Skip to main content

भोग आणि ईश्वर ४२१

भोग आणि ईश्वर  ४२१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)

नकारात्मक विचार मनात येण्यापासून, स्वतःहून, पूर्ण जाणिवेने, निश्चय करावा. असा निश्चय केल्यानंतर त्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक कृती करावी. सुरवातीला नक्कीच अडचणी येऊ शकतात. म्हणजे आपण प्रयत्नपूर्वक एखादा सकारात्मक विचार करत असताना, मनाला व बुद्धीला मागे खेचून नेणारे आणि अश्या सकारात्मक कार्यात खोडा घालणारे, नकारात्मक विचार येतील. 

पण अश्या प्रत्येक वेळी वा प्रत्येक क्षणी, जाणीवा जागृत ठेवून स्वतःला किंवा मनाला समजावून सांगत, त्या मनाला व बुद्धीला, पुन्हा पुन्हा जागेवर आणणं, हे सुरवातीला गरजेचं असतं. मनाला काही गोष्टींची किंवा चांगल्या विचारांची मशागत करण्याची सवय, जाणीव पूर्वक लावून घेणं, महत्वाचं आणि गरजेचं आहे. खरंतर जाणीव, ही या सर्व प्रवासात किंवा आरंभीच्या काळात, खूप मोठं काम करते.  जाणिवांची जागृती म्हणजे एक प्रकारे मनातील त्रयस्थ जागा असणं. 

जाणीवा या एकप्रकारे मनाला जागं ठेवण्याचं कार्य करतात. म्हणजे जाणीवा या पथावरील दिव्यासमान आहेत वा असतात. त्या सतत मनाला आठवण करून देतात, किंवा ज्यावेळी आपण एखादी गोष्ट विसरून पुनः पहिल्यासारखा विचार करायला लागतो, त्यावेळी ज्ञान जाणीव यांचा सदुपयोग होतो किंवा करवून घेता येतो. फक्त तो करवून घेता आला पाहिजे. 

एक गोष्ट सर्वात महत्वाची, जी लक्षात आणून द्यावी लागेल, ती म्हणजे, मनाला, बुद्धीला आणि देहाला, जशा सवयी लावू, तश्या सवयी आत्मसात करण्याची लवचिकता, या तिन्हींमध्ये असते. म्हणून सतत मनाला समजावून सांगण्याची सवयसुद्धा लावून घेतली पाहिजे. कदाचित नित्य चिंतनातून या गोष्टी वा सवयी आत्मसात करता येऊ शकतील. 

सवय, ही नित्य एखादी गोष्ट करत गेल्यास, मनाला बुद्धीला व देहाला घालून देण्यात आलेला नियम. एखादी गोष्ट आपण ठराविक वेळी, ठराविक वेळ रोज किंवा ठराविक अंतराने करत गेल्यास, कालांतराने त्या गोष्टी अंगवळणी पडतात किंवा सवयीच्या होतात. यामध्ये अंगवळणी या शब्दाच्या अर्थामध्ये सवयीचं बीज दडलेलं आहे. 

अंगाला एखादं वळण लावून घेतल्यास, त्या गोष्टी, त्या त्यावेळी करण्याची सवय जडते आणि मग ती गोष्ट आपल्या नित्य वर्तनाचा भाग होऊन जाते. सवय इतकी अंगवळणी पडू शकते की, ती गोष्ट वा ते कार्य आपण करतो आहोत किंवा करून मोकळे झालो, हे देखील जाणवत नाही, इतकी ती कृती सहज घडून जाते. 

आपण खूपवेळा म्हणतोसुद्धा की, सावयीप्रमाणे घडेल किंवा घडून गेलं. या सवयींचे दोन प्रकार आहेत. चांगल्या सवयी आणि वाईट सवयी.  यावर उद्या चर्चा करूया. पण नामाची जडवून घेतलेली सवय, कधीही सुटता उपयोगी नाही. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...