Skip to main content

भोग आणि ईश्वर ७३

भोग आणि ईश्वर  ७३
  
ईश्वरी संदेश प्राप्त करण्यासाठी आणि त्याद्वारे उन्नत्ती करून घेण्यासाठीची व्यवस्था आणि त्याचा मोबाईलच्या व्यवस्थेशी संबंध आपण पाहिला. यात एक महत्वाचा मुद्दा, जो आज घेणार आहे, कालच एका वाचकांनी त्याचा उल्लेख त्यांच्या प्रतिक्रियेत केला, तो म्हणजे या मोबाईल आणि मोबाईलच्या नेटवर्कचा वापर करून मोबाईलचे सर्व व्यवहार हाताळणारं सिम कार्ड म्हणजेच या देहातील आत्मा.

या अत्म्याशिवाय देह म्हणजे सिमकार्ड शिवाय मोबाईल. म्हणजे नेटवर्क नाही आणि काहीही साध्य होणार नाही. अशी कल्पना करा की, मोबाईल आहे, सर्व व्यवस्था आहे, पण सिमकार्डच घातलं नाही, तर नेटवर्क येणार कसं. कारण सिमकार्ड नसेल तर बोलणं, संदेश पाठवणं आणि समाजमाध्यमांचा वापर करणं सर्वच ठप्प. म्हणजे आत्म्याशिवाय देह, काही उपयोगाचा नाही, नष्ट करणं गरजेचं असतं.

आता आत्मा दिसत नाही, पण पंचप्राणरहित तोच देह, जो एका क्षणापर्यंत जिवंत होता आणि सर्व चलनवलन सुरळीत होतं, किंवा तो माणूस जिवंत असल्याचं कळत होतं, ते एका क्षणात संपतं. एक अजब, गूढ गुह्य व्यवस्था विधात्याची. बरं मानवी व्यवस्थेसारखी सिमकार्ड बदलण्याची कोणतीही व्यवस्था विधात्याने ठेवली नाही. योगाने सिद्धी प्राप्त करून आत्म्याला एका देहातून दुसऱ्या देहात हस्तांतरित करण्याची व्यवस्था असल्याचं आपण पुराणातील काही कथांमधून वाचतो. किंवा चांगदेव महाराज यांच्या संजीवनी मंत्राची कथा आपण वाचली आहेच. पण हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे. 

असो आपण मुद्द्याकडे येऊया. तर हे सिमकार्ड असलेलं मोबाईलस्वरूप पंचमहाभूतरुप शरीर नेटवर्क प्राप्त करण्यासाठी सिद्ध करून दिलेलं आहे, जन्मतः. त्याशिवाय या देहात नित्य नवीन बदल क्षणाक्षणाला घडण्याचं कौशल्य स्वयंसिद्ध करूनच हा देह आपल्या म्हणजेच आत्म्याच्या हातात देवाने दिलाय. यात असणारी न्यूनता वा कमतरता ही आपल्या प्रारब्धाने आलेली असते. अन्यथा हा देह इच्छित अश्या नेटवर्कशी जोडला जायला सिद्धच आहे, जन्मतः. बर यात कोणताही शारीरिक दोष आड येत नाही. 

आलीच तर वृत्ती, मनाची आढयता वा अहं, अज्ञान, दर्प, गर्व, जाणिवेचा अभाव, कामादी नाना विकार, आळस इत्यादी अनेक गोष्टी या आत्म्याला परम आत्म्याच्या नेटवर्कशी जोडण्यापासून बाध्य करतात, अथवा अडथळा निर्माण करतात. पण मग एकदा मनाची तयारी झाली की या नेटवर्क अर्थात विधात्याच्या महाजालात अर्थात सुपरइंटरनेटशी जोडलं जाण्याचा मार्ग हा पुराणकाळापासून अनेक संतांनी सोप्पा करून सांगितला आहे. 

तो मार्ग म्हणजे नामस्मरण.  आपण मोबाईलमध्ये डेटा नेटवर्क चालू करून इंटरनेटशी जोडले जातो, त्याप्रमाणे हे नामस्मरणरुपी डेटानेटवर्क सुरू करून, विधात्याच्या अखंड कृपेच्या महासागररूप महाजालात जोडले जाऊन त्या नेटवर्कला रोज, सतत, जितका वेळ मिळेल तितके वेळा किंवा अखंड चालू ठेवून, त्यातून प्राप्त सुक्ष्मातील सूक्ष्म जाणिवा, संवेदना, चेतना, जागृती, ज्ञान, ऊर्जा, संयोग यांच्याशी कायमस्वरूपी जोडले जाऊ शकतो. 

या प्राप्तीसाठी  नेटवर्क परमेश्वराने सिद्ध करून या देहात विनामूल्य विनामोबदला प्रदान केलं आहे. याशिवाय या नामस्मरणरूप डेटापॅकची कोणतीही फी, चार्जेस, वा काहीही देणंघेणं करावं लागतं नाही आणि हा आपल्या इच्छेनुसार अनलिमिटेड अर्थात अमर्यादित आहे. फक्त नाम घ्या या महाजालात सामील व्हा. तुमचं कार्य हे नामस्मरणरूप डेटा नेटवर्क सतत ऑन म्हणजे चालू ठेवणं. यात मोबाईलच्या प्रकाराप्रमाणे प्रत्येकाला या महाजालात आल्यानंतर सुख, शांती, समाधान, आत्मानंद प्राप्ती होण्यासाठी आपल्याला साधनेप्रमाणे व प्रारब्धाच्या गतीनुसार वेळ लागत जाईल,इतकंच. पण प्राप्त होईल हे नक्की. 

पण गीतेत सांगितल्याप्रमाणे हा नामयज्ञ आहे आणि यज्ञात फक्त समिधा टाकण्याची जबाबदारी यज्ञकर्त्याची असते. ती त्याने यथायोग्य, नेटाने, सातत्याने, जबाबदारीने, कायम करत गेल्यास, या यज्ञाची देवता अर्थात ज्या आराध्याच्या नामस्मरणात हा यज्ञ सुरू केला आहे, ती देवता योग्य वेळ येताच कृपाप्रसाद नक्कीच देईल. पण या यज्ञाचा होम चित्तात अखंड सुरू असावा आणि त्यात नामरूप समिधाचं हवन हे नित्य पडत राहिलं पाहिजे. 

अर्थात यासर्वात तुमच्याकडून हा यज्ञ योग्यरीत्या पार पाडून घ्यायला पुरोहितरुपात स्वतः तुमचे सद्गुरू असतील आणि ज्या ज्यावेळी आपण कुठे कमी पडत आहोत, असं त्यांना वाटेल, त्या त्यावेळी, ते आपल्याला जागं करून हा होम व हा यज्ञ अखंड राहील, याची काळजी घेतील. आपण मात्र  नामस्मरणरूप समिधा यज्ञात सोडायला तयार असावं म्हणजे सद्गुरू तुम्हाला  नित्य या महाजालात ठेवून प्रभुकृपेचा प्रसाद नित्य प्राप्त करून देतील. असं समजा की, आपल्या नेटवर्क कंपनीचे ते सर्वेसर्वा आहेत आणि आपण फक्त डेटा नेटवर्क चालू ठेवूया. 

यावर अजून विचार करूया उद्याच्या भागात. 

चिंतन करा विचार येतील आणि त्यातील सद्विचार घेऊन पुढे जा, मार्ग सापडतील. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...