Skip to main content

भोग आणि ईश्वर ८४

भोग आणि ईश्वर  ८४
  
सुक्ष्मरुप आत्मा आणि निर्गुण निराकार मन यांच्या संगतीत बुद्धी एकाग्र करून चित्तात, नामाचा दीप लावल्यानंतर, अखंड आनंद आणि आनंद अनुभव करावा, इतकं त्यात हरवून जाता आलं पाहिजे. या नामाचा जप करण्याचं भान सुद्धा नसावं, इतकं ते आतून, नैसर्गिक, श्वासासोबत आलं पाहिजे. म्हणजे नाम घेता कामा नये, तर ते आलं पाहिजे. कारण मी नाम घेतो ही भावनासुद्धा अहंकार निर्माण करू शकते. म्हणूनच म्हणतानासुद्धा नाम येतं म्हणावं घेतो म्हणू नये. 

कारण ते येण्याची सद्बुद्धी सुद्धा भगवंत आणि सद्गुरू कृपेने प्राप्त होते. मायेचा प्रभाव इतका जोरदार असतो की, एखादी साधी किंवा अत्यंत दुःखद किंवा सुखद घटनासुद्धा ह्या बुद्धीला फिरवून, नाम घेण्यापासून परावृत्त करू शकते. मुळातच आपण भोग किंवा सुख या दोन्हीपैकी कोणत्याही स्थितीत असू, अशावेळी मन आणि मनातील विचार यांसह बुद्धीला एक प्रकारचा पडदा पडतो.

त्यातुन बाहेर येऊन किंवा त्या स्थितीला रोखून, देहाला नाम  घेण्याची बुद्धी, ईश्वरीकृपा आणि त्या ईश्वरीकृपेचा परिणाम म्हणूनच, साध्य झालेली गुरुकृपा, यामुळे होते. आपल्या स्थितीतून व अवस्थेतून बाहेर पडण्याची इच्छा जागृत होणं, हाच एक शुभयोग आहे. त्या इच्छेला मनात रुजवून त्याला वृद्धिंगत करण्याचं काम, सकारात्मकता, प्रारब्धातील पुण्याई, इच्छाशक्तीची ऊर्जा, यांसह सद्गुरूंची अनंत कृपा, यांचा संगम करते.

प्रारब्धाच्या वाटेवर विश्वात प्रत्येक प्राण्याला जावंच लागतं. कारण कर्म करण्याची सक्ती व विषय आणि माया यांची आसक्ती, यातून जे परिणामस्वरूप प्राप्त होतं, ते फल, सुख असेल तर जमिनीवर राहून आणि दुःख असेल तर आत्मशुद्धी आहे हे जाणून, उपभोगणं किंवा भोगणं हे सर्वच प्राण्यांना क्रमप्राप्त आहे. परंतु मानवाला ही देणगी आहे की, यावर कशी आणि काय प्रतिक्रिया द्यायची. 

कारण आपली प्रतिक्रिया ही देखील एक कर्मच आहे आणि ते कर्म चुकीचं असेल तर त्यातून पुन्हा एक कर्मफल साखळी आपणच तयार करतो. गीतेत आणि वेद उपनिषदे यात सांगितल्याप्रमाणे कोणत्या कर्माचं फल कधी समोर येईल हे भगवंतसुद्धा जाणत नाहीत. म्हणूनच आपला कर्मभाग जितका नेटका आणि हितावह ठेवता येईल, तितका तो ठेवावा. 

पण हे सर्वकाळ सर्ववेळ शक्य होईलच, हे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. म्हणूनच यातून मध्यममार्ग म्हणजे भगवंताच्या स्मरणात नित्य कर्म करत गेल्यास आणि त्या स्मरणाची नित्य साखळी तयार करत गेल्यास, त्या तरंगलहरी सकारात्मकता, सात्विकता निर्माण करून, चुकीचं कर्म करण्यापासून परावृत्त करतील. पण हे सात्विक भान निर्माण होण्यासाठी नित्य भगवतस्मरण करण्याची बुद्धी आणि एकाच प्रकारच्या स्मरणाची सवय जडणं आवश्यक आहे. 

अशी सवय तेंव्हाच जडू शकते, ज्यावेळी तुम्ही भगवंताच्या अगणित नामातून, एक नाम मुखी धारण करून, त्या नामाने, भगवंताचं स्मरण करण्याची सवय जिव्हेला, जिव्हेद्वारे देहाला, देहाद्वारे मेंदूला, मेंदूद्वारे मनाला आणि मनाद्वारे सुप्त मनाला जडवून घ्याल. अशी सवय जडण्यासाठी दिवसातून किमान काही काळ नामस्मरणाचा सराव, तोदेखील मनापासून करणं, अत्यंत जरुरी आहे. कारण सवय आणि अभ्यास यामुळे अनेक गोष्टी सवयीच्या होऊन, ती सवय नित्य केल्यास, हळूहळू मनापर्यंत झिरपत जाते. आणि हे झिरपत जाणं पूर्णतः मनापासून असेल तर ते हृदयापर्यंत नक्कीच पोचतं. अर्थातच हृदयस्थ आत्मा सुखावणं हे ओघाने आलं

 नाम येतं म्हणावं, घेतो म्हणू नये. म्हणून नामचंच चिंतन करा,  नाम सर्व काही सुलभ करेल, पाहूया उद्याच्या भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...