भोग आणि ईश्वर ७७
खरतर आपण पूर्ण विचारहिन वा विचाररहित होऊ शकत नाही. कारण ध्यान धारणा आणि समाधी अवस्थेतील त्या खूप पुढच्या पायऱ्या आहेत. आधीच्या अनेक पायऱ्या चढत चढत पुढे गेल्यावर त्या ठिकाणी जाण्याचा आपण विचार करू शकतो. त्यातील पहिला आणि सुरवातीचा टप्पा म्हणजे गैरमार्गी, चुकीचे आणि त्याज्य व त्रासदायक विचार बाजूला सारून त्याजागी दुसरा चांगला विचार स्थापित करणं.
त्यासाठीच ज्यावेळी आपण मुद्दामहून वा अहेतुक शांत बसलेले असतो, कुठेही, घरी, गाडीत वा अन्य ठिकाणी, त्यावेळी येणाऱ्या विचारांचा विचार करावा. म्हणजे काहीक्षण त्या विचारांचं निरीक्षण करावं. त्यातून जाणवेल की, काही विचार टाकाऊ आहेत, काही सोडून पुढे गेलं तरी चालण्यासारखं आहे आणि काही विचार मंथनास योग्य आहेत.
अश्या मंथनास योग्य विचारांना धरून, त्यांचा हात हातात घेऊन पुढे जायचं. अर्थात त्या विचारांचं चिंतन करायचं. मुळात चिंतन म्हणजे काय तर एक विचार मनात धरून त्यामागे मनाला विचार करायला लावणं. ज्यातून मन त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करतं आणि आपल्याला त्यातून ऊर्जा मिळते. म्हणनूच त्या विचारांच्या खोलात शिरून त्या विचारांचा छंद, मनाला लावायचा. अशी सतत वा नित्य सवय, मनाला लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर, मनाला हळूहळू, आपण सांगू ते विचार करण्याची सवय लागेल. एखाद्या अश्वाला ताब्यात घेताना असच, आधी त्याच्या मर्जीने जाऊन मांड पक्की करून, मग त्याला आपल्या मर्जीनुसार चालवलं जातं. मन आणि अश्व यात, याबाबतीत साधर्म्य आहे. अर्थात दोघांचा चौफेर उधळलं जाण्याचा स्वभावधर्म एकच आहे आणि दोघांनाही त्यांच्या नकळत ताब्यात घ्यावं लागतं.
अश्या प्रकारचा प्रयोग सुरुवातीला काही सेकंद जमवून बघायचा, तो जमू लागेल प्रयत्नपूर्वक, त्या नंतर याच विचारांच्या चिंतनाचा नाद वा छंद मनाला जडवायचा. जाणीवपूर्वक व निश्चयाने आपल्या मनातील विचारांना पाट वा मार्ग दिल्यास, हवे ते विचार करण्यास मन हळूहळू सिद्ध होते. ही प्रक्रिया काही दिवसांची असू शकते. परंतु व्यक्तिपरत्वे यात कमीअधिक होऊ शकेल.
हे सर्व करत असताना जाणीवपूर्वक व नित्य नामस्मरण हे सुरूच ठेवायचं, पण त्यावेळी वा त्यावेळात हा प्रयोग करून बघायचा नाही. म्हणजे मनाला आपण काही प्रयोग करत आहोत हे जाणवणार नाही. या मागचं थोडक्यात तत्व असं की, मनाला विचारांचं खाद्य लागतं हे पूर्ण सत्य आहे, तर मग ते विचार आपण ठरवू ते असतील आणि ते सकारात्मक व मनासह शरीर, बुद्धी व आत्मा या सर्वांना पोषक असावेत.
कारण नकारात्मक, गैर व त्याज्य विचार शरीरात चुकीचे हार्मोन्स निर्माण करून, शारीरिक समतोल बिघडवतात हे शास्त्रानेदेखील सिद्ध केलं आहे. किंबहुना चांगले अथवा वाईट, सकारात्मक किंवा नकारात्मक विचार शरीरातून त्या प्रकारच्या लहरी निर्माण करतात आणि त्याचा परिणाम आजूबाजूच्या वातावरणावर होतो. अगदी आपण शिजवत वा बनवत असलेल्या अन्नावर किंवा झाडांवरसुद्धा होतो आणि त्यात आपल्या विचारांचा वा त्यावेळच्या मनःस्थितीचा परिणाम दिसून येतो.
म्हणून प्रयत्नपूर्वक चांगल्या विचारांचं, वाचनाचं आणि चर्चेचं खाद्य मुद्दामहून मनाला देण्याचा प्रयत्न करा,ज्यायोगे सतत सकारात्मक विचार मनात येतील आणि चुकीचे वा त्याज्य अथवा नकारात्मक विचार, त्याचवेळी बाहेर काढून, त्याजागी उत्तम विचारांचं खाद्य मनाला देत राहता येईल.
इथे एक अभंगातील ओळ आठवली.
मना लागो छंद गोविंद,गोविंद नित्य गोविंद.
यातील नित्य आणि छंद या शब्दात दोन गोष्टी स्पष्ट होतात एक मनाला कोणतातरी छंद अर्थात चाळा किंवा नाद हा लागतो आणि तो नित्य लागतोच. तोच छंद नित्य सकारात्मक देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे म्हणजे उत्तम सकारात्मक चिंतन करणे.
म्हणूनच मी सतत सर्वांना सांगतो की, चिंतन करा, विचार येतील आणि त्यातील सद्विचार घेऊन पुढे जा, मार्ग सापडतील.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment