भोग आणि ईश्वर ४०६
मनाला शांत केल्यानंतर आणि विवेकाचा बांध घातल्या वर, येणारे विचारच, विचार करून येतात. थोडं विचित्र वाक्य आहे. पण त्याचा परामर्ष घेऊ. मुळात फक्त मन शांत केल्यावर आणि विवेक धरल्यावर, काम।झालं का. तर यात विवेक धरणे किंवा विवेकाने वागणे म्हणजे नक्की काय याचा जरा विचार करू. कारण हा शब्द सर्वत्र वापरला जातो, पण त्याचा नेमक्या शब्दात अर्थ फार कमी ठिकाणी दिलेला आढळतो. म्हणून त्याचा आधी विचार करू.
मुळात विवेक म्हणजे सारासार विचार, योग्य अयोग्य यांची जाण ठेवून केलेला विचार, कर्म कर्तव्य यांना स्मरून व त्यांचा विचार करून निर्णय घेणे, तारतम्य बुद्धी वापरून व परिस्थितीची जाण ठेवून म्हणजेच थोडक्यात सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून अर्थातच ज्याला इंग्रजीत rational thinking म्हणतात ते. विवेकाचा सर्वात मोठा पाया म्हणजे भावभावना टाळून किंवा कोणत्याही भावनेच्या भरात न जाता निर्णय घेणे.
मुळात विवेक ही निर्णयप्रक्रिया नसून ती एक विचार प्रक्रिया आहे. म्हणजे असं की, प्रत्येकवेळी काही निर्णय घ्यायचा असल्यावरच विवेक असावा असं नसून, साध्या साध्या गोष्टी करतानासुद्धा, शांतपणे केलेला विचार. उदाहरणार्थ विवेक असलेला माणूस सार्वजनिक ठिकाणी आपल्या वर्तणुकीचा विचार करेल. पण त्याही पुढे खरा विवेकी मनुष्य आपल्या कृतीचा, वागण्याचा, बोलण्याचा स्थलकाल यांच्या पलीकडे जाऊन, सखोल विचार करेल.
म्हणजेच आता लक्षात येईल की, प्रोफेशनल थिंकर हा फक्त आपल्या व्यवसायासंबंधीच्या जगतात व वेळेत विवेकी असू शकेल. म्हणजे त्याच्या व्यावसायिक गरजे नुसार व त्यापुरताच. याउलट खरा विवेकी मनुष्य स्थलकाल, व्यक्तिगत जीवन सामाजिक जीवन, सार्वजनिक आवश्यकता वा कोणत्याही प्रकारची गरज नसताना किंवा नुसता बसल्या जागीसुद्धा विचार करताना, विवेकानेच विचार करेल. म्हणजे तो अंतरातून वा आत्म्याच्या गाभ्यातून विवेकी असतो.
म्हणजे विवेक हा देह, बुद्धी व मन यांच्या पलीकडे सुप्तमना पर्यंत पोचलेला असेल. तसा तो असेल तरच त्याला खरा विवेक म्हणता येईल. अन्यथा तो परिस्थिती नुसार धारण केलेला वेश किंवा कातडी म्हणता येईल. किंवा एकप्रकारे संधीसाधुपणा. पण खरा विवेक हा ज्ञानाच्या पायावर आधारलेला असतो. हे ज्ञान भौतिक जगताचं नसून, भौतिक जगतापलीकडे असलेल्या, आत्मिक, अध्यात्मिक, ब्रह्मांड, ब्रह्मांडाबाहेरील त्रयस्थ शक्तीचं आणि तिच्या संबंधीच्या जाणिवांचं ज्ञान असतं.
हे ज्ञान झालेला आत्मा, भौतिक जगताच्या, देह व देहाच्या भावभावनांच्या पलीकडे जाऊन, सर्व गोष्टी उच्च पातळीवर, अर्थात प्रवाहात न पोहता, त्रयस्थ व तटस्थ दृष्टीने विचार करू शकतो. भौतिक जगतातील लाभहानी यांच्या पलीकडे गेलेल्या मनात व्यक्तिगत, म्हणजेच देहाचे व देहबुद्धीने लिप्त मनाचे विचार वा त्यांची बंधनं व मोह, येत नसल्यामुळे, विचार हे देहातीत असतात.
इथे विवेकाला आत्मज्ञानाची जोड मिळते. आत्मज्ञानी विवेकी म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे खरा ज्ञानी किंवा मुमुक्षु. ज्याला यथार्थाचं ज्ञान झालेलं असल्यामुळे विचारांची बैठक व ज्ञानाचा पाया प्राप्त झालेला असतो. त्यामुळे दृष्टी, दृष्टिकोन, विचार व वैचारिक पातळी यांच्यात विशालता आलेली असते. सूक्ष्मातून विशालतेकडे मनाचा आलेख सहजी जाऊन, सारासार विचारात प्रगल्भता आलेली असते. आत्मज्ञानी व विवेकी माणसाबद्दल अजूनही जाणून घेऊया, पण उद्याच्या भागात. अर्थात नामाच्या मार्गावरील यात्रा अशीच सुरू ठेवून.
भोग आणि ईश्वर भाग १ व २ पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास, पुस्तक मागवता येईल.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment