भोग आणि ईश्वर ६९
नामाचा विचार करताना कोणतं नाम घ्यावं हा एक प्रश्न मनात कायम सर्वप्रथम उभा राहतो. यावर शास्त्रवचन असं आहे की ll सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगाच्छती ll अर्थात सर्व देवां मधील कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा अंती केशव अर्थात भगवान श्रीमहाविष्णू यांनाच पोचतो. अर्थात ज्याप्रमाणे सर्व सरिता अंती सागरालाच प्राप्त होतात त्यानुसार.
याचा खोलवर विचार करणं गरजेचं आहे. शास्त्रानुसार सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देतात. ते जलात उभं राहून दिल्यास सुयोग्य असं शास्त्र सांगतं. म्हणजे जे नदीकिनारी राहतात त्यांनी अर्घ्य नदीत आणि समुद्राच्या परिसरात राहतात त्यांनी ते समुद्रात उभं राहून सूर्यदेवाकडे तोंड करून अर्घ्य द्यावं असं शास्त्र आहे. स्नानसंध्यादिक विधींमधील तो एक विधी आहे.
यात मुख्य संकल्पना ही या विश्वाला ऊर्जा, चेतना देणाऱ्या व धनधान्य, वृक्ष, वन, पानंफुलं इत्यादींसह समस्त जीवसृष्टीच्या जगण्याला जीव अर्थात अर्थ व श्वास प्रदान करणाऱ्या निसर्गराजावर कृपावंत असलेल्या सूर्यदेवाला वंदन करून चराचरावर सूर्यदेवाच्या असणाऱ्या अनंत उपकारांबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी आहे. पण म्हणजे ज्यांना शक्य नाही, म्हणजेच हे शास्त्रसंमत विधिवत अर्घ्य देणं, त्यांना काहीच करता येणार नाही का.
मुळात इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की सर्व वेद शास्त्रे पुराणं यांच्या मागची संकल्पना अथवा मूलतत्त्व हे, अगणित रुपात अस्तित्वात असलेल्या,विधात्याच्याच, प्रत्येक रुपाला, प्रणाम करून, आपल्याला, जीवनात व जगण्यात, सहाय्यकारी असणाऱ्या, पंचतत्वांसह सर्व तत्वांचे, ऋणनिर्देश व्यक्त करून, त्यांच्याप्रती आपला कृतज्ञभाव व्यक्त करणं. असा हा कृतज्ञभाव सर्व पंचतत्वांना व सुर्यादी प्रकट प्रत्येक रुपांना प्रत्यक्ष अर्घ्य, पूजन, अर्चना, आरती, धुपदीप इत्यादी करून विधिवत करू शकता किंवा मनात वंदन वा प्रणाम करून त्यांच्याप्रती हा कृतज्ञभाव व्यक्त करू शकता. पण मूळ तत्व भाव व्यक्त करण्याचं आहे.
आपल्यासारख्या देहधारी जीवांना दुसऱ्या देहधारी व्यक्तीबद्दलचे हे भाव प्रत्यक्ष प्रकट करून अथवा प्रत्यक्ष त्या व्यक्तीला सांगून व्यक्त करावे लागतात. कारण प्रत्येकाला समोरच्याच्या मनातील ओळखण्याची कला, विद्या अथवा शक्ती प्राप्त नसते. परंतु निसर्गातील ही सर्व तत्वं, स्वयंचलित, स्वयंप्रेरीत आणि सर्वज्ञानी असल्याकारणाने, आपण मनातून व्यक्त केलेले आभार अथवा कृतज्ञभाव हे त्यांच्याप्रती पोचतातच. तितकी शक्ती त्यांच्याकडे असतेच.
तुम्ही एखादा प्रयोग करून बघा. घरातील कुंडीत लावलेलं एखादं तुलसी वा अन्य झाड निवडा अथवा सर्व झाडं घ्या. रोज सकाळी त्यांच्यापाशी उभं राहून किंवा पाणी घालताना त्यांना मनातल्या मनात नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला त्यांच्या फुलण्यात, फुलांच्या प्रफुल्लित होण्यात झालेला सकारात्मक बदल जाणवेल. तोच बदल तुमच्यामध्ये सुद्धा होत जाईल.
कारण शुद्ध अशुद्ध, सात्विक व तामसी असे सुक्ष्मातले सूक्ष्म भाव जाणण्याची व त्याला प्रतिसाद देण्याची शक्ती विधात्याने त्यांना दिली आहे आणि त्यांना पंचमहाभूतरुप देह नसल्यामुळे विकार जडलेले नसतात. म्हणून जे सूक्ष्म वा अतिसूक्ष्म भाव त्यांच्यापर्यंत पोचतात, त्यांना ते जाणवतात, त्याचे अर्थ त्यांना उमजतात, कारण त्यांना फक्त भाववाचन हेच अवगत असतं. त्यामुळे शब्द असले नसले तरी त्यांना त्यामागची भावना शब्दातीत स्वरूपात समजते.
म्हणूनच भारतातील एका आदिवासी जमातीत, जर एखादा वृक्ष पाडायचा असेल तर, सर्व गावकरी, त्या वृक्षाभोवती एकत्र जमून, त्याला शिव्या घालायला अथवा कडवट बोलायला सुरुवात करतात. साधारण आठ ते दहा दिवसांत तो वृक्ष आपणहून मलूल होऊन मृतवत होतो. त्यानंतर त्याला कापण्यात येतं.
आता या सर्वांचा विशिष्ट नाम, अथवा विशिष्ट देवाचीच स्तुती अथवा स्मरण आणि त्याच्या योगे त्याच्याकडून प्राप्त कृपारूप शक्तीशी काय संबंध आहे हे उद्याच्या भागात पाहू.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment