ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ६७
" देवा इथे एक शंका आहे, हो शंकाच."
" शंका मनातून बाहेर काढ़ आणि मन स्वच्छ कर. बोल वत्सा बोल."
इथे हनुमंत काही उच्चारणार त्याचवेळी प्रभुंच्या चेहऱ्यावर काही स्मरण झाल्याचे भाव पाहून हनुमंत विचारता झाला.
" भगवान काही काम आठवले असल्यास त्वरित आदेश द्याय मी प्रसन्न चित्ते ते पूर्ण करीन."
" वत्सा एका मातेचा आवाज माझ्या ह्र्दयापर्यन्त पोचतो आहे. तिच्यापर्यंत तिच्या पुत्राला काही क्षणात पोचवावे हेच ते काम आहे."
" प्रभु इतक्या सहज कार्यासाठी आपण चिंतित आहेत म्हणजे मग या हनुमंताचा, आपल्या दासाचा विसर पडला का आपणास. की काही प्रमाद घडलाय."
" हनुमंता मातेच स्मरण हे भगवांताच्या स्मरणाइतकंच श्रेष्ठ आहे ना."
" अर्थातच प्रभु आणि स्वतः भगवंत कृपानिधान किती मातृभक्त आहेत हे मी स्वये पाहिलय वनात देखील आणि अयोध्येत आल्या पासून सुद्धा."
"आणि मातेचे विस्मरण "
हनुमंत एकाच क्षणात अचानक शांत झाला. प्रभुंच्या कथनाचा रोख आता त्याच्या ध्यानात आला आणि वज्रदेही , बलवंत, महाबाहु, पराक्रमी, काळाचाहि काळ अश्या पवनपुत्र हनुमंत्ताच्या लोचनातून अश्रुधारा सुरु झाल्या. त्वरित हनुमंताने प्रभुंचे चरण धरलेल आणि तो महापराक्रमी देह रडायला लागला. प्रभुनी त्याला उठवल आणि म्हणाले
" जा हनुमंता एका मातेला तिच्या पुत्राच्या वियोगातुन सोडव. हेच कार्य आहे माझ तुझ्याकडे. "
" प्रभु क्षमा असावी. जशी आपलीआज्ञा. हा मी निघालो. जय प्रभु श्रीराम "
इकडे दूर पम्पासरोवराजवळ किष्किंधा नगरीत आरण्यातील एका पर्णकुटित
हनुमंत माझा गुणी किती सांगू बाई
महाबली आहे तो वज्रबाहु भीमकायी
गुण त्याचे सांगण्यास मजपाशी शब्द नाही
हनुमंत बाळ माझा, हनुमंत बाळ माझा
तेवढ्यात एक नटखट वानर तिच्या अवतीभोवती फिरून तिच्या खोड्या काढू लागल. मातेने दुर्लक्ष केल. पण वानर काही म्हणजे काही केल्या खोड्या कमी करायला तयार होईना. शेवटी मातेने जवळच असलेला एक जाडजुड़ दांडूका घेतला आणि नेम धरून वानराच्या पाठीवर लागेल असा जोरात मारला. त्याचबरोबर वज्रदेही महाबाहु हनुमंताच ख़र रूप प्रकट झाल.
"आय आय आय आय आय. माते किती जोरात मारलस. लागल की."
" मातेने मारलेला फटका पुत्राला लागला. वा म्हणजे मातेच ममत्व कमी झालय असाच त्याचा अर्थ काढायचा ना. "
हनुमंताने त्वरित मातेचे चरण धरले.
"क्षमा माते क्षमा . मी तुला विसरलो नव्हतो पण प्रभु सेवेत रत झाल्यामुळे फक्त स्मरण मागे पड़ल. पण एक प्रश्न आहे की प्रभुना कस ज्ञात झाल की तू माझ स्मरण करते आहेस ते."
" हनुमन्ता अजून तसाच्या तसा आहेस. याच कारण आहे. ते स्वतः एक सुपुत्र आहेत आणि दूसर कारण म्हणशील तर ते पुत्र असल्यामुळे माझी आर्तता कदाचित त्यांच्यां
प्रत पोचली असेल. म्हणूनही धाड़ल असेल तुला."
आपल्या मातेची आर्तता सुद्धा प्रभुंपर्यंत पोचली या कल्पनेने देखील हनुमंताला गहिवरुन आल. पुन्हा हनुमंताच्या नेत्रातून अश्रून्चा पाट वाहु लागला. मातेच्या चरणांपाशी पुन्हा बसत हनुमंताने मातेचे चरण अश्रुनी अक्षरशः धुवून काढले. मातेने हनुमंताला उठवून आलिंगन दिल. दोघे माता अंजनी आणि पुत्र हनुमंत साश्रु नयनानी किति तरी वेळ एकमेकांकड़े पहात होती आणि इकडे अयोध्येत प्रभुंच्या डोळ्यातून अश्रून्चा बांध फुटलेला. ते पाहुन देवी जानकी विचारतात
" क़ाय झाल प्रभु"
" एका मातेला तिच्या पुत्राची भेट त्या पुत्राच्या जन्मदिनी घडवून आणली. यांच समाधान लाभल"
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment