भोग आणि ईश्वर ४१४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कर्मावर लिहिताना, कर्माच्या मूळ स्वरूपाकडे त्याच दृष्टीने पाहणं गरजेचं आहे, जे वास्तविकपणे अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे.उदाहरणार्थ आपण सांसारिक कर्म करताना किंवा पारमार्थिक कर्म करताना, त्याच्या मागे असलेल्या उद्देशावर मन एकाग्र करतो आणि मग आपोआप मनातील वासना किंवा विषय, त्यामध्ये गुंतून, बद्ध कर्माची शृंखला तयार होते किंवा आपण ती तयार करतो. त्यातूनच जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकण्याची आपणच तयारी करतो.
यावर उपाय काय, तर देह कर्मात गुंतला तरी मनाला त्यात गुंतू न देता, मनाला तटस्थता द्यायची किंवा मनाला तटस्थ करायचं.म्हणजे नक्की काय करायचं, तर सांसारिक कर्मात देहाचा सहभाग असतो, त्यात देहाला देहाच्या गरजा पूर्ण करण्याची मुभा देऊन, मन मात्र त्यात गुंतू द्यायचं नाही. उदाहरणार्थ, आपण खूपवेळा आपल्या वर लादण्यात आलेलं,एखादं नावडतं काम नाईलाजास्तव करतो. म्हणजेच त्या कर्मात, कर्म करत असताना, देह गुंतलेला असला तरी, मन त्यात गुंतलेलं नसतं.
म्हणजेच त्यावेळी त्या कामात मनातील लहरी, त्या कर्माची प्रेरणा नसते. कारण उद्देश कर्म करण्याचा असला तरीही, तो उद्देश आपला नसल्यामुळे, आपण मनाने कधीही त्यात सहभागी नसतो. त्यामुळे त्या कामाचं श्रेय आपल्याला मिळालं, तरीही मनात आपण जाणत असतो की, मी हे मनापासून केलेलं नाहीये, त्यामुळे वास्तविक, या श्रेयाचा अधिकारी मी नाही. बघा आठवून, कधी अश्याप्रकारे काम केलेलं असेल तर.
या एका उदाहरणावरून लक्षात येईल की, गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलेलं व त्यांना अपेक्षित असलेलं, निष्काम कर्म म्हणजे काय. ज्या कर्मामध्ये मनाचा सहभाग, शून्य असतो, ती कर्म माणसाला परिणामांना किंवा फलाला बद्ध करू शकत नाहीत. जसं मगाशी सांगितलेल्या उदाहरणामध्ये आपण मनाने त्या कर्मात गुंतलेलो नसल्या मुळे, आपण जाणतो की, या श्रेयाचा अधिकार मला नाही कारण मी हे काम खरंतर मनापासून केलेलंच नव्हतं.
अश्या कामात, मुख्यतः दुसरी गोष्ट जी घडते, ती म्हणजे, यदाकदाचित अपयश आलं किंवा अपेक्षित परिणाम सदर कर्म साधू शकलं नाही, तर आपण मनाने त्यात गुंतलेलो नसल्यामुळे, आपल्याला त्याच्या परिणामांचं सोयर सुतक काहीही नसतं. अगदी हेच श्रीकृष्णांना अपेक्षित आहे. म्हणजेच वरील उदाहरणात म्हटल्याप्रमाणे आपण जर प्रत्येक कर्म, हे माझं कर्म नसून, देहासाठी करत असलेलं एक नित्य कर्म आहे, त्यामुळे माझा (अर्थात मनाचा, बुद्धीचा व आत्म्याचा) त्याच्याशी काहीही संबंध नाही, हे मनात ठेवून कर्म करत गेलो, म्हणजेच भगवन्त म्हणतात, त्याप्रमाणे त्यातील मी काढून कर्म केलं, तर ते कर्म बद्धता आणत नाही.
वरील उदाहरण आणि त्या नंतरचं विवेचन नीट वाचून आकलन केल्यास, निष्काम कर्म करण्यासाठी काय अपेक्षित आहे आणि निष्काम कर्मयोग साध्य करण्या साठी काय करणं अपेक्षित आहे, हे लक्षात येईल. या पुढील चिंतन उद्याच्या भागात. नामस्मरण मात्र नित्य सुरू राहुद्या, तेच अपेक्षित आहे आणि तिथे मात्र मनाची पूर्ण गुंतवणूक असुद्या.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment