Skip to main content

जानकी पुनःवनवास ६१

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ६१

हनुमंताचा आणि प्रभुंचा नजरेतून संवाद फक्त दोघानीच जाणला. कारण तो फक्त या हृदयीचा त्या हॄदयी होता. थोड़ा अवधी लोटला आणि प्रभुंची नजर आर्य सुमन्तानकडे गेली. राज्याचे आणि रघुकुलाचे सर्वात विश्वासु , जाणते आणि सुज्ञ मंत्री होते. प्रभुंच्या जन्माआधी पासून आणि अयोध्येतील  बऱ्याच घटनांचे ते प्रत्यक्षदर्शी होते. राजा दशरथांचा आणि प्रभुंचा पूर्ण विश्वास होता त्यांच्यावर.

त्यांच्याही लोचनातून अश्रुधारा अखंड वहात होत्या. प्रभुनी ते पाहिलं जवळ गेले आणि म्हणाले

" सुमन्तजी कुठे हरवलात काळाच्याही पार अगदी भान हरपुन बघताय."

" होय महाराज , आज सर्व चित्रासारख डोळ्यापुढून जातय जणू काल घडल्यासारख दिसतय.  अगदी पूर्ण स्पष्ट आणि प्रत्येक गोष्ट, घटनांचा तपशील, नजरेपुढून अजिबात सरकत  नाहीये. खुप मागे घटित घटनेची सुद्धा आठवण आजही स्पष्ट दिसते मनः पटलावर. होय ना गुरुदेव?"

कुलगुरु वसिष्ठ यानी होकारार्थी मान हलवून म्हटल

" होय रामा अगदी महाराज दशरथाना पुत्रप्राप्तिची चिंता लागली तिथपासून"

"गुरुदेव मग आम्हाला देखील आवडेल ऐकायला आठवणी श्रीरामांच्या जन्माच्या. कृपया कथन करून आम्हाला कृतार्थ करा" तिन्ही स्नूषा आणि देवी जानकी एकदम म्हणाल्या.

गुरुदेव सांगू लागले

" राजा दशरथ एक न्यायी , प्रजाहितप्रिय आणि सच्च्या मनाचे राजे होते. रघुकुलातील राज्या मधे प्रजेला कसलिहि कमतरता नव्हती. पण प्रत्यक्ष राजमहालात मात्र वंशवेलीवार फूल नव्हतं. तीन तीन राण्या असुन सुद्धा, तिघिंचीही कुस उजवली नव्हती. यांच प्रश्नाच उत्तर शोधण्यास्तव राजा दशरथानी एके दिनी मला पाचारण केल. आम्ही यावर उपाय शोधण्यासाठी अनेक ऋषि मुनिना जाऊन भेटलो. त्यातील काहिनी पुत्रकामेष्ठि हा यज्ञ केल्यास पुत्रप्राप्ती होईल हे सांगून चार बहुगुणी आणि चारित्र्य सम्पन्न पुत्र तुमच्या प्रारब्धात आहेत हा  भाग्ययोग देखील सांगितला. यास्तव हा  यज्ञ करण्याचे योजिले.

यथावकाश यज्ञ सम्पन्न झाला आणि यज्ञातून अग्निदेवतेने स्वयं प्रकट होऊन सुवर्णपात्रात खीर रूप प्रसाद दिला आणि सांगितल की यांच सर्व राण्याना सेवन करावयास सांग जेणेकरून त्याना पुत्र होतील. श्रीमहाविष्णु स्वये तुझ्या, राणी कौसल्येच्या,  उदरी जन्म घेण्यास आतुर आहेत.  म्हणून या प्रसादाचे दोन समान भाग करण्यात आले. एक भाग  राणी कौसल्या यानी  सेवन करण्याआधी त्यातील अर्धा भाग राणी सुमित्रसाठी काढून ठेवाला आणि राहिलेला आपण सेवन केला.  उरलेल्या भागाचे राणी कैकई यानी पुन्हा दोन भाग केले. त्यातील एक भाग राणी कैकईने सेवन केला आणि एक राणी सुमित्रेला सेवन करण्यास दिला.

या कृपाप्रसादाचा उचित परिणाम झाला आणि तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. चैत्र सुरु होताना नऊ मास पूर्ण झाले. राजप्रासादात लगबग सुरु झाली. सुप्रशिक्षित सुयिणी राजगृहात नऊ मास राहण्यास होत्याच. आता कोणत्याही क्षणी दिवस पूर्ण भरून होताच प्रसूति होणार हे जाणूनच राण्याची विशेष काळजी घेतली जात होती. आणि

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला राणी कौसल्या याना प्रसूति वेदना सुरु झाल्या दिवसाच्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रहरात.  दिन माध्यान्ही येताच कर्क राशीच्या उदयाला जेंव्हा पुनर्वसु नक्षत्रात रवि , मंगळ, शनि, गुरु, आणि शुक्र हे सर्व आकाशस्थ आपापल्या उच्च स्थानी असताना त्या दिव्य परमरूप प्रत्यक्ष महाविष्णु अवतारी बालकाने अवनीवर प्रवेश केला. नीलवर्ण, अत्यंत तेजोमय सुनेत्र, मोहक कांति, अत्यंत रूपवान, जन्मतः अजानुबाहु, सुकोमल पण तरीही शक्तियुक्त भासणारा देह, मुखावर अलौकिक तेजप्रकाश जो देखून प्रत्यक्ष काळही काही क्षण विस्मयीत होऊन थांबला. प्रत्यक्ष सूर्यनारायण , शशी, सर्व ग्रहतारे, ब्रम्हांड, आपापल्या वाहनारूढ़  होऊन सर्व देव, सुरवर, इंद्रादि वरुण, ब्रम्हदेव, उमामहेश हा अद्भुत आणि नयनरम्य अवतारी बालकरूपी महविष्णुन्चा अंश पाहण्यासाठी प्रकटले होते. माता वसुंधरेला सुद्धा हर्ष मावेनासा झाला होता.

आणि त्या बालरूप रामचंद्राच्या वळलेल्या मुठी चोखताना दिसणाऱ्या भावात प्रत्यक्ष राजा दशरथ हरवून गेले होते. राजमहालातून ही वार्ता सम्पूर्ण नगरात व अयोध्येत पोचली आणि सारे नर नारी व त्यासवे सारे सजीव रामजन्माच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि अनेक दिनांपर्यंत चाललेल्या जन्म सोहळयात मग्न होऊन गेले."

नीलवर्ण अन दिव्य सुलोचन कांति तेजोमयी
सूर्यतेज जणु भासे वदनी बालरूप उन्मनी
बाळमूठी त्या भासती सुंदर इंद्रादि दिपती
अश्या बालका पाहण्यास हो अवधपुरी पातली

सारा सभागार  " प्रभु रामचंद्रांचा विजय असो" या घोषणानी पुनःश्च दुमदुमुन गेला.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...