भोग आणि ईश्वर ४२३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
आता चांगल्या सवयीचा विचार करायचा झाल्यास. आपण मुळात कोणताही विचार हा सकारात्मक, चांगला सकस आणि भल्याचाच करावा. मुळात हाच आपल्या मनाचा पाया किंवा बेस असावा. क्षणिक, तात्पुरते येणारे वाईट, क्रोधाचे,एखाद्याबद्दल चुकीचे विचार हे त्या क्षणीच मनातून काढून टाकले पाहिजेत. मुळातच असे विचार येणं हे, आपल्याला पुन्हा पुन्हा मागे नेत राहील, हे लक्षातच राहिलं पाहिजे.
म्हणूनच, मनाला सतत जागरूक ठेवून, कर्म केलं पाहिजे. कारण कर्म हे जरी देह, बुद्धी वाचा इत्यादी करत असले, तरी त्या प्रत्येक कर्मामागे मनाची प्रेरणा, ऊर्जा व शक्ती असते. ज्यावेळी तशी प्रेरकशक्ती त्यामागे नसते, तेंव्हा आपण म्हणतोच की, हे काम किंवा ही गोष्ट मी मनापासून केली नाही. म्हणून प्रत्येक कर्मापाठी मनाला जोडून ते केल्यास, आपोआप समाधान मिळत जाईल.
मनाला, असं प्रत्येक कर्मामागे लावताना, मनाचा पाया हा उत्तम, उन्नत विचारांचा आणि त्यामुळे कोणाचंही वाईट किंवा गैर चिंतणारा नसावा, हे कटाक्षाने ध्यानात राहू द्या. म्हणजेच चुकीचे आलेले विचार तिथल्यातिथे ताबडतोब मनातून हद्दपार केले पाहिजेत किंवा करता आलेच पाहिजेत. त्यासाठी मनाला सतत समजावत बसावं लागेल, हे चांगलं नाही, हे गैर आहे.
अश्या चांगल्या विचारांसाठी किंवा गैर विचार टाळण्या साठी प्रथम एकच विचार मनात आणावा की, मी यातून कोणाचं अहित चिंततो आहे का किंवा कोणाबद्दल चुकीचं बोलत आहे का. चांगला विचार तो, ज्यामध्ये आपण कोणाचंही अहित, वाईट चिंतत नाही आणि सर्वांबद्दल सकारात्मक विचार करतो. ज्यामुळे आपण सतत चांगल्या सकारात्मक लहरी वा vibes निर्माण करू.
अश्या सकारात्मक लहरीतून जी कर्म निर्मिती होईल, ती आपल्याकडे उत्तम फलाला घेऊन येईल. म्हणजेच शुद्ध सकस व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे विचार, मनात असतील तर, त्यातून कर्माना मिळणारी प्रेरणा, ऊर्जास्त्रोत व शक्ती ही तश्याच प्रकारची असणार. मनाची उंची व खोली वाढवून मनाला प्रगल्भता देणाऱ्या या सकस व सकारात्मक विचारांना सतत मनात, मनाने व मनातून बाळगण्याने, नकारात्मक विचार व कर्म यातून, होणारी मनाची, देहाची व बुद्धीची नकारात्मक झीज होणार नाही.
कारण आपण जाणत नाही की, अश्या नकारात्मक विचारांनी आपण स्वतःच्या देह, बुद्धी मन व आत्मा यांची किती हानी करून घेतो. कारण मनातील विचार हेसुद्धा एक कर्मच आहे आणि अश्या चुकीच्या कर्मासाठी, वापरलेली मनाची ऊर्जा, तितकीच नकारात्मक ऊर्जा निर्माण करून, मनाला अनावश्यक असा, नकारात्मक भार निर्माण करते. म्हणूनच इष्ट विचार बाळगून, अनिष्ट विचार काढून टाकता आलेच पाहिजेत. त्यासाठी मनाला कणखर आणि सजग करावं लागेल.
नकारात्मक विचार हे सहज मनात येऊन, अतिरिक्त नकारात्मक ऊर्जा निर्मिती करतात. त्यामुळे त्या वेळी जरी उर्जायुक्त वाटलं, तरी सरतेशेवटी ते घाताला कारणी भूत आहे. कारण एक कायम ध्यानात ठेवा की, देह बुद्धी व मन कर्म करून जातं. पण पुढे जन्मोजन्मी आत्मा, विविध देहातून ते भोगत जातो. आपण निदान या जन्मा तून, पुढे जाणाऱ्या आत्म्याला सावरण्याचा प्रयत्न करू शकतो.
यावर अजूनही चिंतन अपेक्षित आहे, पण ते पुढच्या भागात. तोपर्यंत सकारात्मक ऊर्जा व विचार, यांचा मनात गांभीर्याने विचार होऊदे आणि नामस्मरण सुरूच राहूदे.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment