भोग आणि ईश्वर ७२
कालचच उदाहरण जरा पुढे नेऊ आणि अजून खोलात जाऊन विचार करूया, बघू काय सापडतय का.
मुख्य संगणकाला जोडलेले उपसंगणक हे विविध शक्ती रुप देव आहेत आणि ते मुख्य संगणकाकडून आज्ञा घेऊन व अधिकार घेऊनच कार्य करतात. त्या मुख्य संगणकाकडूनच अर्थात श्रीमहाविष्णूंकडून सर्व अधिकार व शक्ती प्राप्त करून सर्व देवाचं आपापल्या क्षेत्रातील कार्य चालतं. यात सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांसह समस्त ब्रह्मांड समाविष्ट आहे. प्रत्येकजण त्या मुख्य संगणकाशीच जोडला गेला आहे.
आता आपण नवीन कार्यप्रणालीवर चालणारे लॅपटॉप वापरतो, त्याच्या योगे कार्य करतो. आधुनिक तंत्रात मोबाईल सुद्धा वापरतो. किंबहुना आता ऑफिसमध्ये सुद्धा आणि ऑफिसबाहेरसुद्धा मोबाईलवर काम हे नित्य झालेलं आहे. या लॅपटॉप आणि मोबाइलला संदेश अर्थात सिग्नल आंतरजाल अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून मिळतात. सर्व व्यवहार हे याच माध्यमातून होतात. त्यामुळे या इंटरनेटच्या कार्यक्षमतेचं महत्व आपण सर्व आज जाणून आहोत.
याच प्रणालीचा अनेक युगांपूर्वीपासून विधात्याने उपयोग करून मानवी देह निर्माण केला. शरीर म्हणजे मोबाईल, मेंदू म्हणजे ती महत्वाची हार्डडिस्क, ज्याद्वारे सर्व शरीराची व्यवस्था कार्य करते. मेंदूच्या आज्ञेनुसार सर्व शरीर व त्यातील सुक्ष्मातील सूक्ष्म नस कार्य करते. आता या मेंदूला म्हणजे हार्डडिस्कला चालवायला आज्ञाप्रणाली अर्थात प्रोग्रॅम कोण देतं तर मन, अर्थातच ते सॉफ्टवेअर आहे, ज्यातून मेंदूला सर्व आज्ञा पुरवल्या जातात, किंवा ज्ञानेंद्रियांना ज्ञानप्राप्तीची जाणीव होते.
त्या जाणिवेतून पुढील सर्व कार्य घडत जातं. भूक लागली, लागलं, खुपलं, रडायला आलं, हसायला आलं, राग आला, दुःख झालं यासर्व भावभावना मनातून मेंदू पर्यंत पोचून त्या कृतीतून व्यक्त होतात. म्हणून एखादा माणूस भावशून्य आहे असं जेंव्हा म्हणतो तेंव्हा मनात त्या गोष्टींच्या प्रतिक्रिया तयार होत नाहीत अथवा त्या नियंत्रित करून पुढे जाण्याची क्षमता मनात असते अथवा मन काही आघात, दुःखद घटना यामुळे भावशून्य होतं. भावाची अव्यक्तता ही मूळ आज्ञाप्रणालीतील अर्थात प्रोग्रॅममधील बदल, जो मनाने केला आणि शरीराला त्यात साथ द्यावी लागते, कारण मन बुद्धी यांची सांगड तशाप्रकारे घातली गेली आहे.
मुळात व्यक्त होणं हा मनाचा आणि त्याद्वारे शरीराचा स्थायीभाव आहे. किंवा जिवंत मनाचं ते लक्षण आहे. पण अति व्यक्त होणं, संयतपणे व्यक्त होणं आणि अव्यक्त राहणं हा व्यक्तिपरत्वे असलेला मुद्दा आहे, ज्याला वृत्ती म्हणू शकतो. कदाचित एखादी अति व्यक्त होणारी व्यक्ती, काही घटनेमुळे वा दुर्घटनेमुळे संयत वा अव्यक्त होऊ शकते. अश्या व्यक्ती अव्यक्त असतात त्यातदेखील दोन प्रकार असतात. एकतर चारचौघात व्यक्त न होणं, पण एकांतात त्याचं चिंतन करणं आणि दुसरा प्रकार कोणताही भाव न येणं अर्थात भावरहीत होणं. असं भावरहीत होणं प्रासंगिक असू शकतं किंवा कायम स्वरूपी सुद्धा असू शकतं
प्रत्येक व्यक्ती काहीना काही भाव घेऊनच जन्माला येते, पण काही प्रसंग आपल्यातील भाव बाहेर काढून, त्या प्रकट करतात. या सर्वात मनाचा सहभाग हा खूप महत्वाचा आहे. आता या सर्वांचा मोबाईल आणि इंटरनेटशी काय संबंध असा प्रश्न पडू शकतो. मोबाईलवर नेट हे ताररहित अर्थात वायररहित असतं. त्या त्या कंपनीच्या नेटच्या मनोऱ्यावरून त्या त्या भागात ते नेट त्या त्या मोबाईलवर येतं आणि त्याद्वारे आपण अनेक गोष्टी करत जातो. यातील संदेशवहन हे मनोरा, मोबाईलचा प्रकार आणि मोबाईलची संदेश पकडण्याची शक्ती यावर अवलंबून आहे. यात अडचणी आल्या की संदेशवहन अस्थिर होतं आणि मग संदेश मिळायला आणि त्याद्वारे आपण कार्य करायला विलंब होतो आणि आपण म्हणतो नेट खूप स्लो आहे.
यासर्वांचा संबंध कसा हे आता सांगतो. मोबाईलच्या संदेशाबाबत असं म्हणता येईल की संदेश पूर्ण सक्षम नसेल किंवा मोबाइलला काही अडचणी असतील आणि संदेशवहन सदोष असेल तर आपल्याला इतका त्रास होतो, सवयीमुळे, मग विचार करा की, ज्या विधात्याने अनंत काळापासून आपल्याला शुद्ध, सात्विक, सकारात्मक , भक्तीरुप भावाचे संदेश पाठवले आहेत, पाठवत आहे आणि पाठवत राहणार, त्या संदेशांना ग्रहण करण्याची पात्रता, शक्ती आणि व्यवस्था सर्व मानवरूपी मोबाईलमध्ये आहे, पण आपण नेट चालूच करत नाही, तर ते संदेश मिळणार कसे आणि आपल्या जीवनाचं खर इप्सित साध्य होणार कसं आणि कधी.
यावर विचार करूया उद्याच्या भागात.
चिंतन करा विचार येतील आणि त्यातील सद्विचार घेऊन पुढे जा, मार्ग सापडतील.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment