भोग आणि ईश्वर ८८
आपण जाणतेपणी वा अजाणतेपणी, याजन्मी वा गतजन्मांत घडलेल्या, स्मरणात असलेल्या वा विस्मरणातील प्रमाद किंवा चुका यांच्याबद्दल चर्चा करूया. माणूस हा विचारशील आणि कृतिशील प्राणी आहे. बाकी सर्व प्राण्यात आणि मानवात हाच मुख्य भेद आहे, विचार आणि कृती.
तरीसुद्धा जाणूनबुजून वा अजाणतेपणी कर्म करत असताना, माणसाच्या हातून चुका, क्वचितप्रसंगी प्रमाद घडतात. हे सर्वसामान्य लोकांबाबत आपण बोलत आहोत. जे प्रमाद म्हणजे गुन्हे मुद्दामहून बुद्धियुक्त स्थितीत करतात, त्यांचा आता नको विचार करायला. आपण अश्या अनेक चुका जीवन जगताना करतोच करतो. कुणी जर नाही म्हणत असेल तर खात्रीने सांगतो की, तो त्यांचा भ्रम आहे.
अश्या चुका, जश्या या जन्मी असोत वा आधीच्या जन्मातल्या असोत, पण कर्म केल्यानंतर त्याचं फलित भोगणं हे ओघानेच आलं. बर कर्मफलाच्या सिद्धांताने कोणतं फल कधी समोर येईल हे अज्ञात आहे, गूढ आहे. म्हणजे आनंदात एखाद्या मागील चुकांचं फलित समोर येणं हे नित्य आहे. आनंदावर विरजण ज्याला म्हणूया ते. बर भोग भोगून संपवायची मानसिक तयारी जरी केली, तरीसुद्धा, किती कधीपासून आणि कधीपर्यंत हे भोग राहणार, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे मानसिक अवस्था कठीण होते, भोग भोगत असताना.
पण मग उपाय काय हा प्रश्न खूपदा पडतो. काही मंत्र, तंत्र, पूजाअर्चा इत्यादी उपाय प्रत्येकजण आपापल्या अधिकारात सांगतो, पण आपण आज वेगळाच विचार करणार आहोत. मुळात लक्षात घ्या की, सर्वकाही मनाशी निगडित आहे. भारतीय कायदासुद्धा उद्देश अर्थात इंटेंशन्सवर आधारित आहे. म्हणजे देह जरी कर्म करतं आणि आत्मा त्याचं ऋण पुढे नेतो, या जन्मात वा पुढील जन्मात तरीही, मनाचा त्यातील सहभाग किती याचंदेखील विश्लेषण होतं आणि विधाता त्यावर आधारित कर्मफल देतो किंवा तशी रचना कर्मफल सिद्धांतात करण्यात आली, विश्वनिर्मितीच्या वेळीच.
कायदा जरी पुराव्यावर आधारित उद्देश सिद्ध करण्यावर भर देतो, तरीही आरोपीलासुद्धा बोलण्याची संधी देऊन मगच निकाल दिला जातो, जो न्यायाधीशांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आधारित असतो. आता विचार करा मानवाने मानवासाठी निर्माण केलेल्या कायद्यात, जर आरोपीच्या बोलण्याचा इतका विचार करण्यात आला असेल तर मग विश्वन्यायाधीश आणि जगतपिता असलेल्या परमेश्वराने याचा विचार केलाच नसेल, हे अशक्य आहे. झालं काय की, या गोष्टी आपल्यापर्यंत त्याप्रकारे मांडण्यात येत नाहीत.
विधात्याने तशी रचना निश्चित केली आहे. घडलेल्या प्रमादांची, क्वचित चुकांची जाणीव मनाला होणं आणि त्यावर आपण मनाने, मनापासून आणि मनासाठी विधात्याची क्षमा मागून घडलेल्या जाणिवेतील वा जन्मजन्मातील न समजलेल्या चुकांबद्दल ईश्वराला साक्षी ठेवून पश्चात्ताप व्यक्त करून, ईश्वराची क्षमायाचना करून प्रार्थना केली आणि ती जर मनापासून असेल तर विधाता हा परमदयाळू आहे, त्याला आपण तितक्या ममत्वाने वा आत्मीयतेने सादच घालत नाही.
अन्यथा तो तर अखंड ब्रह्मांडाचा रक्षणकर्ता व तारणहार आहे आणि आपण तर आत्मरूपाने त्याचा अंश, म्हणजे एकप्रकारे लेकरं आहोत, का तो क्षमा करून, भोगातून सुटका करणार नाही. यात आपणच मागे पडतो किंवा हा मार्ग तितक्या प्रकर्षाने शास्त्रात असूनसुद्धा, नित्य मांडला वा सांगितला जात नाही, त्यामुळे तो अवलंबला जात नाही. पण अखंड ब्रह्मांडस्वामी जो विविध रुपात प्रकटला आहे,
जो गुरुरुप घेऊन साधकांवर मातेच्या ममतेने प्रेम करतो, जो रावणासारख्या अधमी, पापी जिवालासुद्धा अंतिम युद्धाआधी संधी देऊन प्रमादांची कबुली देऊन क्षमायाचना मार्गे शरण येण्यास सांगतो आणि जर तसं केलं तर, सीतेच्या बदल्यात सर्व प्रमाद माफ करीन असं वचन देतो, जो विधाता नरसिंहरुपात खांबातून प्रकटून हिरण्यकश्यपूला शेवटची शरण येण्याची संधी देतो, तो विधाता किती परमदयाळू असेल याचा फक्त विचार करा.
बर हा प्रश्चाताप आणि कबुली कधी करायची, तर नित्य रोज नामस्मरण करण्याआधी, केल्यानंतर किंवा प्रत्येक क्षण करत जावं. मानवी देहात नोकरीत वा व्यवसायात प्रसंगी न केलेल्या वा केलेल्या चुकांबद्दल निरुपाय म्हणून वा अपरिहार्यता म्हणून आपण सॉरी म्हणून क्षमा मागतोच. मग इथेतर परम ईश्वर, जगाचा कर्ता करविता प्रत्यक्ष या आत्म्याचा स्वामी वा पिता याचीच क्षमा मागायची आहे. तेसुद्धा आत्म्याला पुढे या जन्मात किंवा पुढील जन्मात त्रास होऊ नये म्हणून.
रोज नित्य देवाला प्रार्थना करावी, " हे परमदयाळू परमपीता मी जाणतेपणी वा अजाणतेपणी काही चुका, प्रमाद / अपराध केलेच असतील, तरीही तू मोठ्या मनाने मला क्षमा करून त्याच्या कर्मफलातून सोडव. मी नित्य तुझा ऋणी राहीन आणि नित्य तुझं स्मरण करत राहीन."
बघा प्रार्थनेचा स्वीकार नक्की होईल. बघा विचार करा आणि मनापासून प्रार्थना करा. नाम मात्र नित्य घेत रहा, कारण नाम, सर्व काही सुलभ करेल. भेटूया उद्याच्या भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment