Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

भोग आणि ईश्वर ६३

भोग आणि ईश्वर  ६३  आज एक प्रश्न आला की नाम घ्यावं की नामसंकीर्तन.  नामसंकीर्तन हे नामच आहे पण नामरूप भक्तीचं काव्यात्म उच्चारण आहे, ते नामच आहे. नामसंकीर्तन म्हणजे कीर्तन वा संगीत यांसह भगवंताच्या नामाचा आनंद घेणे. त्यात एक नादमाधुर्य आहे आणि त्यातील तल्लीनता निश्चित छान असते आणि एकाग्रता नक्कीच उपयुक्त असते. परिणाम दोन्हींचा एकच आहे. पण सर्वांना संकीर्तन सर्वकाळ ते जमू शकेल असं नाही म्हणून नाम हे उत्तम कारण ते एकांतात सुद्धा साधता येते. नामसंकीर्तन हे जमेल असं नाही. यावर थोडं विस्ताराने विचार करू. पण एखाद्याला नाम संकीर्तन वा अभंगरूपात साधत असेल आणि जमत असेल तर करण्यास काहीच हरकत नाही. मार्ग थोडासा भिन्न आहे, पण परिणाम आणि एकाग्रता तीच, उपयोग तोच आहे. मुळात कीर्तनाला परंपरा ही नारदांपासून सुरू होते, असा पुराणात उल्लेख आहे,  म्हणजेच कीर्तन या परमेश्वर स्तुतीचे आद्यप्रवर्तक हे स्वतः देवर्षी नारद आहेत. नाम हा परमेश्वराला भजण्याचा एक प्रशस्त, पण सहजसोप्पा मार्ग आहे. एखाद्याला प्रेमाने, भक्तीने, तल्लीन होऊन आळवणे म्हणजेच  नाम घेणे. परमेश्वराला भक्तीरुप साद घालणे, त्...

भोग आणि ईश्वर ६२

भोग आणि ईश्वर  ६२ एकात्म भाव. श्रद्धा, भक्तीचा भाव ज्यावेळी एकाच ठिकाणी स्थिर होतो. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी त्याला स्थिर होण्याची गरज उरत नाही, त्यावेळी त्या स्वरूपाला, स्थितीला, एकात्म भाव म्हणतात. मग ती मूर्ती असेल, देव ही न पाहिलेली पण जाणवणारी कल्पना असेल, किंवा गुरुतत्व असेल. तो एकात्म भाव जागृत झाला की, इतर कोणत्याही गोष्टीची, बाह्य वा अंतरातील कोणत्याही कृत्रिम प्रेरणेची गरज उरत नाही. श्रद्धा त्या ठिकाणी स्थिर होते. त्यावेळी वा तद्नंतर मनाला, जाणिवांना, नामाला स्थिरता येते. म्हणून एक स्थान, एक नाम, एक श्रद्धेचं मानक जरुरी असतं. त्याठिकाणी मन स्थिर करून मनातील सर्व शंका कुशंका दूर करून, श्रद्धेला, भक्तीच्या जाणिवेला स्थिरता द्यावी, जेणेकरून मनात उमटणाऱ्या भक्तीरुप नामतरंगांना शक्ती, चेतना व योग्य दिशा मिळेल.  या एकात्म भावाचा परिणाम नामाच्या नादात, उच्चारात हरवून जाण्यात, त्या लहरींचा आनंद घेण्यात होतो. एकदा एकात्म भाव साधला की पुढे सर्व सुलभ होत जातं. त्यात एक प्रकारचा आनंद आहे. तो मिळवण्यासाठी हा एकात्म भाव साधा बुद्धी मन श्रद्धा एका ठिकाणी स्थिर करून नामाच...

भोग आणि ईश्वर ६१

भोग आणि ईश्वर  ६१ नाम सुरू करताच क्षणात सर्व भोग, कष्ट, काळज्या, दैन्य, निराशा दूर होतील असा भाग नाही. कारण तसा जर तो असता तर, श्रीकृष्णाच्या सर्वात निकट, नव्हे हृदयात अखंड  निवास करणाऱ्या पांडवांना, वनवास घडला नसता. तो त्यांच्या चुकीच्या कर्माचा, अर्थात अन्याय कारक द्यूतात भाग घेऊन त्यात वाहावत गेल्याचा भोग होता आणि तो त्यांना भोगावाच लागला.  परंतु श्रीकृष्ण वनवासाच्या प्रत्येक क्षणात त्यांच्या सोबत होता, सावलीसारखा, कारण कुंतीसह पांडवांच्या हृदयात, मनात आणि ओठांवर नित्य श्रीकृष्ण जप होता, त्याचं नित्य स्मरण होतं, किंबहुना विस्मरणच नव्हतं. त्याचप्रमाणे हा भोग भोगूनच संपवू हा त्यांचा  मनोनिग्रह दृढ होत, म्हणून परमेश्वर सोबत होता.  एक मुख्य गोष्ट लक्षात घ्या की, त्या वनवासात एक क्षण देखील पांडवांना असं क्षणमात्र मनात आलं नाही की, आपण अखंड श्रीकृष्ण स्मरण करत असूनसुद्धा हे भोग का.? कारण ते ज्ञानी होते.  जाणत होते की, केलेल्या प्रमादांची ही कर्मफल प्राप्त शिक्षास्वरूप भोग आहे, तो भोगूनच संपवला पाहिजे. अन्य कर्तव्याप्रमाणे हेदेखील एक निजकर्तव्य आहे. मग नामाने क...

भोग आणि ईश्वर ६०

भोग आणि ईश्वर  ६० (आज ही लेखमाला वा हे सदर सुरू करून साठ दिवस झाले आणि सलग साठ दिवस हे लेखन नित्य अनेक अडचणीतून माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज करवून घेत आहेत. याद्वारे अनेकांना आपल्या अडचणी, शंका, प्रश्न यांची उत्तरं मिळत असतील तर त्याचं श्रेय फक्त माझ्या सदुगुरूंचं. परंतु काही न्यून वा कमीपणा राहिला असेल तर तो लेखनिक म्हणून माझा दोष समजावा. हे सदर असं अजून कितीकाळ सुरू राहील, हे तेच ठरवतील. पण जोपर्यंत त्यांची प्रेरणा व चैतन्य यामागे आहे तोपर्यंत हे सुरू राहील,  हा विश्वास माझ्या मनात आहे).      नामाच्या मार्गावर चालण्यासाठी वा चालतांना अनेक वेळा अडचणी, अडथळे आहेत असं जाणवतं, किंवा वाटतं. पण यात एक गोष्ट लक्षात घ्या की, अश्या अडचणी वा अडथळे कोणत्याही नवीन कामाला  सुरुवात करताना येतात वा जाणवतात.  सर्वात मुख्य अडचण ही लक्षात न राहण्याची. त्यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मनाचा निग्रह ठाम असेल आणि हे मला करायचं आहेच असा निश्चय त्या निग्रहा मागे असेल तर लक्षात न राहण्याचा प्रश्न येणार नाही. लक्षात तेंव्हाच राहात नाही, ज्यावेळी एखादी गोष्ट म...

भोग आणि ईश्वर ५९

भोग आणि ईश्वर  ५९     मत्सरातून उत्पन्न होणारा विकार म्हणजे द्वेष अर्थात जळफळाट ज्याला आपण म्हणू शकतो. मुळात एखाद्यावर मत्सर करण्याचं तार्किक कारण नाही. कारण कर्मसिद्धांत जर समजला आणि पटला, तर कोणतीही व्यक्ती जे मिळवते ते तिच्या तिच्या कर्माने आणि संचितानुसार. मग आपण त्या चित्रात कुठेही बसत नाही. जर आपला एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीशी काहीही संबंध नाही, तर आपण त्यावर मत्सर व द्वेष करून आपल्याच भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण करतो. कारण विचारलहरी वा तरंग हे जसे आपल्याकडून बाहेर पडतात, ते तसेच परत येतात. पण येताना ते कर्मफल सोबत घेऊन येतात. कारण मागे आपण पाहिल्याप्रमाणे कर्म हे काया, वाचा आणि मन या तिन्ही माध्यमातून घडतं. म्हणजेच क्षणोक्षणी आपण जो विचार करतो, ज्या, इच्छा करतो, ज्या कामना मनात धरतो,ज्या विचारांच्या मागे मन धावतं, त्या विचारांचे विखार वा विकार हे स्वतःचा कर्मनाश करतात. म्हणून मत्सर व असूया आणि त्यापासून उत्पन्न होणारा द्वेष हे किती घातक आहेत, ह्याची कल्पना करता येईल.  म्हणूनच आपल्याकडे म्हण आहे जे पेराल तेच उगवेल. पण आपण उगवलं की विचार करत नाही ...

भोग आणि ईश्वर ५८

भोग आणि ईश्वर  ५८     शुद्ध मन, शरीर व आत्मा यांना शुद्ध करून पुढच्या अनेक गोष्टींची पूर्वतयारी आहे. ही शुद्धता अत्यंत महत्वाची आहे, कारण त्या शुद्धतेने देह, मन आणि आत्मा यांची एकतानता साधण्यास मदत होते. किंबहुना त्यासाठीची ती प्रथम पायरी आहे. पण हे साधायचं कसं.  वासना, विकार, मत्सर, द्वेष, लोभ, मोह, मद, अहंकार, दुराभिमान आणि क्रोध हे सर्व मनाला आणि त्याद्वारे शरीरालादेखील हानी पोचवतात. काही आजार हे अश्या विकारातून उत्पन्न होऊन शरीराला पोखरण्याचं अथवा जाळण्याचं काम करतात. म्हणून सर्वात प्रथम मन शुद्ध व साफ करणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना, राग, द्वेष, मत्सर, असूया इत्यादी काहीही, कोणाबद्दलही, असल्यास सर्वात प्रथम, मनातून काढुन, मन साफ केलं पाहिजे. क्रोध हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि श्रीमदभगवद्गीतेत म्हटल्या प्रमाणे क्रोधात भवती समोहात..... याप्रमाणे क्रोध हा सर्व प्रकारच्या अधोगतीची पहिली पायरी आहे. संतसज्जनांनी निरलस, निरामय आयुष्य जगलं आणि देह मन व आत्मा शुद्ध केला, त्यात क्रोधावर संयमाने नियंत्रण हे खूप मोठं कारण आहे. याचप्रमाणे कामविका...

भोग आणि ईश्वर ५७

भोग आणि ईश्वर  ५७     एखादं यंत्र हे कालबाह्य झालं की किंवा ते वापरण्याचं तंत्र अवगत नसेल तर, ते यंत्र चालवण्याची कला शिकणं वा इतर काही मार्ग आहेत का  ते बघणं महत्वाचं आहे. यासाठी असलेले अनेक मार्ग आज कालबाह्य नाही,  पण काळाच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि परिस्थितीमुळे पूर्णपणे अंमलात आणणं कठीण आहे. म्हणून मग भगवंतापासून जगतात फिरणाऱ्या तरंगलहरी प्राप्त करण्यासाठीची तयारी,  आपल्याला जाणता वा समजता येणार नाहीत का.  नक्की येईल. परंतु यासाठी थोडा काही गोष्टींचा विचार करूया. देह हे एक साधन मात्र आहे. त्याद्वारे भगवत प्राप्ती ही साध्य करायची आहे. त्यासाठी देवाने बुद्धी -मन-आत्मा ही त्रयी आपल्याला प्रदान केली आहे. या तिन्हीचा सुयोग्य संगम साधून, त्यांना एकतान करून, त्याद्वारे मनाला एका लयीत बांधून, ती एकतानता टिकवून, त्याचा सातत्याने, नियमित सराव करत गेल्यास, मन एक विशिष्ट लय साधण्यास सिद्ध होतं.  ही सिद्धता टिकवून धरली की, त्याला विश्वातील येणाऱ्या अनेक लहरींशी संपर्क साधण्याची कला अवगत होऊ शकते.  ही सिद्धता झाल्यानंतर, नित्य त्या लहरींचा अभ्यास करता ...

भोग आणि ईश्वर ५६

भोग आणि ईश्वर  ५६     ईश्वरी कृपेची प्राप्ती करण्यासाठी आणि त्याची जाणीव जागृत करण्यासाठी, काय काय करावं हे पाहूया. या लहरीस्वरूपात असलेल्या कृपेची प्राप्ती, हा म्हटलं तर सोप्पा म्हटलं तर अवघड प्रश्न आहे. मुळात या लहरी, अर्थात सिग्नल्स अखंड, अनंतात विहरत असतात. कारण क्षीरसागरी शेषशायी असलेल्या भगवान श्रीविष्णुचं पूर्ण लक्ष, समाधी व ध्यानअवस्थेत सुद्धा अखिल ब्रह्मांडाच्या, चरचरातील प्रत्येक कणाकणावर असतं, यात कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही. त्यामुळे, त्यांच्या हृदयातून पाझरणाऱ्या प्रेमलहरी, नादमय व ब्रह्ममय अवस्थेत, निरंतन, जगताच्या, प्रत्येक प्राणीमात्रा पर्यंत, येतच असतात. त्या आपल्याला जाणवत नाहीत, कारण आपण त्यासाठी तयार नसतो. मुळात हा देह एक यंत्रस्वरूप आहे, जो स्वयंपूर्ण स्वयं चलित यंत्रमानवासमान आहे. जे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही लहरी आणि तरंग यांसाठी पुरेसं सक्षम आहे आणि कालातीत आहे.  एक कल्पना करा की घरात एक यंत्र आहे, पण आपल्याला त्याची कळ अर्थात बटण आणि त्याला चालवण्याचं तंत्र व वापरण्याची पद्धत त्याचप्रमाणे,  नीट ठेवण्याची पद्धत माहित नाही. ती फक्त...

भोग आणि ईश्वर ५५

भोग आणि ईश्वर  ५५      खूपदा आपण स्वतः असं म्हणतो किंवा अनेकांना म्हणताना ऐकतो की, ईश्वरकृपेचा प्रत्यय येत नाही, किंवा ईश्वरकृपा नशिबाने मिळते इत्यादी. असे अनेक आक्षेप ऐकायला मिळतात वा वाचायला मिळतात. आपण बघतो की, बरेच वेळा पापभिरू माणसांना त्रास होतो आणि तरीही ईश्वर काही करत नाही, याचा आपल्यालापण राग येतो, निदान भोग भोगणाऱ्या त्या माणसांबद्दल वाईट जरूर वाटतं. यात दोन प्रश्न आहेत एक ईश्वरकृपेचा आणि दुसरा चांगल्या माणसांना भोगाव्या लागणाऱ्या यातना. तसं बघितलं तर दोन्हींचा संबंध आहे आणि नाहीसुद्धा. मुळात ईश्वर हा ब्रह्मांडाचा रचयिता आहे. त्या नात्याने परमपिता आणि संपूर्ण सृष्टीची निर्मिती अर्थात जन्मदाता या नात्याने जगतजननी अर्थात विश्वमाता. म्हणजे तोच ईश्वर दुहेरी भूमिकेत आहे.  माता म्हणून या जगतावर, जगतातील प्रत्येक जीवावर, चराचरावर , सजीव निर्जीव या सर्वांवर त्याचं प्रेम आहे. त्या प्रेमाचाच प्रत्यय वा प्रचिती म्हणून दुर्जनातल्या दुर्जन व नीचातल्या नीच व्यक्ती वा असुर दानव वा राक्षसांनासुद्धा अंतिम उपाय वा निरुपाय म्हणून देहदंड देतो. एक मायच, होता होईल तितकं, आप...

भोग आणि ईश्वर ५४

भोग आणि ईश्वर  ५४     नामाचा आणि भोगातून सुटकेचा काही कार्यकारण संबंध आहे का, असा एक प्रश्न नेहमी मनात येतो. भोग हे कर्मफल आहे आणि ते त्याच्या नियतीप्रमाणे त्या त्या निहित वेळेनुसार येणारच. त्यांच्या येण्याचा काळ व वेळ प्रत्यक्ष परमेश्वर टाळू शकत नाही. मग नाम घेऊन उपयोग काय असा एक मुद्दा पुढे येऊ शकतो. नाम हे असं औषध आहे जे, येणाऱ्या संकटांची, भोगांची, नकारात्मकतेची भीती मनातून नाहीशी करते. येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरं जाण्याची मनःस्थिती आणि शक्ती नाम प्रदान करते. नाम मनाला अश्या उंचीवर नेतं की, जिथे नामसाधक नामाच्या आनंदात घडणाऱ्या सुख व दुःख दोन्हीत समस्थितीत राहतो. अर्थातच सुखातही आनंदी आणि दुःखातही स्थिर राहतो वा राहू शकतो.  नामाला एकदा तुम्ही चिकटलात की, नाम आपलं कार्य संथ पण स्थिरपणे करते. नामाच्या नादात मन एक प्रकारे समाधी अवस्थेचा अनुभव घेते. नाम हा नामधारकासाठी खूप मोठा योग आहे, जो निराकार,निर्गुण ईश्वराच्या साक्षात्काराचा अनुभव देतं. नामात नामाची इष्टदेवता आपल्या सह असते आणि सद्गुरू,  मनापासून नाम घेणाऱ्याच्या पाठीशी सतत उभे असतात. म्हणूनच खऱ्या म...

भोग आणि ईश्वर ५३

भोग आणि ईश्वर  ५३     नाम हा केवळ उपचार नसून तो सर्वोपचार आहे. याचा विस्तृत अर्थ  पाहूया.  उपचार या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ उपचार म्हणजे तोंडदेखलं, वरवरचं ज्याला आपण दाखवण्या पूरतं म्हणतो तसं. दुसऱ्या अर्थाने उपचार म्हणजे इलाज, उपाय.  आता या दोन्हीवर विस्तृत विचार करूया. एक तोंडदेखलं किंवा वरवरचं म्हणून नाम घेतलं तरीही नाम आपलं काम करतं. कारण नाम हे शुद्ध, सात्विक आणि सकारात्मक परिणाम घडवणारं ईश्वराचं स्वरूप आहे. ते उपचार अर्थात वरवरचं किंवा तोंडदेखलं घेतलं तरी त्याचा सकारात्मक परिणाम होईल. परंतु त्याचा इच्छित परिणाम साधण्यासाठी नाम मनापासून घेतलं तर ते उपचार म्हणजे तोंडदेखलं न राहता उपचार अर्थात उपाय होईल. आता उपाय म्हणजे काय. तर उपाय म्हणजे नाम उपयुक्त ऊर्जा निर्माण करून त्याचा सात्विक परिणाम मन, विचार, आचार, उच्चार व त्याद्वारे कृतीवर होऊन पुढील कर्म सुधारत जातं. निदान कर्मफलाचा होणारा उलट परिणाम थांबायला सुरवात होते. नामाचा उचित परिणाम म्हणजे ते घेणाऱ्या बरोबर ते ऐकणाऱ्यालासुद्धा तारतं.  नाम अश्या तऱ्हेने एक उपचार म्हणून केले किंवा एक उपाय म...

भोग आणि ईश्वर ५२

भोग आणि ईश्वर  ५२    ज्ञानाचा विचार करताना सर्वात प्रथम जे जाणणं गरजेचं आहे ते म्हणजे आत्मज्ञान. मी कोण, कुठून आलो आणि कुठे जाणार. मुळात सर्व जिवात्मे हे एकाच सृष्टी कर्त्याच्या तेजाचा अंश आहेत. त्यामुळे तो प्रवास तेथून विभक्त होऊन सुरू झाला आणि तिथे पोहोचून भगवंतांमध्ये रत होण्यासाठीचा सुरू असलेला प्रवास आहे. भगवंतापासून विलग झालेला पुन्हा भगवंताशी मिलन करण्यास, त्यास प्राप्त होण्यास आतूर तो भक्त आणि त्याला प्राप्त करण्यासाठी , त्याची कृपा व्हावी म्हणून जी कामना, याचना, अर्चना, प्रार्थना केली जाते ती भक्ती.  त्या ईश्वर भक्तीत रममाण होणं म्हणजे भक्तियोग साधणं. ईश्वर म्हणजे जगतपिता, ज्याची ओळख, या देहात आल्यामुळे आपण विसरलो आहोत, तो सर्व चराचराचा जन्मदाता. आत्मा ज्यावेळी शरीरात बद्ध होण्याआधी मुक्तावस्थेत भ्रमण करत असतो, त्यावेळी तो सर्व जाणतो, त्याला सर्व ज्ञात असतं.परंतु ज्याक्षणी तो पंचतत्वी देहात प्रवेश करतो, त्याक्षणी त्याला या देहाच्या मर्यादा लागू होतात.  पुन्हा बद्धावस्थेत आल्यानंतर मूळ स्वरूपाला जाणून तेथे पोचण्याची इच्छा निर्माण होण्याची प्रक्रिया सहजी ...

भोग आणि ईश्वर ५१

भोग आणि ईश्वर  ५१    काल जे ज्ञानी माणसाबद्दल आपण बघितलं त्याच विषयाचा थोडा विस्तार करूया. आजचं विज्ञान हे त्याच ज्ञानाचा भाग आहे. कारण विज्ञानाचा अंतिम उद्देश हा हे जग, जगाची उत्पत्ती, कारणं, त्यामागील पूर्ण सत्य शोधून त्या सर्वांची कारणासह मीमांसा करून त्या सर्वांमागील सूत्र शोधून ती मांडणं हाच आहे. आज विज्ञानाला ज्ञात नाही की या सर्वाचा अंतिम मार्ग हा ईश्वराकडे नेणाराच आहे.   म्हणजे जे ज्ञान वेद शास्त्र यांमध्ये मांडण्यात आलं आहे आणि त्यामध्ये सृष्टीकर्त्याची सृष्टीच्या रचनेची, या जगाच्या व्यापात ईश्वराला पाहून त्याच्या निर्मितीचं कौतुक करण्याची आणि त्यायोगे त्याला प्राप्त करण्याच्या पद्धती यांची केलेली मांडणी, आपल्याला अंती ईश्वराच्या चरणांशीच नेते. विज्ञान सरतेशेवटी त्याच टप्प्यावर येणार याची एक झलक नुकत्याच करण्यात आलेल्या एका प्रयोगात देवकण या शोधापर्यंत पोचून विज्ञानाला विधात्याने थक्क केले आहे असं माझं अनुमान आहे.   म्हणजेच जे ज्ञान  या सृष्टीच्या निर्मात्याच्या चरणी लीन आहे तेच अंतिम ज्ञान आहे आणि असणार. बाकी सर्व नकळतपणे त्याच पायरीला प...

भोग आणि ईश्वर ५०

भोग आणि ईश्वर  ५०    ज्ञानाचा विचार करताना मुख्यतः खर ज्ञान हे जीवनाचं, ते जगण्याचं, जीवनातील अनेक गुंते सोडवण्याचं, त्याला यथार्थ आकार देण्याचं, या जगात आपल्या येण्याचा आणि इथून यशस्वीपणे पुढील पायरीवर जात जात प्रगती करत करत अंतिम पदावर जाण्याचा मार्ग दाखवणारे आणि नुसता मार्गच न दाखवता त्यावर चालण्याची इच्छा, क्षमता आणि त्याची सिद्धता देणारे ज्ञान हे खरे ज्ञान. ज्या ज्ञानाच्या प्राप्तीनंतर काहीही प्राप्त करण्यासारखे उरत नाही, अर्थात ज्यामुळे सर्व काही प्राप्त झाल्याचा आनंद व समाधान मिळते, त्याला वेद पुराण, उपनिषद, शास्त्रं यांनी परम ईश्वरी ज्ञान म्हणून संबोधले आहे. जे ज्ञान मुक्ती व मोक्षप्राप्ती साध्य करण्यासाठीची पायरी तयार करून देते ते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान होय. परमार्थ किंवा पारमार्थिक ज्ञान हे भौतिक जगातील ज्ञानाच्या पलीकडे नेणारं व जगण्याचा खरा व यथोचित अर्थ प्राप्त करून देणारं आहे.  या ज्ञानाच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. ते प्राप्त करणारा, ज्यावेळी सर्व जगत, परम ईश्वर, यांचा संबंध, माया, मायेचे खेळ या सर्वांना जाणतो, त्यावेळी, तो या सर्व...

भोग आणि ईश्वर ४९

भोग आणि ईश्वर  ४९     आता क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा खेळ किती महत्वाचा आहे याचं एक उदाहरण पाहूया. तुम्ही नुकत्याच थांबलेल्या पावसात चालत निघाला आहात आणि वाटेत एक बेडूक साठलेल्या पाण्यातून उडी मारून तुमच्या जवळच्या पाण्यातून उडी मारून पुढे गेला.  ज्यामुळे थोडं पाणी तुमच्या कपड्यावर उडालं. त्यावर रागाने तुम्ही त्याला दगड मारलात, तर त्याचं काय नुकसान होईल, ते त्याचं कर्म आणि नशीब ठरवेल. पण तुमच्या अंगावर वा कपड्यांवर थोडा तरी चिखल उडेलच. हीच गोष्ट प्रतिक्रिया या कर्माने आपण स्वतः घडवून आपल्या खात्यात अजून एका कर्मफलाचा भार टाकतो. ज्या ठिकाणी वा व्यक्तीला प्रतिक्रिया दिल्याने आपला व्यक्तिगत फायदा होणार नाही, त्याठिकाणी प्रतिक्रिया देऊन आपण स्वतःलाच एखाद्या नवीन बंधनात बांधून घेतो.  उदाहरणार्थ एखाद्या विषयावर आपलं मत माहीत असलेला आणि भांडणाची खुमखुमी असलेला एखादा, मुद्दाम त्याच मुद्द्यांचा आधार घेऊन, आपल्याला उकसवून, बोलायला भाग पाडतो. आपण त्याला प्रतिसाद वा प्रतिक्रिया देऊन त्याचा हेतू साध्य करतोच करतो, पण आपण त्या विषयाला त्याच्या व आपल्या  मनातील विषाल...

भोग आणि ईश्वर ४८

भोग आणि ईश्वर  ४८    कालचाच धागा पकडून पुढे जाऊया. असा विचार करा की, आपल्याशी संबंध येणारे सर्वजण कुठेतरी आधीच्या वा या जन्मातील काही ऋण वा ऋणानुबंध असणारेच असतात. किंबहुना इतकं ठामपणे नक्की सांगता येईल की, तसे संबंध असणारेच आयुष्यात कुठेतरी कधीतरी काही क्षण वा काळ भेटतात. पण हा काळ किती असेल हे आपले या किंवा गतजन्मातील धागे कसे आहेत वा होते वा कर्मफल काय बाकी आहे त्यानुसार ठरतं. एखादं ऋण घेतलं की, ते जितकं आहे त्याच्यावरील व्याजासह तितकंच फेडावं लागतं. त्यामुळे सूत्रबद्ध जीवन मांडणारा विधाता नक्कीच याबाबतसुद्धा काही सूत्र ठेवून गेला असेल. त्याचा विचार केला तर लक्षात येईल की, जितकं आपलं देणंघेणं आहे वा असेल, तितकाच काळ वा वेळ आपले एखाद्या व्यक्तीशी संबंध येतात वा येऊ शकतात. म्हणजेच तितकाच काळ ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते.  म्हणजे परस्पर संबंध असणाऱ्या नात्यातील व्यक्तीलासुद्धा हा नियम लागू होतो का. तर नक्कीच होतो. कारण नाती ही संस्कृतीच्या निर्मितीत आणि समाजाच्या रचनेत आपण निर्माण केलीत. अन्यथा विधात्याने दोनच मानवी देह निर्माण केले. थोडंसं वैचारिक गोंधळ निर्माण क...

भोग आणि ईश्वर ४७

भोग आणि ईश्वर  ४७    काल आपण एक प्रातिनिधिक अनुभव वाचला. प्रत्येकाला आयुष्यात असा अनुभव आला असेल वा असे अनुभव असतील. फक्त आपण त्यामागचं तत्व वा कारणमीमांसा फार विचारात घेत नाही. पण आज आपण त्याची दुसरी बाजू बघूया.  एक विचार करा की त्या त्या प्रसंगात आपल्याला तीच व्यक्ती का भेटावी, एवढ्या अफाट जगव्यापातून. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या व्यक्तीचेसुद्धा काही ऋण शिल्लक असतात, जे त्याचं कर्मफल त्याच्याकडून योग्यवेळी फेडून घेत असतं. आता हे ऋण कोणाचंही असेल आणि कोणा कडूनही फेडून घेतलं जातं का ते बघूया.   तर माझ्या मते तसं नसावं. कारण आपल्या बारीकसारीक कर्मांचा योग्य तो हिशोब आणि ताळेबंद ठेवणारा विधाता किंवा विधात्याची कर्मफलव्यवस्था नक्कीच याचासुद्धा अचूक हिशोब ठेवतच असणार. म्हणजेच जर ती व्यक्ती काही ऋण फेडण्यासाठी बद्ध असेल तर ज्या व्यक्तीचे हे ऋण आहेत, तीच व्यक्ती समोर येईपर्यंत त्याला हे ऋण फेडता येणं शक्य नाही. आपणसुद्धा व्यवसायात वा नोकरीत हिशोब ठेवताना क्ष व्यक्तीचे वा कंपनीचे  ऋण वा येणं असेल तर ते त्यांच्या नावावरच मांडतो आणि त्यांच्याकडून ते येईपर्यंत...

भोग आणि ईश्वर ४६

भोग आणि ईश्वर  ४६    काल आपण योगभ्रष्ट म्हणून जन्माला आलेल्या लोकां बद्दल चर्चा केली. अश्या प्रकारच्या व्यक्तींना आपण ओळखत होतो पण आपल्याला त्याची जाण नसल्यामुळे आपण कदाचित त्यांची टिंगल, हेटाळणी वा टीका तरी केली असेल. पण त्यामागचं कारण उमगल्यामुळे इथून पुढे नक्कीच आपण त्यांच्याबद्दल योग्य तो विचार करू.  आज अजून एका वेगळ्या गोष्टीचा विचार करूया. आपण कधी विचार केला आहे का की अमुक एक व्यक्ती आपली नातेवाईक म्हणून का जन्माला आली, किंवा हेच आई वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी, इतर आप्त स्वकीय, सगेसोयरे, ओळखीचे हेच का आहेत. एखादी लांबची व्यक्ती एखाद्या अनोळखी गावामध्ये जाते आणि तिथे एखाद्या व्यक्तीशी दृढ संबंध जुळून येतात, ती मैत्री असेल वा अगदी प्रेम पण असेल. किंवा एखादी अनोळखी व्यक्ती  अनपेक्षितपणे आपल्याला काही संबंध नसताना मदत करते, अगदी निरपेक्ष भावनेने. कदाचित त्या व्यक्तीचा तो स्वभाव देखील नसेल, पण आपल्यासाठी ती व्यक्ती वाट वाकडी करून पदरमोड करून मदत करते. याचा कुठेतरी आपल्या गतजन्मातील ऋणाशी वा ऋणानुबंधाशी संबंध असतो. अन्यथा इतक्या आप्तपणे त्याला मदत करायची भावन...

भोग आणि ईश्वर ४५

भोग आणि ईश्वर  ४५    प्रत्येक जन्मात कर्माचा तोल सांभाळत फार भोग अर्जित न करता, आत्मा उन्नत्ती करत करत पुढील प्रत्येक जन्मात सुधारत, एक एक पायरी चढत पुढे जातो. यात काही चूक झाली वा प्रमाद झाला तर पुन्हा आत्म्याची अवन्नत्ती होऊन पुन्हा आत्मा काही पायऱ्या मागे जातो. पुन्हा नवीन जन्मात झालेल्या चुका वा घडलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त केल्या शिवाय पुढे जाता येत नाही. अश्या प्रकारे अवन्नत्ती होऊन मागे आलेल्या देहधारी आत्म्यांना योगभ्रष्ट जीव म्हणतात. अश्या जीवांचा जन्म फक्त भोग भोगून आपल्या घडलेल्या चुका दुरुस्त करून पुढे जाण्यासाठीच असतो. आपण खूपदा अशी कुटुंब वा व्यक्ती बघतो, जी आयुष्यभर फक्त सहन करण्यासाठीच जन्माला आलेली असतात. त्यांना कितीही सहन करावं लागलं, तरी ते तक्रार करत नाहीत वा कुणालाही उणंदुणं बोलणार नाहीत, मुकाट्याने सर्व भोग, जाच, त्रास सहन करून आयुष्य जगतात. बरेचदा त्यांचे हाल, कष्ट, काळज्या, भोग बघून आपल्यालालाच वाईट वाटतं. प्रसंगी आपणच त्याबद्दल हळहळ, राग, चिंता व्यक्त करतो.  त्यांना अनेक बाबतीत अपयश येतं, अनेक अडचणींनी त्याची कामं होतात, एका खेपेत कोणतही क...

भोग आणि ईश्वर ४४

भोग आणि ईश्वर  ४४    समस्त सजीव देहात जी चेतना कार्य करते, ज्यामुळे सर्व सजीव हे निर्जीव वस्तूंपासून भिन्न गणले जातात, ती प्राणशक्ती म्हणजेच आत्मशक्ती. तिलाच चैतन्यशक्ती म्हणतात. ह्या शक्तीचा प्रत्यय वा प्रचिती देह ज्यावेळी निष्प्राण होतो आणि त्याला निर्जीव देह ही उपाधी प्राप्त होते, त्यावेळी तिथे उपस्थित प्रत्येकाला येतो. मुळात ती व्यक्ती जीवित असताना होणारी प्रत्येक हालचाल, आपल्याला न जाणवलेली वा जाणवणारी, ही त्या चैतन्यशक्तीच्या अस्तित्वाची पावती असते आणि हे, देह निपचित झाल्यावर कळतं.  आपण धारण केलेला देह हा आत्म्याच्या प्रवासातील एक टप्पा असतो. म्हणजेच आपला देह हा जसा पंचतत्वातून जन्माला आला त्याच प्रकारे तो नष्ट होतो आणि आत्मा पुन्हा एकदा नवीन प्रवासाला निघतो. जुन्या देहातून नवीन देहात प्रवेश हा पूर्वसंचित व प्रारब्ध यावर अवलंबून असतो. लक्ष लक्ष देह धारण करून त्यातून फिरून, भोग भोगून मानवी देहात मिळालेला हा प्रवेश आणि त्यातील जेमतेम साठ, सत्तर ऐंशी इत्यादी वर्षांचा जन्म.  एक जन्म झाल्यावर त्यातील जमवलेल्या पुण्य वा पाप कर्म फलांवर पुढचा प्रवास निश्चित होतो....

भोग आणि ईश्वर ४३

भोग आणि ईश्वर  ४३   खरतर भोग आणि ईश्वर या शिर्षकाचा धागा गीतेत सापडतो. या शिर्षका मागील संदर्भ आणि त्याचा अर्थ जरा जाणून घेऊ. भोग हे आपल्या पूर्वकर्माची फलरूप प्राप्ती आहे हे आता नक्की ठसलं असेल. यात मुख्यतः भोग म्हटलं तरी सुखोपभोग हे देखील यात आले. म्हणजे यातून एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे ज्याप्रमाणे भोग अथवा दुःख हे पूर्वसुकृत व पूर्वसंचित यांचा परिणाम आहेत, त्याचप्रमाणे सुख वा आनंद हे देखील आपल्याच पूर्वकर्मानुसार प्राप्त होते. म्हणजेच दोन्ही आपल्याच कर्मफलानुसार योग्य वेळी समोर येतं. ते समोर येतं, त्यावेळी आपण त्यात हरवून जातो. विशेषतः आनंद वा सुख उपभोगताना आपण त्यात हरवून जातो. हे भोग वा दुःखाच्या काळाविरुद्ध असतं. यात मुख्यतः कारण मानसिक असतं. मनाला वाटतं, सतत आनंदी सुखी असावं असं वाटतं. दुःख भोग हे त्या मानसिकतेत व्यत्यय आणतात. व्यथा, चिंता, क्लेश, काळज्या या आपल्याला आनंदी मानसिकतेतून बाहेर आणून वास्तवात आणतात. म्हणून आपल्याला तो काळ येऊच नये वा आल्यास लवकर जावा असच वाटतं. अर्थात दुःख हे अपरिहार्यतेने वा नाईलाजाने माणूस स्वीकारून पुढे जातो, ते दिवस कसेतरी ढकलून. यात मुख...

भोग आणि ईश्वर ४२

भोग आणि ईश्वर  ४२   देह आणि मन शांत करून त्याद्वारे अंतरात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करण्यासाठी महत्वाचा टप्पा म्हणजे चित्त स्थिर राखता येणं. चित्ताची स्थिरता हा अनुभव छोट्या प्रमाणात वा काही क्षण प्रत्येकजण कधीतरी घेतो. बरेचवेळा आपण एखाद्या विचारात काही काळ गुंग होऊन जातो, अक्षरशः त्या विचारात हरवून जातो.  खूपदा विचार थांबतो आणि आपण त्याच भावावस्थेत स्थिर होतो, अगदी स्टेचू या खेळासारखे लॉक होतो.  ही अवस्था काही क्षणांचीच असते. पण आठवून पहा त्यावेळी वा लगेचच वेगळाच अनुभव मनाला व आपल्याला येतो. कधीतरी एखादा विचार मती आणि मन गुंगवून टाकतो, कधीतरी असं होतं. यात मुख्य गोष्ट साध्य होते ती चित्ताची स्थिरता. त्यावेळी देह आपली अवस्था, मन आपले भाव विसरून जातं. मनातले इतर विचार थांबतात आणि मन त्या एकाच विचाराचा धागा पकडून स्तब्ध होतं. याचा अनुभव चुकून येतो, तोच मुद्दामहून घेऊन बघायला हरकत नाही. फक्त क्षणिक होणारी ही गोष्ट एक सूत्र म्हणून धरून मुद्दाम साध्य करायला हरकत नाही.  आता त्यासाठी, सूत्र म्हणून काहीतरी मुद्दा वा गोष्ट मनात धरण्यापेक्षा, एक नाम मनात योजून, त्याच्या ...

भोग आणि ईश्वर ४१

भोग आणि ईश्वर  ४१   जागेपणी माणूस प्रत्येक क्षण काही ना काहीतरी करत असतोच. त्या प्रत्येक गोष्टी साठवून ठेवण्याचं काम सुप्तमन करत असतं. यासाठी मेंदूचा वा त्यातील पेशींचा वापर केला जातो. हे म्हणजे साधारण संगणकाच्या  सॉफ्टवेअर व हार्डवेअर सारखं आहे. म्हणजे सॉफ्टवेअर अर्थात प्रोग्रॅम काय करायचं ते ठरवून करून घेतो, केलेली कामं संगणकातील हार्डडिस्क मध्ये साठवतात त्याप्रमाणे  अर्थात मेंदूतील पेशींमध्ये साठवतो. हा प्रोग्रॅम आपण दिलेल्या कमांड अर्थात आज्ञेनुसार कार्य करतो व त्या त्यावेळी ती ती फाईल समोर उघडून दाखवतो व आपण ज्याप्रमाणे त्या फाईल मध्ये पुढचं काम वा बदल करू त्याप्रमाणे ती फाईल पुन्हा साठवली जाते. ह्या सर्व प्रक्रिया मेंदूत होतात आणि त्यासाठी मेंदू चेतासंस्था, मज्जासंस्था, मज्जासंस्थेचं पूर्ण जाळं यासाठी कार्य करतं. यासाठी मन हे सॉफ्टवेअरसारखं काम करतं. आज्ञाप्रणाली मेंदूत तयार होते तरी त्याला कल्पनेने फुलवणं,  प्रत्येक गोष्टीत कृतीत लागणारा उत्साह, ऊर्जा देण्याचं काम मन करतं.    खरतर सुप्तमानाची बरीच गुपितं अजून विज्ञानाला माहीत व्हायची आहेत. पण एक...

भोग आणि ईश्वर ४०

भोग आणि ईश्वर  ४०   खूप वेळा मन हे एखादी गोष्ट करायला वा त्याकडे वळायला साशंक असतं, वा काही कारणाने मनात  संदेह  निर्माण होऊन आपण ते कार्य अर्धवट सोडतो किंवा पूर्ण मनापासून करत नाही. नाम हे त्यापैकीच एक आहे. ज्याची दृढता काही काळ टिकवली जाते, परंतु काही, व्यक्तिगत वा प्रासंगिक कारणाने, त्यात खंड पडण्याचा धोका होतो. तो धोका आपण बरेच वेळा जाणूनबुजून निर्माण केलेला नसतो. पण तरीही निर्माण होतोच. कारणं घडलेली असोत वा आपसून आलेली असोत, पण त्या कारणांनी मनाला उसंत मिळते, नामपासून ढळण्यासाठी. याचं कारण कळत नकळत आपलेच दोष असतात. मुख्य कारण मनाला असा एक कोणताही पद्धतशीर उद्योग नको असतो. त्यामुळे ते कारणं शोधत असतं. त्यात आपली वृत्ती आळसाकडे झुकणारी असेल तर, देहाचा आळस आणि मनाचा चंचलपणा हे एकत्रित येऊन कार्य साधतात. नामात  खंड पडतो. नित्य  उपासना म्हणून करायचं ते आपण जमेल तसं करतो. कारणं बघतो वा शोधतो. बर तो छंद म्हणून सुरवातीला वा चाळा म्हणून जिभेला जडवून घेतला की, वेळी  अवेळी कधीही ते काम जिव्हा सुरू करते, आपल्याला ते कळतसुद्धा नाही, इतकं ते सहजी होऊन जातं. नेट...

भोग आणि ईश्वर ३९

भोग आणि ईश्वर  ३९    विश्वनियंत्याच्या मनातील दया आणि त्याचा  कर्मावरचा गाढा विश्वास कसा दृढ आहे आणि त्यासाठी तो काहीही कसा करू शकतो याचा जरा विचार करूया. जरा विचार करा हाच ईश्वर गजेन्द्राच्या सुटकेसाठी स्वतः धावून येतो, भक्त प्रल्हादाला सर्व आपत्तीतून सोडवतो, पण स्वतः रामजन्मांत चौदा वर्ष वनवास भोगतो, महालात आयुष्य गेल्यानंतर वल्कलं नेसून मिळेल ते कंदमुळं खाऊन चौदा वर्षं काढतो,  आपल्या अनेक अत्यंत लाडक्या भक्तांसाठी हाकेसारशी धावून येतो, भक्तसंकटात असताना जमेल त्या मार्गाने मदत करतो वा पोचवतो. पण तोच भगवंत साक्षात पृथ्वीतलावर उपस्थित असूनसुद्धा समस्त वेदांचं, उपनिषदांचं सार तयार करून ते अर्जुनाच्या हृदयात ओतून त्याला कर्मप्रवृत्त करतो आणि युद्धासाठी तयार करतो, पण स्वतः शस्त्र उचलत नाही.  यातून एक गोष्ट वास्तविकपणे सिद्ध होते की, त्याचा स्वतःचा संपूर्ण विश्वास कर्मावर आहे. त्याने केलेलं सहाय्य हे फक्त आणि फक्त आता जिथे श्वासच शिल्लक राहणार नाहीत, तिथे ते श्वास जगवायला केलेलं होतं आणि असेल. अन्यथा श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय सखा असलेला अर्जुन आणि पांडव तेरा वर...

भोग आणि ईश्वर ३८

भोग आणि ईश्वर  ३८   माया आणि मायाकार हे भिन्न भासले तरी मुळात माया ही,  मायाकार परमेश्वर यांच्यापासूनच उत्पन्न झाली असल्यामुळे, ती पूर्ण परमेश्वर आधीन आहे. त्यामुळे जिथे जिथे ईश्वरोपासना आहे, मनातून भक्तिभाव आहे आणि साधनेची चिकाटी आहे तिथे तिथे तिचा प्रभाव कमी होतो. नाहीसा होत नाही, पण कार्यशक्ती क्षीण होते. सहसा मन व बुद्धी हे मायेच्या अधीन जाऊन विपरीत कार्य करू शकतात. परंतु मन आणि बुद्धी ईश्वर भक्तीत नामात व चिंतनात रममाण असेल तर मायेला फार कार्य करायला वाव मिळत नाही. मनाची व बुद्धीची स्थिरता ही निश्चितपणे आणि निश्चीन्तपणे  नामाची साधना करणाऱ्या साधकांना यथावकाश येत जाते. पण यातील सर्वात प्रथम पायरी म्हणजे शंका न घेता नाम घेत राहणे. नामच का तर कलियुगी भक्तीची इतर सर्व साधनं व मार्ग हे बलहीन वा प्रभावहीन असणार आहेत. फक्त भगवंताचं स्मरण आपल्याला तारणार आहे. ते सनातन धर्माचं मर्म आहे कलियुगासाठी. नाम हे सतत का घेत राहायचं हा एक प्रश्न मनात कायम येतो. मी दिवसातून एकदा सकाळीच वा झोपेआधी नाम घेतो तर मग तेवढं पुरणार नाही का. याचं उत्तर आहे, नाही पुरणार. कारण मुळात कलीचा प...

भोग आणि ईश्वर ३७

भोग आणि ईश्वर  ३७   माया आपला खेळ नित्य देहात राहून व देहाबाहेर राहूनही दाखवत असते. माया ही ब्रम्हाकार आहे आणि हे जग ब्रह्ममय आहे. म्हणजे विश्वाच्या सुरवातीपासून ते विश्वाच्या अंतापर्यंत आणि विश्व संपल्यावरसुद्धा माया अस्तित्वात असेल.  एक प्रश्न आहे की माया म्हणजे मनाचा खेळ किंवा मनाच्या वृतींचाच भाग आहे का, की मनातील काम क्रोध आदि विकार हा मायेचाच भाग वा खेळ आहे का. याचं उत्तर हे पूर्ण हो आणि पूर्ण नाही असं देता येणार नाही. मुळात मनात उत्पन्न होणारे विकार हे वृत्तीतून आणि वृत्ती विचार वा विचारांचा अभाव यातून तयार होते.  येणारे विचार हे मागील कर्मफल,  मनावर आजपर्यंत घडलेले संस्कार जे आत्म्याच्या प्रवासात अनेक जन्मात जमा केलेल्या अनुभवातून आलेले असतात. त्या विचारांना गती देण्याचं वा खीळ घालण्याचं काम प्रारब्धात आलेले भाग्य वा भोग करतात.  या सर्वात माया ही विचारांना अनेक मार्गांनी प्रवृत्त वा परावृत्त करून जिवात्म्याच्या इप्सित हेतुपर्यंत त्याला पोचू न देता त्याला भरकटवून अयोग्य जागी वा अयोग्य निर्णयाप्रत नेते. अर्थात माया निर्णय कुठेही स्वतः घेत नाही. पण परि...

भोग आणि ईश्वर ३६

भोग आणि ईश्वर  ३६   भगवान श्रीविष्णूंच्या कल्पनेतून विश्वाची निर्मिती झाली आणि त्यांच्या हुंकारातून माया निर्माण झाली.   जगताला व्यापून उरलेली आहे ती माया. माया म्हणजे काय तर जगतावर व जगतातील प्राणीमात्रांवर  आपल्या पाशाने प्रभुत्व गाजवते ती माया.  माया जे नाही ते दाखवून , भासवून संभ्रम निर्माण करून बुद्धीभ्रंश घडवते. माया ही मोह निर्माण करते. सर्व अनिष्ट, नकारात्मक, गोष्टी मायेच्या आधीन आहेतच पण सकारात्मक चित्ररूप निर्माण करून, प्रसंगी त्यांचा वापरसुद्धा माया, जगताला संभ्रमित करण्यासाठी करते.  मायेला निश्चित आकार नाही. ती एक शक्ती आहे. ती स्वयंस्फूर्त असली तरी भगवंताच्या अधीन आहे आणि भगवंताच्या अधीन राहून ती आपला कार्यभाग साधते. अनेकवेळा कानांनी ऐकलेलं आणि डोळ्यांनी पाहिलेलंसुद्धा प्रसंगी खोटं असू शकतं हे आपण प्रत्यक्षातसुद्धा पाहतो. परंतु काही काळ संभ्रम निर्माण होतो, बुद्धीला टाळं लागतं. पण हे सर्व आपल्या हातूनच घडतं. आपण स्वतः विचार करतो की, मी असा कसा वागलो त्यावेळी, किंवा माझी बुद्धी गहाण कशी पडली कळत नाही.    मायेला स्थळ काळ यापैकी कशा...

भोग आणि ईश्वर ३५

भोग आणि ईश्वर  ३५     ईश्वराच्या चिंतनाच्या वाटेवर नामस्मरण मार्गाने जाण्याचा  निर्णय घेण्याचं ठरवलं की तुमचं काम काही प्रमाणात झालं असं समजायला हरकत नाही. आता या टप्प्यावर येऊन मागे जाण्याइतका कपाळकरंटेपणा दुसरा नाही असं माझं मत आहे.  इथे सुद्धा मायेचे पाश पाठ सोडत नाहीत. माया अश्या मार्गावर जास्त जोर लावून मागे लागते. माया ही अनेक रुपात समोर येऊन उभी राहते. विशेषतः ज्यावेळी कोणी जीव पारमार्थिक मार्गावर मार्गक्रमण सुरू करतो, त्यावेळी माया अनेक मार्गांनी पथभ्रष्ट करून साधना थांबवण्याचा प्रयत्न करते. जसं बुद्धीचा अनेक मार्गांनी वा तर्कांनी बुद्धिभेद करून, जे करत आहोत वा करणार आहोत त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करते. यात इतरांची उदाहरणं नेमकी अश्यावेळी डोळ्यासमोर येतात वा आणली जातात. त्यावरून मन साशंक होतं. मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. खूप जण मधेच साधना सोडून देतात, या विचाराने की, इतक्या जणांना करूनसुद्धा काही फायदा झालेला दिसत नाही, वा काहींना काहीही न करतासुद्धा बरच काही मिळालेलं असतं. हे सर्व बुद्धिभेदक विचार येतात आणि आपलं करणं बंद होतं किंवा त्यावरील निष्ठा ...