भोग आणि ईश्वर ४१९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
आपण चिंतनाच्या टप्प्यावर आलो आहोत, तर हाच विषय थोडा अजून समजून घेऊ. मुळात एक गोष्ट लक्षात आली असेल की, चिंतन म्हणजे मनात होणारं विचार मंथन. आणि आपल्याला दुसरं तिसरं काही करायचं नसून, मनातील विचारांना नकारात्मक भावाकडून, सकारात्मक भावाकडे नेऊन, तिथे स्थापित करायचं आहे. म्हणजे ऊर्जा सकारात्मकतेकडे वळवणं.
कारण प्रत्येक विचारामागे ऊर्जा कार्य करते, जी त्या विचारांना गती देऊन, त्यांना एका दिशेने घेऊन जाते. म्हणजे कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला जशी गती असते, तशी गती विचारांना असते. ती ऊर्जेची गती. यासाठी देहाची बुद्धीची व मनाची ऊर्जा वापरली जाते. याच उर्जेला जर नकारात्मक विचारांच्या मागे लावलं, तर दोन प्रकारे हानी होते.
एक म्हणजे देह बुद्धी व मन यांची झीज होतेच, पण दुसरं म्हणजे मन, बुद्धी व देह यांच्या माध्यमातून चुकीच्या विचारांसाठी वापरलेल्या उर्जेतून मिळणारं कर्मफलसुद्धा पुन्हा मन बुद्धी व देह यांची झीज घडवून आणतं. हा कर्मफल नियम आपण पाहिला आहेच की, प्रत्येक कर्म आपल्या ऊर्जा व शक्तीच्या प्रभावा इतकंच, पण विरुद्ध दिशेकडून आपल्या दिशेकडे, तितकंच ऊर्जा व शक्ती खेचणारं फल अर्थात बल स्वतःसोबत घेऊन येतं. यावरच आधारित न्यूटनचा तिसरा नियम आहे. Every action has equ amd opposit reaction.
याला अजून विस्ताराने पाहूया, म्हणजे पूर्ण ध्यानात येईल. म्हणजेच आपण जेव्हा एखाद्याबद्दलच्या चुकीच्या विचारात काही काळ घालवतो किंवा एखाद्याला दोष वा एखाद्याचा राग करण्यात वेळ किंवा नुसता त्याबद्दल नुसता विचार करण्यात, शक्ती व ऊर्जा वाया घालवतो. त्यावेळी त्या कर्मातून तयार होणारं फल, भविष्यात निष्कारण व अकारण आपली तितकीच ऊर्जा शक्ती व वेळ खर्च करवून घेणार, हे ध्यानात असुद्या.
म्हणजे विचार करा, आपण चुकीच्या, अनिष्ट व दिशाहीन विचारांनी स्वतःची अकारण व निष्कारण किती ऊर्जा खर्च करतो आणि ही ऊर्जा व शक्ती दुप्पट खर्च होते. एकदा मूळ विचारांच्या कर्मात आणि पुन्हा तितकीच ऊर्जा व शक्ती कर्मफल भोगताना. अर्थातच या जाणिवे नंतर आपल्याला सर्वात प्रथम, चुकीच्या विचारांसाठी खर्च होणारी आपली देह बुद्धी व मन यांची ऊर्जा थांबवायची आहे. हा पन्नास टक्के प्रवास करण्याचा विचार झाला कि यामुळे पन्नास टक्के काम झालं.
बाकीच्या पन्नास टक्क्याबद्दल आपण उद्याच्या भागात चर्चा करूया. अर्थातच नामाचा नित्य क्रम सुरू ठेवूनच.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment