भोग आणि ईश्वर ४२२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
सवयीप्रमाणे घडणं ही अंगवळणी पडलेली बाब आहे हे आपण काल पाहिलं. पण सवय म्हणजे एखादी गोष्ट, कर्म करण्याचं देहाला, बुद्धीला व मनाला लागलेलं वळण. सवय हा नेम वा नित्य घडणारी गोष्ट आहे. अशी सवय कोणत्याही गोष्टीची व नित्य बाबीची असू शकते. पण सवय ही चांगल्या आणि वाईट किंवा सकारात्मक आणि नकारात्मक अश्या दोन्ही गोष्टींची असू शकते.
म्हणजे लाभदायक आणि हानिकारक अश्या सवयी असू शकतात. नित्य सवयी या नित्य कर्म निर्माण करून नित्य फलाच्या प्राप्तीसाठी पुन्हा येणंजाणं घडवतात. अर्थात संसाराच्या सवयी संसाराची किंवा संसाराबाबत म्हणजेच व्यवहाराबाबतची फल प्राप्ती करून देतात. संसाराबाहेरील सवयी त्या क्षेत्रातील फल निर्माण करून, समोर आणून देतात.
खरतर सवयीबाहेरील जी कर्म असतात, ती पण आपल्या क्षेत्रातील फल निर्माण करतातच. पण त्यांच्या बाबत आपण कोणत्याही प्रकारचं नियोजन करू शकत नाही. नियोजन हे चांगल्या व वाईट,अश्या दोन प्रकारच्या सवयीबाबत, नक्कीच करू शकतो. पण त्यासाठी मनात जाण आणि जागृती असणं किंवा येणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडं ज्ञान आवश्यक आहे
जर आठवत असेल, तर लक्षात आणा की, लहानपणी आपल्याला, काही चांगल्या गोष्टी करण्याची व काही वाईट गोष्टी टाळण्याची सवय मुद्दामहून लावली जायची. याची मुख्य कारणं खरतर दोन आहेत. एक म्हणजे चांगल्या वाईटाची जाण येणं आणि दुसरं म्हणजे चांगली कर्म हातून घडावी व वाईट कर्म टाळली जावीत. या दोन दूरदर्शी उद्देशाने, त्या वयात सवयीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जायचा.
म्हणजे सवयी चांगल्या असाव्यात हे आखून दिलं जायचं. फक्त त्याची कर्माधिष्टीत कारणंमीमांसा, सांगितली जायचीच असं नाही. पण आता जर जाण आली असेल, तर याबाबत आपण स्वतःच्या सवयीचं विश्लेषण अर्थात analysis नक्कीच करू शकतो. आता वाईट सवयी कोणत्या हे, एकदा समजलं की, आपण त्यांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो.
वाईट सवयी, कर्मसिद्धांतानुसार, वाईट फल वा वाईट परिणाम घेऊन येतात. म्हणजे ज्या सवयी पुण्यकारकता वाढवत नाहीत उलट अनिष्ट परिणाम घेऊन येतात, त्या सवयींना बंद करण्याचा प्रयत्न सुरू करावा. ज्या सवयी देहाला, बुद्धीला व मनाला अनिष्ट,नकारात्मक व चुकीच्या गोष्टी किंवा कर्म करायला लावतात, त्या सवयी सोडून देण्याचा प्रयत्न करावा. किंवा त्या त्वरित सोडून द्याव्या.
उदाहरणार्थ आपण इतर लोकांबद्दल वाईट किंवा गैर किंवा द्वेषकारक अहिताचं बोलत असू, तर ते टाळलं पाहिजे.कारण अशी कर्म फिरून आपल्याकडेच फल रूपात येतात. ती येतात तेंव्हा एकतर आपण बेसावध असतो आणि त्या फलांची संगती।लावता येत नाही. म्हणून अश्या वाईट सवयी विचारपूर्वक व निर्धारपूर्वक दूर कराव्यात. याऊलट कोणत्या चांगल्या सवयी जडवून घ्याव्यात, यावर उद्या विचार करूया. पण नामाला न सोडता निष्ठेने जपत.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment