ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ५७
महर्षिच्या कथनानन्तर प्रभु उभयता उतिष्ठ होऊन प्रथम माता कौसल्येजवळ गेले . मातेला वाकून नमस्कार केल्यानन्तर मातेने पुत्राच्या मस्तकावरुन हात फिरवला. डोळे आणि मन दोन्ही भरून आल होत. साहजिक आहे. जे खरतर चौदा वर्षापुर्वी योजल होत आणि सहजसाध्य होत तरीही कुलरीति प्रमाणे, ते होण्यासाठी इतकि वर्ष, इतका मोठा त्रास, त्याग आणि न भूतों भविष्यति घटनांची मालिका घडवली विधात्याने. प्रारब्ध म्हणजे मुखापाशी आलेला घास प्रत्यक्ष मुखाग्नित जायला आपल्याच पुर्वकर्माचे फलरूप आहे आणि ते खरच अबोध आहे.
माता कितिवेळ प्रभुंकडे पहात होती. प्रभुदेखील मातेच्या चेहर्यावरील हे आनंदाचे भाव प्रेमळ नजरेने निरखुन पाहात होते. माता म्हणाली
" रामा तुला या रुपात पाहण्यासाठी नयनात प्राण आणले होते. तू पुत्र म्हणून माझ्या उदरी जन्म घेतलास हेच तुझे थोर उपकार आहेत माझ्यावर"
मातेच्या मुखावर हात ठेवून श्रीराम म्हणाले
" माते याहून मोठ पाप या जगी नाही , माते. आपण मला उदरी नऊ मास वाढवून , आपल्या रुधिराने मला उदरी सर्व देऊनि कृपा केली. माझीच अनेक अनेक जन्माची पुण्याई म्हणून मला तुझ्यासारखी उदरी जन्म देणारी माता लाभली आणि याचे उपकार शतजन्म फेडता येणार नाहीत. पण तितकेच जन्म पुन्हा पुन्हा तूच माझी माय असशील तेंव्हा या उपकारांच्या प्रभावात हे अनेक जन्म गेले तरी चालेल, पण माता म्हणून प्रत्येक जन्मी तुझ्याच पोटी जन्म घेईन. या जगातील एक निर्विवाद सत्य सांगतो ते अस की या जगात एक माता सोडुन कोणीही कोणावर उपकार करत नाही"
" पिता, पति दारा , गुरु सखा सुद्धा नाहीत ज्येष्ठ भ्राता" भरताने पृच्छा केली.
"अर्थातच नाही कारण हे सर्व कोणत्या ना कोणत्या हेतुने अथवा उद्देशाने बांधले गेले आहेत आणि माता ही एकच व्यक्ति या जगात अशी आहे की जी निरपेक्ष बुद्धिने, मनाने व आत्म्यापासून प्रेम करते. ती फक्त प्रेमच देते आणि त्याबदल्यात काहीही परताव्याची अपेक्षा सुद्धा ठेवत नाही.जी फक्त जळते आणि प्रकाश देते, आधी उदरी धारण करून आणि नन्तर अखंड निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करून, कधीही कमी न होणार, उलटपक्षी वर्धिष्णु प्रेम करणारी एकमेव व्यक्ति. तिला त्याबद्दल प्रेम मिळाल नाही पुत्राकडून, तरीही तीच ममत्व कधीही क्षणमात्र सुद्धा कमी होत नाही. मातेच्या महतिसाठी अनेक ग्रंथ लिहिले तरीही त्याबद्दल एक अक्षर उलगड़णार नाही जोपर्यंत या प्रेमाचा साक्षात अनुभव जीव करत नाही. म्हणजेच पुराण, वाङ्गमय, ग्रंथभांडार इतकंच क़ाय पण प्रत्यक्ष परमेश्वरालाही अप्राप्त अस हे मातेच प्रेम फक्त उदरी जन्म घेऊनच कळून येईल. याचसाठी भक्तिचा भुकेला भगवंत युगायुगात मातेच्या उदरी जन्म घेऊन त्याचा आनंद उपभोगूं इच्छितो. तो सर्व काही निर्माण करू शकतो पण हे असाध्य प्रेम , ममत्व जन्म घेऊनच अनुभवतो.मला वाटत यातच या प्रेमाची , मातेच्या ममतेची महती दडलेली आहे. पिता , बन्धु, सखा पति वा अर्धांगी ही नाती नन्तर येतात त्यासाठी आधी मातेने उदरी गर्भ धारण करावा लागतो. मी अत्यंत पुण्यवान म्हणून हे माते तुझ्या उदरी जन्म घेऊ शकलो. उपकृत तू मला केलयस आणि शतजन्म बद्ध केलयस माते."
अस म्हणून गहिवरलेले प्रभु साश्रु नयनानी पुनःश्च मातेच्या चरणावर नत होऊन कृपाशीर्वाद घेतात. माता कौसल्येसह तिन्ही माता , राज्ञी जानकी सह चारही स्नूषा, तिन्ही भ्राता आणि समस्त जनसागर या अद्भुत प्रेमाचे साश्रु नयनानी साक्षी झाले आहेत.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment