भोग आणि ईश्वर ६४
ब्राह्ममुहूर्ताला किंवा सकाळी लवकर उठून नामस्मरण वा मन व बुद्धीशी निगडित कोणतही कार्य केल्यास ते उत्तम परिणाम देणारे ठरते, हे काल आपण पाहिले. त्यावेळी घेतलेल्या नामामय लहरी या अधिक परिणामकारक असतात, मनाला व अंतरात्म्याला अलौकिक आनंद देणाऱ्या असतात आणि त्या नादाचा व लहरींचा वास्तूवरसुद्धा सकारात्मक व सुख कारक परिणाम होतो. लहरींचा इच्छित परिणाम होतो.
आता या नादमय नामलहरी जितक्या शक्तिशाली तितक्याच त्या अधिक प्रभावशाली असतात, मग ते नामजप असो वा नामसंकीर्तन असो. दोन्हीमध्ये तल्लीनता, तन्मयता व त्या नादात, मन किती एकाग्र होऊन, आपल्या आराध्याच्या भक्तीत लीन झालं आहे, हे महत्वाचं आहे. नामसंकीर्तनात भगवंताच्या नामाला एका विशिष्ट लयीत, नादात, सुरात घेऊन, त्याचा संगीतमय आविष्कार करून ईश्वराला भजलं जातं. संगीत हे सर्वात प्रथम कानांवाटे हृदयात पोहोचतं.
नाम हे फक्त त्या नामचं उच्चारण असतं, जे मोठ्याने असेल वा मनातल्या मनात असेल. नामसंकीर्तनात, त्या नामचं सुरात व तालात उच्चारण केलं जातं. ज्यामध्ये ताल हा लहरीचं काम करतो आणि मन त्या नादात, त्या तालात आणि त्या लहरींवर हरवून जातं. नामजपामध्ये हेच अपेक्षित असतं. तेच नामसंकीर्तन साध्य करून देतं. पण त्यामुळे कोणतंही एक उजवं किंवा डावं ठरत नाही.
सर्वात महत्वाचं लहरी वा तरंग जे नादमय माध्यमातून परमेश्वर शक्तीपर्यंत पोहोचावे लागतात ते साध्य होणं आणि त्या भक्तिमय वातावरणात मनाला,हृदयाला आणि आत्म्याला त्या नादमय तल्लीनतेचा, अनुभव व अनुभूती येणं हे महत्वाचं आहे. अभंग, कीर्तन, भजन आरती या सर्वांचा उद्देश भक्तीची अत्युच्च अनुभूती देणं आहे आणि ती आपण घेणं हे महत्वाचं आहे.
नामजप एकांतात, मन शांत करून, वैखरीत सुरू करून हळूहळू त्यातून मध्यमा, पश्यंती पर्यंत जाण्याचा प्रयत्न करून बघा. परा वाणी ही, नाम सुप्त मनात गेल्यानंतर आपोआप साध्य होतं. म्हणून वैखरीने सुरू करून हळूहळू आत आत जाण्याचा प्रयत्न करावा. पण ही गोष्ट खरतर तुमच्या नामचं सातत्य आपोआप साध्य करून देईल, ह्याची खात्री बाळगा. म्हणूनच जी अनुभूती नादातून नामसंकीर्तन करताना येते, तीच अनुभूती या एकांतातील नामजपात येते. शेवटी यात स्व व स्वतःला विसरून जाणं हे महत्वाचं आहे. कारण स्वतःला विसरल्याशिवाय, ज्याला मिळवायचं आहे तो मिळणार नाही.
ही एकतानता, एकनादता, एकांतता, लहरींवर स्वार होऊन, त्यात मिसळून जाणं, हाच अनुभव घेत व त्यात आपल्याला विसरत आराध्याच्या ध्यानात मग्न होणं, हेच भक्तीरुप साधण्यासाठी, कित्येक संत महंत यांनी जन्म जन्म घालवलेत, नव्हे त्यासाठी ईश्वराकडे मानवी जन्म मागून घेतले. एक तुझ्या नामशिवाय दुसरं काहीही नको. कारण त्यातल्या आनंदाची अनुभूती हीच खरी महत्वाची आहे. त्यापुढे मोक्ष व मुक्ती सुद्धा तुकोबारायांनी तुच्छ मानली.
एवढा अलौकिक आनंद नामाच्या जपात गजरात, संगीतात, त्या तानेत, त्या नादमाधुर्यात आहे. म्हणून जे माध्यम, तुम्हाला आनंदाची अनुभूती देऊन, नामाचा योग साधेल, ते माध्यम, तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे. मुख्य उद्देश हा नाम घेणं हा आहे. ते कसं घ्यायचं हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. मन ज्या प्रकारात तल्लीन होऊन एकाग्रता, एकतानता आणि नाद साधतं ते योग्य व तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे.
म्हणूनच विधात्याने रचलेल्या नवविधा भक्तीत श्रेष्ठ कनिष्ठ काही नाही. श्रेष्ठ काय तर त्याच्या नामाचा अनुभव व त्या नादाची अनुभूती, ती साधता आली की काम झालं.
याच विषयात अजून पुढे जाऊया, उद्याच्या भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment