतेस. तुझ्या देखील यांच् भावना आहेत म्हणून तुला मी सतत त्याच रुपात दिसतो, ज्या रुपात तुला मी जास्त भावतो. हेच तुझ वात्सल्य मला तुझ्याप्रत ओढून आणत. म्हणून मी तुला त्याच रुपात दिसेन जे तुला अतिप्रिय आहे."
"रामा तू आता सुद्धा मला त्याच रुपात दिसतो आहेस, त्याच बालरूपात. धन्य झाले मी"
अस म्हणून माता सुमित्रा रामाला पुनःश्च आलिंगन देते. आणि दोघांच्याही नयनातून अश्रुधारा वाहताना हे अलौकिक दृश्य, प्रभुना असे मायेने बद्ध झालेले, पाहायला काळ सुद्धा क्षणिक विसावला. आपले अश्रु पुसत माता विचारते
" रामा माझ्याकडे तू काही प्रयोजन घेऊन आला आहेसना, मग क़ाय बोलायच आहे. सांग तू. "
" माते आता राज्याची घड़ी पुन्हा स्थिरस्थावर होण्यासाठी राज्याला राजा असावा असा शास्त्रसंकेत आहे. म्हणून आम्ही कुलगुरु महर्षि वशिष्ठ याना पाचारण केल आहे. आपण त्याकरता विचारविनिमय आणि मार्गदर्शन यासाठी चालाव अस आमच बन्धुन्च म्हणण आहे."
" कौसल्यादेवी क़ाय निर्णय घेतायत त्यावर मी सुद्धा माझा निर्णय घेईन"
" जरूर माते. मी आता मातेच्या महालात निघतोय तिथे क़ाय निर्णय होईल तो आपणाकडे मी पोहोचता करीन लक्ष्मणाकडून. आज्ञा असावी"
अस म्हणून भगवंत पुन्हा मातेच्या चरणावर मस्तक ठेवून आशीष घेतात.
" यशस्वी भव."
मातेची आज्ञा घेऊन प्रभु त्वरित माता कौसल्येच्या महालात जाण्यास निघतात. मार्गात त्याना त्यांचीच प्रतीक्षा करत असलेला लक्ष्मण भेटतो.
" प्रणाम ज्येष्ठ भ्राता"
" माता कैकईकड़े जाऊन आलास. कस आहे आता सर्व सकुशल"
" आपण धन्य आहात आणि म्हणून ज्येष्ठ आहात. आपल्या दुरदृष्टिला आणि सुजाणतेला तोड़ नाही"
" लक्ष्मणा तू इतका आनंदी का आहेस आणि माझी स्तुति करण्याच कारण क़ाय ते तरी स्पष्ट करून सांग"
" भ्राताश्री आपण मलाच माता कैकईकड़े का धाड़लत हे जाऊन आल्यावर मला उमगल. मन खरच शांत आणि प्रसन्न झालय. एक किंतु किंवा काटा मनात सलत होता गेली चौदा वर्ष , तो आज दूर झाला आणि मातेप्रति माझा राग लोभामधे परीवर्तित झाला. यासाठी .................."
अस म्हणून लक्ष्मणाच्या नेत्रातून अश्रुधारा येतात. सद्गतित झालेला लक्ष्मण अनायासे भगवंतांच्या चरणी लीन होतो. त्याला उठवून प्रभु आलिंगन देतात.
" तुझ स्थान इथे आहे लक्ष्मणामाझ्या हॄदयात. राहिला प्रश्न तुझ्या किन्तुचा. तर एक मर्म ध्यानात ठेव, ज्या ज्या वेळी एखाद्या व्यक्तिबद्दल आपण साशंकित होतो, त्या त्या वेळी त्याच क्षणी ती गोष्ट , बाब वा शंका बोलून मन मोकळ करायच. याचे दोन सकारात्मक परिणाम होतील. एक आपल मन स्वच्छ आणि पारदर्शी आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो. आणि दूसरा परिणाम म्हणजे जऱ ती व्यक्ति तुमची खरी ओळख जाणत असेल आणि हॄदयातून जऱ तिला ममत्व असेल तर तुमच्या बोलण्याचा सयोग्य अर्थ त्या व्यक्तिपर्यन्त पोचेल आणि तुमची त्या व्यक्तीच्या मनातील प्रतिमा अजून अधोरेखित होईल."
" परन्तु भ्राताश्री जऱ त्या व्यक्तिने चुकीचा अर्थ म्हणजे ध्वनित अर्थ लक्षात घेऊन गैरसमज करून घेतल्यास"
" दुर्दैवाने तसच झाल तरीही तुम्ही समाधानी असाल की तुमच मन तुम्ही योग्य वेळी स्वच्छ केलय.तत्पश्चात त्या व्यक्तीला सत्य उमगल्यानन्तर ती व्यक्ति खजील तर होईल पण मनातील तुमच्याबद्दलचा राग निघुन जाईल. तरीही मुख्य हेतु आपल मन स्वच्छ करण्याचा आहे तो साध्य होण महत्वाच आहे."
(लेखकाच मनोगत : ही लेखमाला सुरु केली त्यावेळी ही माला इतक्या पुष्पापर्यंत जाईल हे योजिले नव्हते
पण प्रभुंच्या कृपेने आणि वाचकांच्या प्रोत्साहनाने आज ५० वा भाग लिहिताना मन गहिवरुन आलय. ही अशीच पूर्णत्वाकड़े जावो हिच प्रार्थना प्रभु चरणी)
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment