भोग आणि ईश्वर ४१२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
देहाची वा देहाने घडणारी कर्म ही जेवढी अनिवार्य आहेत तितकीच बद्ध करत नाहीत. म्हणजे श्वास घेणं, हे जगण्या साठी अनिवार्य आहे. अन्नपाणी सेवन देहासाठी अनिवार्य आहे. म्हणून त्यासाठी करावं लागणारं कर्म हे बद्ध करत नाही आणि त्याच्या करण्याने बद्धता येत नाही. पण त्याच्या अनिवार्यतेच्या मर्यादेत राहूनच, ती ती कर्म केली तर, त्यातून बद्धता येणार नाही.
म्हणून कर्माच्या संक्रमणावर बोलतांना या कर्मांना वगळून, आपण फक्त बद्ध करणाऱ्या कर्मांवर बोलत असू, हे वेळोवेळी ध्यानात असुद्या. आता कर्माचं संक्रमण, ते कर्म, काया वाचा मन व बुद्धी या सर्वांतून किंवा कोणाही एकाच्या संकल्पाने घडत असताना, व्यक्तीला बद्ध करतं. पण श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी सांख्ययोग सांगताना, हे सांगितलं आहे की, ज्ञानी मनुष्य, या जगातील व जगताबाहेरील सर्व ज्ञान जाणत असतो. त्याच्या मनाची व आत्म्याची प्रगल्भता व त्याच्या जाणिवांची व्याप्ती अमर्याद झालेली असते.
त्यामुळे तो मूळ स्वरूपात विश्वाला, विश्वचैतन्याला जाणत असल्यामुळे, उत्पत्ती, स्थिती व लय, या सर्व खेळात ईश्वरी संकल्प श्रेष्ठ आहे हे जाणतो. किंबहुना ईश्वर हाच प्रत्येक क्षणातील प्रत्येक संकल्पाचा जन्मदाता आहे, हे तो जाणून असतो. त्यामुळे, या जाणिवांनी त्याची ज्ञानाची व्याप्ती वाढलेली असते. ज्यामुळे त्याच्या विचारांच्या कक्षा रुंदावलेल्या असतात. म्हणून, स्वतःच्या प्रत्येक कर्माला तो ईश्वरी यज्ञ किंवा ईश्वराप्रत जाण्याचा यज्ञमार्ग म्हणून पहात असतो. म्हणजे त्याचा मी अर्थात देह व देहाभिमान हा शून्यवत असतो.
किंबहुना, त्याला आत्मरुप स्वतःची खरी ओळख व खरी जाणीव झालेली असल्यामुळे, तो वास्तविकपणे सर्व गोष्टी, स्वतः करत असूनही, स्वतःसाठी काहीच करत नाही. म्हणजे मला प्राप्त होणारे भोग व उपभोग हे वास्तविक ईश्वराच्या संकल्पनेचा एक भाग आहे. यामध्ये माझा सहभाग हा तांत्रिक हिस्सा आहे. म्हणजे करवून घेणारा व करणारा दोन्ही ईश्वर आहे. त्यामुळे वास्तविक अर्थाने मी काहीच करत नाही.
जर मी काहीच करत नाही, तर मग प्राप्त सुख व प्राप्त दुःख यावर माझा काहीही अधिकार नाही. मग त्यामध्ये माझी बौद्धिक व मानसिक गुंतवणूक शून्य असावी किंवा असली पाहिजे. किंवा तसा कोणताही भावस्पर्श माझ्या मनाला होता कामा नये, ही त्याची जाणिवेची जागृती दृढ आणि कायमस्वरूपी, त्याला प्राप्त झालेली असते.
त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीच्या नियमानुसार, जिथे गुंतवणूक शून्य, तिथे व्याज वा परत मिळणारं मूळ भांडवल शून्यच असणार, हे सरळसाधं तर्कशास्त्र आहे. म्हणून ज्ञानी किंवा ज्याला सांख्यमार्गी म्हणतात, तो ज्ञानी मनुष्य, मुळातच वैराग्य, त्याग यांचा अंगीकार करून, मनाने संन्यस्त झालेला असतो. म्हणजे मी काहीही करत नाही, हे ज्ञान, ज्यावेळी, मनात दृढतेने संकल्पित होतं, त्यावेळी कर्माचं मूळ अर्थात पाहिलं संक्रमण, हे नाहीसं होतं.
म्हणजे खरा ज्ञानी, प्रत्येक कर्मातील मनाचा संकल्प काढून, त्याजागी, ईश्वराचा संकल्प व त्या संकल्पातील मला प्राप्त झालेला हा देह, हादेखील एक ईश्वरी सहभाग आहे, हे दृढतेने जाणून असतो. म्हणून देहाने संसारात असूनही, मनाने योगी, वैरागी असतो. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे नाथमहाराज, अर्थात श्रीएकनाथ महाराज. जे देहाने संसारी, वैवाहिक असूनही, मनाने खरे संन्यासी वा ब्रह्मचारी होते.
आता हा पहिल्या संक्रमणातून सुटण्याचा सांख्य मार्ग झाला. याचप्रमाणे गीतेत भगवंतांनी, कर्माचं पहिलं संक्रमण, टाळण्यासाठी, अजूनही मार्ग सांगितले आहेत. त्यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. पण नामाच्या आपल्या संकल्पाचा विसर न पडू देता.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment