भोग आणि ईश्वर ६७
शास्त्रीय दृष्टिकोनातून नाम, त्याच्यासाठी काळजी हे सर्व आपण पाहिलं. आता जरा नाम काय व कसं घ्यावं, याचापण विचार करूया. नाम काय घ्यावं यावर अनेक संतांनी, सद्गुरूंनी सांगून कृपा करून ठेवली आहेच. नाम हे ईश्वराच्या रुपाचं प्रतीक, प्रतिनिधित्व आणि प्रतिबिंबस्वरूप आहे हे मुळात लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट "सर्वदेव नमस्कारम केशवं प्रतिगच्छती" या श्लोकाप्रमाणे कोणत्याही नामाचा उच्चार करून आपण नाम घेतलं आणि त्या त्या इष्टदेवतेला स्मरून केलं,
तरी सर्व सरिता जश्या सागरालाच येऊन मिळतात त्याप्रमाणे कोणतंही नाम घेतलं तरी ते सरतेशेवटी केशव अर्थात विश्वचालक भगवान विष्णू यांच्यापाशी येऊन पोचतंच. म्हणून कोणतंही नाम घ्या आणि त्या देवाचं स्मरण करून नामजप करा तो त्या त्या इष्टदेवतेमार्फत जगतपालक महाविष्णू यांनाच पोचणार.
एखाद्या कार्यालयात ज्याप्रमाणे कोणत्याही खात्याच्या प्रमुखाला आपण पत्र लिहिलं तरी शेवटी त्यावर कार्यवाही करताना कंपनी वा खात्याचे प्रमुख, सर्वोच्च प्रमुखांना त्याबाबत माहिती देणारच, त्याप्रमाणे सर्व वा त्या त्या नामाच्या देवांमार्फत आपल्या नामाची पोच श्रीविष्णूंपर्यंत पोचतेच.
म्हणून मी हे नाम घेतो वा घेते त्यामुळे मी मागे राहीन अथवा एखादा दुसरं नाम घेतो म्हणजे तो पुढे जाईल असल्या भलत्या शंका मनात न आणणं चांगलं. आपण घेत असलेल्या किंवा विश्वासाने व श्रद्धेने स्वीकारलेल्या नामावर आपणच शंका घेणं योग्य नाही. म्हणून कोणताही किंतु वा परंतु मनात न आणता, आपल्याला जे नाम घेतल्याने मानसिक समाधान व आनंद मिळेल, ते नाम घेऊन, त्याच्याशी प्रामाणिक राहणं श्रेयस्कर आहे.
नाम घेण्याची बुद्धीहोणं, हेच मुळात भाग्याचं लक्षण आहे. त्यामुळे कोणत्या नामाने सुरवात करू म्हणून विचार करण्याइतका सुद्धा वेळ वाया न घालवता श्रीगणेश, श्रीशंकर, श्रीविष्णु, श्रीराम, श्रीकृष्ण, आपले सद्गुरू, देवी, कुलदेवता, ग्रामदेवता यांच्यापैकी कोणत्याही नामाने सुरवात करावी. दुसरा एक प्रश्न सर्वसामान्यपणे मनात येतो की, मी सद्गुरू करावे का किंवा बऱ्याच जणांचे कोणीना कोणीतरी गुरू असतात मलाच का गुरू लाभत नाहीत.
याबाबत असं म्हणता येईल की, आपल्या मनातील इच्छा हा त्या सद्गुरूंपर्यंत पोचण्याची पहिली पायरी आहे. आपण कोणालाही मनातल्या मनात सद्गुरू मानून नामाचं कर्म सुरू करणं महत्वाचं आहे. ती सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे. मुळात अध्यात्मिक परिभाषेत गुरू करायचा नसतो तर गुरू स्वतः योग्य शिष्याचा शोध घेत असतात आणि त्यांना योग्य वाटलेल्या शिष्याला वा साधकाला ते आपल्यापर्यंत बोलावून घेतात.
त्यामुळे ते घडेपर्यंत, आपण नाम घेत साधनेच्या गंगातीरी पडून राहून, आपलं नामाचं कर्तव्य पार पाडत राहणं, गरजेचं आहे. योग्यवेळी योग्य पवित्र गंगारुप सद्गुरू आपल्याला पावन केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून नाम घेत जा त्यामुळे सर्व योग सहज जुळून येतील, योग्यवेळी.
गुरुशक्तीच्या लहरी अंतराळात कायम विहरत असतात आणि आपल्या मनातील कंपनातून निर्माण होणाऱ्या लहरी धरून त्यामार्फत आपल्या मार्गावर येण्याची त्यांची क्षमता असते. अश्या प्रकारच्या लहरी प्राप्त करण्याची क्षमता ही पुण्याईने मिळते. सद्गुरुंच्या स्थानी ती शक्ती त्यांच्या सिद्धिप्राप्तीचा भाग असतो. तरीही सर्वसामान्य माणसात कधीतरी अश्या लहरी वा संकेत प्राप्त करण्याची क्षमता असते. ती त्यांच्या या व मागील जन्मातील पुण्याईमुळे शक्य होतं.
अश्या संदेश प्राप्त करून त्यातून काही भविष्यातील संकेत मिळण्याच्या शक्तीला एक नाव आहे. आपण विचार करून ठेवा, उद्या यावर बोलूया.
अजून पुढे पाहूया, उद्याच्या भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment