भोग आणि ईश्वर ४०९
आपल्यासारखे सर्वसामान्य जीव आणि ज्ञानी माणसं यातील मुख्य भेद हा दुःख आणि भोग याच प्रसंगात सिद्ध होतो असं नाही, तर तो सुखाच्या काळातही जाणवतो. मुळात दोन्ही काळ हे आत्मपरिक्षणासाठी आहेत वा असतात. जर दुःखाचा काळ असेल तर, आपण आधी केलेल्या चुका, प्रमाद यांच्या भोगण्याचा काळ आहे, याची जाणीव, त्याकाळात सतत ठेवून जगलं की, जगणं सुसह्य होऊन जातं. उपभोगांच्या काळात हीच जाणीव अजून सूक्ष्म झाली पाहिजे की, मी हा आनंद जगतोय तो माझ्या कर्माचं मला योग्यवेळी मिळालेलं फल वा मोबदला आहे.
पण निसर्गाच्या बदलांच्या नियमानुसार, सर्व दिवस बदलते असतात. त्यामुळे माझ्या या उपभोगांच्या काळात, मला याची जाणीव ठेवली पाहिजे की, हे जसे कर्मफल उपभोग स्वरूपात आहेत, तसेच भोग व दुःख हे देखील, कर्मफल स्वरूपंच आहेत. त्यामुळे हे सर्व चक्रा कार गतीने सुरूच राहणार. पण मी या प्रवाहातील एक थेंब न होता, यातून पार होऊन, पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी स्वतःला सिद्ध करायचं आहे.
म्हणजेच जर मी सुखात वाहावात गेलो नाही तर, मी दुःखातही शांत आणि स्थिर राहीन. कारण मुळात सुख व दुःख हे माझ्याच कर्मफलाच्या दोन बाजू आहेत. ज्यामध्ये माझी गत काळातील, चांगली व वाईट, दोन्ही प्रकारची कर्म, मीच माझ्या गत काळात केली आहेत, आज ती समोर येत आहेत. ज्यामुळे आज येणारं सुख किंवा दुःख, हे मला पचवूनच पुढे जायचं आहे.
पण मुख्य गोष्ट जी आज अर्थात वर्तमानात मला करायची आहे, ती म्हणजे, माझं आताचं कर्म किंवा आताची कर्म मला योग्य पद्धतीने करून, भविष्यातील व कदाचित पुढच्या जन्मीचं आयुष्य सुलभ घडवायचं आहे. हा मुख्य उद्देश वर्तमानात असला पाहिजे. आपलं होतं काय की, मुळातच आधीच्या कर्मांची फलं जी आज भोगत आहोत, त्यावर आपला स्वभाव अवलंबून ठेवतो किंवा होतो.
म्हणूनच या दोन गोष्टी, वर्तमानातील भोग आणि वर्तमाना तील कर्म, ही वेगवेगळी आहेत किंवा असायला हवीत, हे विसरतो. या भेदाचं ज्ञान झाल्यावर, आपल्या वृत्तीत व वागण्यात व आचारात फरक पडायला हवा. जो फरक ज्ञानी माणसाच्या वागण्यात, बोलण्यात जाणवतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे, खरा ज्ञानी मनुष्य, आत्मोद्धार व आत्मोन्नत्ती हे अंतिम ध्येय मानतात व जाणतात. त्या व्यतिरिक्त मध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे चालत्या गाडीच्या मार्गात येणारी, मधली स्थानकं आहेत अशी त्यांची धारणा असते.
यावर अजून पुढे चिंतन करू, पण उद्याच्या भागात, पण आपलं नामस्मरण साधता साधता.
भोग आणि ईश्वर भाग १ व २ पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास, पुस्तक मागवता येईल.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment