ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ५१
" आपल्या उत्तराने पूर्ण समाधान झाले .पण विषयाची व्याप्ती खुप आहे, म्हणून आता पुरते इथेच थांबतो. आपण माता सुमित्रेच्या महाली जाऊन आलात. माता सकुशल आहे ना?"
"होय लक्ष्मणा , जीच्या पोटी तू आणि शत्रुघ्नासारखे पुत्र आहेत ती माता स्वस्थ आणि सकुशल का नसेल."
" अर्धसत्य आहे भ्राता."
"अर्थात"
"अर्थात ज्या मातेला आपण भेटून आला आहात आणि ज्या मातेला आपण नित्य वंदन करता ती माता का सकुशल नसेल. "
ज्यावर मन्द स्मित करून प्रभु म्हणाले
" लक्ष्मणा तू माता कौसल्येच्या महालात जाऊन आलास. मातेचे सकुशल आणि सुवार्ता कथन कर. मी ऐकण्यास उत्सुक आहे"
" क्षमा असावी ज्येष्ठ भ्राता . मला येताना मार्गात महामंत्री सुमंत आणि सेनापति भेटले. त्यांमुळे त्यांच्यासोबत काही सैन्यविषयक आणि प्रशासनाविषयी मुद्द्यावर विस्तृत चर्चा केली ज्या आपल्याला सांगावयाच्या आहेत."
"ठीक तर आपण आधी माता कौसल्येच्या महालाकड़े प्रस्थान करू. कुलगुरुना जास्त काळ तिष्ठत ठेवण्याची आपली रीत नाही. त्यांना क्रोध येईल असे कृत्य जाणूनबुजुन करणे गैर आहे. तस्मात आपण शीघ्र गतीने जाऊया"
" चला आपण मी आहे आपल्याच पावलांबरोबर"
दोघेही माता कौसल्येच्या महालाकडे निघतात. इकडे महालात निरोप गेला आहे महालात प्रवेश करताना प्रथम प्रभु आणि मागे त्यांचीच सावली लक्ष्मण दोघेही आत मातेसमीप जाऊन उभे राहतात. चरणांवर शीश लवून प्रणिपात करतात. माता कौसल्या साश्रु नयनानी दोघानाही आशीर्वाद देतात
" सर्वश्रेष्ठ भव. दीर्घायु भव. आज पुन्हा अनेक वर्षानी माझे राम लक्ष्मण जोडीने दिसत आहेत. हे भाग्य माता असुन मलासुद्धा दुर्मिळ योग आहे अस वाटत होत. आज तो योग आला. पण छान झाल. दोघही एकत्र आला आहात म्हणजे काही विचारायचे असेल असा कयास आहे."
यावर प्रभु आणि लक्ष्मण दोघेही उत्तरले
"क्षमस्व माते"
यावर माता आणि श्रीराम व लक्ष्मण तिघेहि मनमुराद हसले. काही क्षणानंतर प्रभु म्हणाले
" माते तू जाणतेस की सिंहासन हे राजाची प्रतीक्षा करत आहे, आणि हे तर रघुवंशाच राजसिंहासन आहे ज्याची शोभा रघुकुलाच्या अनेक पराक्रमी राजानी सहस्त्रगुणित केली आहे. म्हणून त्यावर योग्य व्यक्तिस विराजमान करण्यासाठीच कुलगुरु महर्षि वशिष्ठ यानाही पाचारण केलय. ते आमच्याच प्रतिक्षेत आहेत. आपणसुद्धा या निर्णयात सहाय्य करावे अस आमच बन्धुन्च मत आहे. माता सुमित्रासुद्धा आपल्याच निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत."
" इतका मोठा निर्णय घ्यायचा आहे. सर्व अमात्य, मंत्रीगण सेनापति यानाही आमंत्रण दिल आहे ना. आम्हीहि येतो आहोत. सुमित्रादेवीना तसा निरोप द्या"
" जशी आज्ञा माते. आम्ही त्वरित अमलात आणतो आणि आपल्याला नेण्यास रथ सज्ज ठेवायची आज्ञा देतो. आम्ही पुढे होऊन एकवार कुलगुरुंची स्वये व्यवस्था पहातो. तोपर्यंत आपण तिथे यांव ही विनंती माते. "
इतकं बोलून श्रीराम आणि लक्ष्मण त्वरेने अतिथिगृहाकडे निरोप पाठवतात की गुरुदेव व ब्राम्हण यांस घेऊन भरताने लगोलग राजप्रासादातील अन्तःपुराकडे यावे. आपण स्वतः माता सुमित्रा याना निरोप पोहोचवतात की त्यानी माता कौसल्ये समवेत यावे. आपण पुढे निघत आहोत.
सर्व व्यवस्था करून व सर्वाना सर्व सूचनां देऊन दोघेही श्रीराम व लक्ष्मण लगेच राजमहालाच्या अन्तःपुरातील खास कक्षाकडे रवाना होतात. "
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment