ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ४९
" चिंता कसली चिता माते "
कैकई यावर म्हणते
"जेव्हापासून माझ्या कर्माचा परिणाम आणि व्यात्प्ती ध्यानात आली तेंव्हापासून याच गोष्टीची चिंता लागून होती कि, याचा तुम्हा बंधूंच्या नातेसंबंधांवर कोणताही विपरीत परिणाम होता कामा नये. पण आताच्या तुझ्या वक्तव्याने मी निश्चिन्त झाले कि, माझ्या रामाचा प्रभाव जोपर्यंत आणि जेथपर्यंत आहे तोपर्यंत आणि तेथपर्यंत माझ्या सारख्या वृत्तीचा परिणाम होणार नाही. म्हणून माझा तुम्हा बंधूना आशीर्वाद आहे कि, तुमच्यातील हा बंधुभाव, एकोपा, युगानुयुगे एक आदर्श म्हणून संबोधला जाईल. अर्थात हा आशीर्वाद देण्यास मी पात्र आहे अथवा नाही हे मी जाणत नाही. पण शुद्ध मनाने सदिच्छा नक्कीच व्यक्त करू शकते आणि त्या सदैव तुमच्या पाठीशी असतील. "
"माते निश्चितपणे तुला तो अधिकार आहे. कारण तू केलेलं कर्म हे शेवटी एक माता म्हणून आणि पुत्रप्रेमापोटी केलेल एक कर्म होत. त्यात भरताच योगदान आणि त्याच बंधुप्रेम निश्चित कौतुकास पात्र आहे. पण त्यामुळे तुझ्या एक माता म्हणून आशीर्वाद देण्याच्या अधिकाराला कोणतीही बाधा येत नाही. याबाबत मी तुला आश्वस्त करण्याची माझी पात्रता नाही. पण ज्येष्ठ भ्राता प्रभु श्रीराम यांच्या पावलांवर पाऊले टाकून हे निश्चित सांगू शकतो की,मी तुझाच पुत्र आहे. तेंव्हा कोणताही किंतु मनात ठेवू नकोस. "
" मी आता निःशंक झाले. असो. पण तू येण्याचं काही अजून प्रयोजन आहे कि, "
मातेचं बोलणं मधेंच थांबवत लक्ष्मण म्हणतो.
" माते प्रभू श्रीराम यांच्या पुनरागमना नंतर अयोध्येच्या राजसिंहासनाबाबत निश्चित निर्णय घेण्यासाठी कुलगुरू महर्षी वसिष्ठ यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. आम्हा सर्व बंधू , म्हणजे भ्राता भरतासह आमची इच्छा आणि रघुकुलाची रीत म्हणून ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांचा राज्याभिषेक व्हावा. पण श्रीरामांच असं म्हणणं आहे कि संबंधित सर्व एकत्र बसून निर्णय घेऊया म्हणजे राज्याभिषेकाचं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. याच कारणास्तव मी आपल्याकडे आलो आहे. जर आपली अनुमती असेल तर अथवा आपली तशी इच्छा असेल तर आपण स्वतः याव, म्हणजे आज गुरुदेवांच्या समक्ष चर्चा होईल, त्यावेळी उपस्थित राहावं. माझं वयक्तिक हेच मत आहे आणि ज्येष्ठ भ्राता यांचं देखील हेच मत असेल. "
" माझ्या रामाने राज्यावर बसावं हि माझ्या भरताची इच्छा आहेच, त्यामुळे मीही त्याच्या वचनात बद्ध आहे. कुलगुरूंना भेटण्याचा योग गेल्या कित्येक वर्षात आलेला नाही. पण तरीही आज त्यांच्याबरोबर तुम्ही विचारविनिमय करून जे योग्य असेल ते ठरवा . मी कायम तुमच्या सोबत असेन. हे नक्की समज . असा माझा रामाला निरोप दे. "
" जशी आपली आज्ञा. मला ज्येष्ठ भ्राताश्री यांना भेटण्यासाठी निघण्याची अनुमती द्यावी."
असं म्हणून लक्ष्मण पुन्हा मातेच्या पायावर लवून नमस्कार करतो. माता कैकई त्यास पुन्हा शुभाशीर्वाद देते आणि लक्ष्मण माता कैकईच्या महालातून निघतो आणि माता कौसल्या व माता सुमित्रा यांच्या महालाच्या दिशेने प्रस्थान करतो.
लक्ष्मणाला भेटून निघालेले प्रभू श्रीराम माता सुमित्रा यांच्या महालाकडे निघतात . प्रतिहारी आत जाऊन दासींना प्रभू आल्याचा निरोप देण्यास सांगतो. माता अर्थातच अंतःपुरातून स्वये श्रीरामांना भेटण्यास निघते. महालाच्या मध्यावर प्रभू मातेला पाहून चरणस्पर्श करून वंदन करतात, आणि म्हणतात.
" माते मी येतच होतो , तू व्यर्थ कष्ट घेतलेस. "
यावर माता सुमित्रा म्हणते
" पुत्राला तेही लाडक्या पुत्राला भेटण्यास मातेला कष्ट कधीपासून होऊ लागले रे,"
यावर प्रभूचे स्मित आणि सुहास्यवदन यामुळे मातेला पुढे बोलण्यास काही सुचत नाही. हे बघून प्रभू पृच्छा करतात.
" काय पहातेस माते. "
"तुझा हा मुखचंद्रमा ,हे वदनीच तेज आणि प्रभा अनेक युगांनी पाहावयास मिळत आहे. वनवासावरून तू आलास, पण कार्यव्यस्त असल्यामुळे माझ्याकडे फार बोलता आलं नाही तुला. त्यामुळे माझ्या ममत्वाची तहान शमली नाही. मी तुला दोष देत नाही पण तरीही एक माता म्हणून आपल्या पुत्राला डोळे भरून बघण्यातला आनंद तुला कसा कळणार. माझे पुत्र लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना बघण्याइतकाच , किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आनंद मला तुला बघताना होतो. "
मातेचा हात धरून तिला अंतःपुरातील दालनात घेऊन जाताना श्रीराम म्हणतात.
" माते तुझे भाव माझ्या प्रत पूर्णपणे पोचतात आणि मी जाणतो एका मातेचं दुःख आणि हृदयीचे भाव काय असू शकतात, पुत्राची भेट न होण्यामुळे. तरीही आल्यानंतर मी तुला वेळ देऊ शकलो नाही याबद्दल मी क्षमाप्रार्थी आहे. तू माता असल्यामुळे आणि मी तुझा लाडका पुत्र असल्यामुळे माझ्या या चुकीबद्दल क्रोध न करता क्षमा करशील. याचा विश्वास होताच. तरीही मी तुझ्या ममत्वाचा गैरफायदा घेता कामा नये. तसे झाले असल्यास पुनश्च क्षमस्व. "
यावर माता सुमित्रा म्हणते
" रामा तू आदर्शाचे अनेक मापदंड एक पुत्र, बंधू, पती व सखा या सर्व नात्यात प्रस्थापित केले आहेस. पण एक राज्यकर्ता म्हणून तुला आदर्श सिद्ध करावयाचे आहेत. तस्मात त्यासाठी तुझी सिद्धता व्हावी हीच एक माता म्हणून इच्छा आहे. आणि मातेची क्षमा मागून तू आदर्शाचे नवीन परिमाण स्थापित करत आहेस. मी तुझ्याबाबत कोणताही राग वा किल्मिष मनात ठेवूच शकत नाही. "
" का माते " श्रीरामांनी मोठ्या कुतूहलाने विचारले.
" मला सतत तुझी बालरूप मूर्तीच डोळ्यापुढे येते आणि तू करत असलेल्या अनेक लीलामध्ये मन हरवून जात . त्यानंतर राग येण्याचा प्रश्नच कुठे उरतो. मनात रागाचा लवलेश तिळमात्रसुद्धा राहात नाही. "
यावर मंद स्मित करत आणि निश्चल भावाने प्रभू म्हणाले.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment