Skip to main content

भोग आणि ईश्वर ४०७

भोग आणि ईश्वर  ४०७ 

आत्मज्ञान म्हणजे मुळात स्वतःबद्दल. किंवा या ब्रह्मांडा तील आपल्या अस्तित्वाबद्दल, जगताच्या पालनकर्त्या बाबत ज्ञान. म्हणजेच मी कोण, कुठून आलो आणि कुठे जाणार, का आलो  या सर्वांबद्दलचं ज्ञान जीवनाकडे आणि जीवनापलीकडे आणि जन्मजन्मांतरीचं ज्ञान अर्थातच आत्मज्ञान. हे आत्मज्ञान झालेला जीव जगातील वा जगताबाहेरील कोणत्याही गोष्टीने उदास, भयग्रस्त, चिंताग्रस्त, क्रोधीत, मोहित वा त्रस्त होत नाही. 

कारण मुळात त्याला मिळवण्यासारखं आणि गमावण्या सारखं काहीच उरलेलं नसतं, पण तरीही त्याचा जीवना कडे बघण्याचा दृष्टिकोन उदास नसतो. जितकं जीवन विधात्याने क्रमागतीने दिलं आहे, तितकं जीवन निरसपणे न जगता सकारात्मक दृष्टीने आणि शुद्ध अंतःकरणाने जगण्याचा प्रयत्न व दृष्टिकोन आत्मज्ञानी माणसाचा असतो. 

त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान झालेलं असल्यामुळे, जाणीवा प्रगल्भ झालेल्या असतात. अश्या प्रगल्भ जाणिवांनी, जीवन जगण्याचा विशाल व उच्चतम दृष्टिकोन अशा माणसाला प्राप्त झालेला असतो. प्रारब्ध व संचितात आपले भोग व उपभोग, कोणताही राग लोभ क्रोध मद न बाळगता वा कोणावरही आकस, राग लोभ न ठेवता भोगूनच संपवली पाहिजेत, याबद्दल त्याचे विचार ठाम असतात. 

म्हणून जे संचितात आपणच आपल्यासाठी मांडून ठेवलं आहे, ते दान वा पात्र रीतं करूनच पुढे जाणं योग्य , हा विचार ठाम असतो.  म्हणून वाट्याला आलेला भोग व पदरात पडलेलं सहज आणि काहीही तक्रार वा कुरकुर न करता संपवण्याचा ज्ञानी दृष्टिकोन त्याला प्राप्त झालेला असतो. अश्या माणसाच्या प्रत्येक पावलावर किंवा प्रत्येक क्षणाला, विचारात व वागण्यात विवेक व विवेकाचं दर्शन पाहणाऱ्याला जाणवतं. 

खरंतर हे एक  आदर्श वागणूक आणि विचार असलेलं व्यक्तित्व असतं. सर्वसामान्य बुद्धी व तर्कांच्या पलीकडे असलेलं आत्मज्ञान आणि त्याच्या सोबत जाणारा विवेक माणसाला काम क्रोध अश्या अनेक।विकारांपासून लांब ठेवतो. अर्थात कर्मातील पूर्वीचे दोष व त्या दोषांची फलं समोर आली तरीही आत्मज्ञानी मनुष्य, एकदा आत्मज्ञान व आत्मप्रचिती आलेली असल्यामुळे , पुन्हा माघारी जात नाही. कारण अश्या संबंधाना जोडणं ज्ञानाच्या तर्कां पलीकडे आहे, हे ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं. 

सर्वसामान्य जीव मात्र अश्या ज्ञानी माणसाचं व्यक्तित्व पाहून, आश्चर्यचकित होतो. पण आत्मज्ञानी माणसाची मनःस्थिती कशी असते हे उद्याच्या भागात पाहू. 

भोग आणि ईश्वर भाग १ व २ पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास, पुस्तक मागवता येईल.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...