भोग आणि ईश्वर ७४
देह आहे मन बुद्धी आत्मा, ज्ञानेंद्रिय , सर्व आहे. म्हणजे मोबाईल आहे सिम आहे डेटा चालू केला की, नेट अर्थात ईश्वरी कृपेचा ओघ अखंड सुरू होईल अशी व्यवस्था आहे. पण हा लाभ होतो आहे याची काही खात्री देता येईल का, असा एक प्रश्न मनात येतो की हे एकमार्गीच आहे म्हणजे फक्त इकडून आपण करत राहायचं आणि समोरून ईश्वरी कृपा, अनुकंपा,प्रेरणा यांचा स्रोत वा झरा कधी येईल का.
आपण असा विचार करूया की आपण मोबाईल चालू केला, त्याला चार्ज केला त्याचं नेटवर्क चालू केलं आणि डेटा सुरू झाला. मनात काही योजून आपण त्यात काही समाजमाध्यम शोधून त्यावर थोडी मुशाफिरी केली आणि पुन्हा डेटा बंद करून मोबाईल ठेवून दिला. डेटा बंद झाल्यावर त्यावर काहीही संदेश येणं बंदच होणार हे ओघानेच आलं. यात काही फार शास्त्र किंवा तर्क करायची गरज नाही.
पण इथे आपल्याला माहीत नाही की नेटवर्क कुठे आहे, कधी व केंव्हा मिळेल, त्याचे सिग्नल पकडले जातील का, ते आपल्याला कळतील का , नाही कळले तर काय. या सर्वांसाठी मोबाईलमध्ये संदेश प्राप्त करून, त्याचं पृथक्करण करणारी व्यवस्था, सॉफ्टवेअर्स आणि चिप्स असतात. ज्या प्रोग्रॅम केल्या गेलेल्या असतात. त्या हे कार्य करून आपल्याला सर्व संदेश स्क्रीनवर दाखवतात आणि आपण त्यानुसार पुढे कार्य करत राहतो.
मानवी शरीरात आत्म्याच्या जोडीला मन आणि बुद्धी हे देऊन देवाने बरच काही दिलं आहे. यात नामाची साधना सुरू करून आपण फक्त आपलं काम करायचं आहे. या नामस्मरणाबरोबर सदवर्तन, सदप्रवृत्ती, सदाचार आणि सत्शीलता या चार गुणांना धारण करून वाटचाल सुरू केली की, आपण आपलं कर्म पुरेश्या इमानदारीने केलं असा अर्थ काढता येईल. पण हे सर्व केलं तर. ही सर्व मानवी शरीरातील मनाला प्रवृत्त करणारी सशक्त साधनं आहेत.
हे सर्व केलं तर आपण खऱ्या अर्थाने नामाच्या मार्गात पुढे जात आहोत याची खात्री बाळगायला हरकत नाही. विचाराने वृत्ती आणि आचार ठरतात आणि त्याने व्यक्तित्व ठरतं. मुळात आपले विचार हा वृत्तीचा पाया आहे. त्याची तात्विक बैठक ठाम हवी. म्हणजे मुळात मी मनाने कसा आहे,मला काय आवडतं, मी कशाप्रकारे प्रतिक्रिया देतो, मी प्रसंग कसा सहन करतो, त्याला कसा तोलून धरतो, माझं मन कठीण प्रसंगात किती खंबीर आहे, किती धैर्यवान आहे,मी माझ्या मार्गात किती चिकाटीने वाटचाल करू शकतो.
माझ्यामुळे कोणी दुखावला जात नाही ना, मी मुळात या नामस्मरणाच्या वाटेवर खरच मनापासून वाटचाल करणार आहे ना, मी नित्य यात रममाण होईन ना, मला, एक वेळ घालवण्याचा मार्ग म्हणून, हे करायचं आहे की, काहीतरी भरीव प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा, जिद्द माझ्यात आहे या सर्व गणितांवर बरच काही अवलंबून आहे. खूप वेळा आपण एखाद्या प्रसंगामुळे वा घटनेमुळे यात वळलो, तर तो माझा तात्पुरता वृत्ती बदल झाला.
म्हणजे जर ते वातावरण वा प्रसंगाचं गांभीर्य संपलं की मी पुन्हा मूळ वृत्ती कडे वळणार आणि नन्तर पुन्हा प्रासंगिक याकडे पाहणार ही झाली धरसोड वृत्ती. ही वृत्ती अध्यात्म काय पण इतर कोणत्याही क्षेत्रात घातक आहे. या मध्ये मुळात प्रामाणिकपणा हवा. ती प्रामाणिकता स्वतःशी हवी.
यात चिकाटी हवी. प्रासंगिक नाम घेणाऱ्यांना वेळ गेली आणि दिवस जरा बदलले की, नामाची आवड कमी होते वा जास्त होते. हे उपयोगाचं नाही हे नक्की.
आपण काही व्यावहारिक मिळवायला नाम घेत नाही अथवा घेणार नाही. प्रारब्ध व संचितातील चूका दुरुस्त करून त्या सुधारण्यासाठी आपण हे सुरू करत आहोत अशी धारणा मनात ठेवून नामस्मरण सुरू करावं. परंतु याचा अनुभव वा प्रचिती लगेचच येईल हे सांगता येणार नाही. म्हणून यावर उपाय म्हणजे फक्त नामकरता नाम घेण्याचं ठरवलं की, इतर कोणतेही विकल्प मनात उभे राहणार नाही. नामाच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण म्हणजे हे विकल्प अर्थात शंका कुशंका. ही नामाच्या मार्गातील सर्वात मोठी धोंड आहे.
यावर अजून विचार करूया उद्याच्या भागात.
चिंतन करा, विचार येतील आणि त्यातील सद्विचार घेऊन पुढे जा, मार्ग सापडतील.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment