भोग आणि ईश्वर ४२४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनाचा विचार करताना, एक विचार सहज डोकावून जातो,तो म्हणजे,मनाची शक्ती जितकी अफाट, तितकाच त्याचा व्याप, पसारा, व्यास अचाट आहे. त्यामुळे त्याची ऊर्जा देखील अमर्याद आहे. खरंतर मनाबद्दल ही गोष्ट जाणल्यानंतर, वास्तविक सर्व सामर्थ्याची कल्पना किंवा जाणीव येऊन, त्या अफाट आणि अचाट शक्तीचा उपयोग करून घेता यायला पाहिजे.
पण अजून एक गोष्ट मनाबद्दल आहे, ती म्हणजे, त्या मनाचं चंचलत्व किंवा विषयाकडे सहजी असलेली ओढ किंवा आसक्ती. या एका अवगुणामुळे, अनेक बाबतीत मर्यादा पडतात वा येतात. मुळात विधात्याने अशी रचना का केली असेल, असा एक विचार बरेचवेळा येतो. पण त्याचं उत्तर म्हणजे, जे साध्य करण्यासाठी हा देह ईश्वराने निर्माण केला, ते साध्य करणं, फक्त देह, फक्त बुद्धी यांनी शक्य नाही. तर त्यासाठी ऊर्जा, शक्ती व प्रेरणा आवश्यक आहे आणि ती मनाकडे आहे. जेंव्हा हे तिन्ही एकत्र येऊन कार्य करतील, तेंव्हाच सर्व ईश्वरी इच्छेनुसार साध्य होईल.
म्हणजे जर देह हा वाहन असेल तर मनाची ऊर्जा व शक्ती, हे त्याचं इंधन आहे. म्हणजे वाहनाशिवाय इंधन निरुपयोगी आहे, तर इंधनाशिवाय वाहन हे काही करू।शकत नाही. पण हे इंधन योग्य प्रकारचं आणि योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी मिळालं, तरच वाहन, नीटपणे चालू शकतं. आता जे इंधन आहे, ते शिक्षण, संस्काराने, संगतीने, विचाराने, संचित व कर्म यांनी घडतं किंवा बिघडतं.
म्हणजेच संस्कार, शिक्षण, संगत, विचार, संचित व कर्म, हे सहा घटक, मनातील ऊर्जा व शक्ती यांचे नियंत्रक म्हणता येतील. यातील शिक्षण, संस्कार आणि संचित हे अनेकदा आपल्या पूर्व कर्मानुसार प्राप्त होतात. मग संगती, विचार व कर्म हेच घटक उरतात, जे आपण स्वतः नियंत्रित करू शकतो किंवा यामध्ये आवश्यक बदल संभवतात. म्हणजे मनाला नियंत्रित करण्याला सुद्धा एकप्रकारे मर्यादा आहे.
यामध्ये आजूबाजूचा परिसर किंवा वातावरण हे देखील थोड्या फार प्रमाणात कार्य करते. थोड्याफार प्रमाणात यासाठी म्हटलं की, मनावर नियंत्रण असलेले आत्मे, देह कोणत्याही स्थितीत वा वातावरणात असले, तरी योग्य दिशेने कार्य करत, उन्नत्ती साधू शकतात. अशी उदाहरणं सुद्धा आपण पाहिलेली आहेत, ज्या मध्ये कोणत्याही विपरीत परिस्थितीत राहिलेले, आपला शैक्षणिक व आर्थिक विकास साधतात किंवा साधून घेऊ शकतात.
या पूर्वजन्मीच्या पुण्याईने प्राप्त गोष्टी झाल्या. त्या व्यावहारिक जगतात, उपयोगी पडतात. पण आत्मिक उन्नत्ती साधण्यासाठी संगती, विचार व कर्म हे खूप महत्वाचे आहेत. या मुद्द्यावर अजून चिंतन करूया, पण नाममात्र का होईना नाम घेत घेतच. कारण देवचिये द्वारी उभा क्षणभरी..... ....
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment