भोग आणि ईश्वर ८५
खरतर नामाची स्वतःची शक्ती अपरिमित आहे. नाम स्वयंभू आहे. नाम घेणारा नाम घेता घेता नामाची शक्ती आणि ऊर्जा अनुभवू शकतो किंवा नामाचा जोर वाढत गेला की, त्याच्या अफाट ताकदीचा परिचय नामसाधकाला यायला लागतो. जसजशा प्रारब्धाच्या लाटा ओसरू लागतात, तसतसा नामाच्या ऊर्जेचा प्रत्यय यायला सुरवात होते. हे सर्व नित्य आणि जीव ओतून नाम घेणाऱ्याला अनुभवायला मिळतं.
तरीसुद्धा एक सर्वसामान्य परिस्थिती जी अनुभवास येते ती म्हणजे नामात चित्त एकाग्र होत नाही, नाम घेताना विचार भरकटतात, मन चलबिचल होतं, बरेचदा नाम घेतानासुद्धा क्रोध अनावर होतो, एखादि घडलेली गोष्ट आठवून, मन सुन्न,उदास वा खिन्न होतं, एखादी दुःखद घटना आठवून, त्याच भावात मन हरवून जातं, अनेकदा आपण केलेल्या चुका, रागाच्या भरात घडलेल्या गोष्टी आठवून, अपार खिन्नता वा न्यूनता येते, कधी याउलट आनंदाचे प्रसंग आठवून मन सुखावतं.
यासारख्या अनेक गोष्टी घडून मनात वेगवेगळे भाव उत्पन्न होतात, ज्याच्यामुळे नामात मन एकाग्र न होता, मन विविध भावात प्रसरण पावत. त्याला अनेक अंकुर फुटतात. कदाचित वर दिलेले सुख, दुःख, आनंद समाधान, क्रोध, काम इत्यादी संमिश्र भाव एकाचवेळीसुद्धा उत्पन्न होऊ शकतात. हा सर्व परिणाम नाम सुरू केल्यानंतर, गत काळातील आणि संचितातील सर्व जमा त्याज्य गोष्टी, आपली जागा सोडायला सुरवात करतात आणि त्यांना आपलं स्थान सोडायचं नसतं, पण नाम हे असं औषध आहे जे, या सर्व त्याज्य गोष्टींना बाहेर काढायला सुरवात करतं.
एक उदाहरण देतो म्हणजे स्पष्ट होईल. समजा आपण एखादी न वापरलेली जागा, वापरायला घ्यायचा विचार करतो, तेंव्हा ती जागा,सर्वप्रथम स्वच्छ करून घेतो. ही स्वच्छतेची प्रक्रिया मोठी त्रासदायक असते.कारण ही सुरू केल्यानंतर सर्वात प्रथम त्या जागेतील उंदीर, घुशी,पाली, झुरळं, कोळी हे सर्व आपापली जागा सोडून इतरत्र पळायला सुरवात करतात. वास्तविक ते आपल्या साफसफाईला घाबरलेले असतात. पण आपण त्या साफसफाईच्या दरम्यान बाहेर पडणाऱ्या सर्व कीटक, प्राणी इत्यादींना घाबरून बरेचदा ती प्रक्रिया अर्धी सोडतो वा नीटपणे करत नाही.
परिणामी काही किटक व प्राणी तसेच राहून जाऊ शकतात. म्हणजे पूर्ण सगसफाई न झाल्यामुळे पुन्हा अस्वच्छता डोकं वर काढण्याचा संभव असतो. हे जाणून आपण नेटाने, काम शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि हेदेखील जाणतो की, आज जर सगळे बाहेर गेले नाहीत तर, पुन्हा कधीही जाणार नाहीत.
याच न्यायाने जेंव्हा आपण नाम घ्यायला सुरुवात करतो, तेंव्हा तेंव्हा प्रारब्धातील सर्व कर्माचे किडे, जंतू, प्राणी, किडेमकोडे, संचितातील सर्व त्याज्य गोष्टी, कधी सुखोपभोग व कधी दुःख, कधी वासना कधी क्रोध, अशी रूपं धारण करून मनातील विविध भावावस्थेत बाहेर पडायला सुरुवात करतात. त्यामुळेच कित्येकांना अनेक प्रकारचे अनुभव येतात. काही चांगले काही वाईट.
आता यावर एक प्रश्न पडेल की, वाईट अनुभव, दुःख, क्रोध, वासना ठीक आहे,पण चांगले अनुभव म्हणजे त्याज्य गोष्टी कश्या. याचं उत्तर म्हणजे एखादया नेटाने नवीनच अभ्यास करायला लागलेल्या मुलाला पहिल्याच परीक्षेत उत्तम गुण मिळणं. हा एक प्रकारचा मायेचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून सदर विद्यार्थी सहजी यशाने गाफील राहून अंतिम परीक्षेच्या तयारीत मागे रहावा. इथे विद्यार्थी म्हणजे आपण, सहज यश म्हणजे सुरवातीचे चांगले अनुभव, म् त्याद्वारे आलेली शिथिलता म्हणजे माया. हणजे मायेचा तो फेरा इतका विचित्र असतो. जो सुखातिरेक देऊन किंवा अतीव दुःख देऊन मोहाचा पडदा निर्माण करतो, जेणेकरून बुद्धी भ्रमित होऊन एकूणच आत्मउद्धाराच्या मार्गावरून साधक भ्रष्ट व्हावा.
नामातच राहणे हितावह आहे. म्हणून नामचंच चिंतन करा, नाम सर्व काही सुलभ करेल, पाहूया उद्याच्या भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment