भोग आणि ईश्वर ४११
प्रत्येक संक्रमण हे काही ना काही परिणाम व फल घेऊनच येतं. कारण तो परतीचा प्रवास असतो. मग ते संक्रमण सूर्याचं कर्क ते मकर असो किंवा मकर ते कर्क असो, वा कर्माचं संक्रमण असो. या दोन्ही, कर्क आणि मकर शब्दातून पुन्हा एका संयुक्त शब्दाचा, कर्म याचा आभास होतो. म्हणजेच विधात्याला असं तर सुचवायचं नसेल की, हे संक्रमण तर्काचं ज्ञान समोर ठेव आणि त्यावरून आपल्या आयुष्याचं गणित बांध. कारण, विधात्याने, हे ज्ञान सर्वप्रथम सुर्यालाच सांगितलं, असं गीतेत स्वतः भगवंत सांगतात. असो, बघूया काय साध्य होतय चिंतनातून.
काल पाहिल्याप्रमाणे, प्रत्येक कर्म हे आपल्या कर्मसंपात बिंदूला स्पर्श करून माघारी, फलरूप होऊन निघतं. म्हणजे ही दोन संक्रमणं झाली. पहिलं आपल्याकडून वा आपल्या देह, बुद्धी वाचा व मन याद्वारे, घडलेलं कर्म, आपल्यापासून संक्रमित झालं, तो एक बिंदू किंवा एक संक्रमण आणि पुन्हा कर्मसंपात बिंदूला स्पर्श करून माघारी निघालं, ते दुसरं संक्रमण. इथे खरतर त्या कर्माची यात्रा संपली पाहिजे.
पण प्रत्येक वेळी असं होईलच हे खात्रीने सांगता येत नाही. याचं कारण म्हणजे ते दुसरं संक्रमण जिथे पोचतं, ते आपण, व्यक्तीपरत्वे, स्थलपरत्वे व कालपरत्वे भिन्न आहोत, म्हणजेच subjective आहोत. म्हणजे कर्मफल दुसऱ्या बिंदूवर पोचल्या नंतर, त्याची प्रतिक्रिया निर्माण होते. अगदी एखाद्या भिंतीवर चेंडू मारला तरी, त्याची प्रतिक्रिया म्हणून, भिंतीकडून तसाच प्रतिसाद त्या चेंडूला दिला जातो. मग आपण तर माणूस आहोत, भाव भावना, मन, बुद्धी असलेले आणि प्रतिक्रियेसाठी देह व वाचा असलेले.
म्हणजे पुन्हा या दुसऱ्या बिंदूला स्पर्श केलेलं कर्मफल, शांत न होता, उलट प्रवासाला निघतं आणि हे तिसरं संक्रमण अनिश्चित असतं. म्हणजे ते कोणत्या वेळी कर्मसंपात बिंदूला स्पर्षेल आणि परत कधी माघारी येईल हे सांगता येत नाही. अर्थात तसं ते कोणत्याही कर्मात सांगता येत नाही. म्हणजे आपलं आयुष्य हे या संक्रमणाची साखळी आहे.आता यावर उपाय काय करायचा. खरंतर याच तर्काला जाणून आणि या गणिताचं गोंधळात टाकणारं समीकरण लक्षात घेऊनच, विधात्याने याचं सोप्प उत्तर अनेक युगात, अनेक रुपात देऊन, पुन्हा श्रीमद्भगवद्गीतेत स्वमुखे देऊन ठेवलं आहे.
आपण दुसऱ्या संक्रमणाचा विचार मनातून काढला, तर आपलं पन्नास टक्के काम झालं असं म्हणता येईल का. असं पहा की, जसं सूर्याचं संक्रमण हा चक्रानुक्रमे घडणारं काळाचं गणित आहे, त्यात पृथ्वी सूर्याभोवती फिरायची थांबली तरच, हे कर्क ते मकर आणि मकर ते कर्क संक्रमण थांबू शकतं. पण ते अशक्य आहे. पण कर्मा बाबत, हे स्वातंत्र्य विधात्याने, आपल्याला प्रदान केलं आहे. म्हणजे मूळ कर्म घडत असताना, अर्थात पहिल्या संक्रमणाच्या वेळीच त्यातील मनरुप तत्व काढून घेतलं की, पुढील सर्व संक्रमणं थांबतील.
पण हे कसं साधेल, यावर उद्याच्या भागात, चिंतन करूया. पण तोपर्यंत नामाचं औषध घेत घेतच.
भोग आणि ईश्वर भाग १ व २ पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास, पुस्तक मागवता येईल.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment